तू मूळची कुठची?

By admin | Published: February 22, 2017 03:04 PM2017-02-22T15:04:58+5:302017-02-22T15:04:58+5:30

शहरांच्या सजीव सोबतीचा कारवॉँ

Where are you? | तू मूळची कुठची?

तू मूळची कुठची?

Next

अजून इतकं तीव्रतेनं वाटलं नाही कदाचित, पण ‘कायमचा पत्ता’ मिळवायला मी काही धडपड केली नाही. असोशी आहे ती वाहतं,खळाळतं राहण्याची. स्थावर जंगम मालमत्तांच्या नाईलाजांना नाकारत माझ्याएवढंच जिवंत स्थलांतर स्वीकारत राहण्याची.

शहरात राहणं स्वीकारलं तरी जाणवलं की पुढचा बराच काळ मी माझ्या आत गावच घेऊन फिरत होते. गाव मराठवाड्यातलं. दुष्काळात पाण्यासाठी, रोजगारासाठी, हंगामात हाती कोयता घेत ऊसतोडीसाठी स्थलांतर करणारं गाव. मराठवाड्यानं सतत तीन वर्षे दुष्काळकळा सोसलेल्या. या काळात गावाकडच्या किती जणांनी स्थलांतरं केली. शहरात येऊन वडापावचा गाडा लावलेली, लहानमोठी कामं करणारी अनेक तरु ण मुलं, स्त्रिया असे सगळे भेटायचे. भाषेवरून लगेच कळायचं, हे आपल्याकडचे! थोडंसं बोललं की बांध फुटल्यागत ते मन मोकळं करायचे. त्यांच्या डोळ्यात गावाकडं मागं सोडून आलेल्यांच्या जगण्याची चिंता साकळलेली असायची. मनात नसताना गाव सोडून इथं परमुलखात यावं लागल्याची सल दिसायची. 
पण असं करून मी शहराच्या शहरपणाचा अवमान करतेय असं लक्षात आलं. शहर फिरताना, शहरातच असणं जमवून आणताना कळलं आपणच शहर व्हायला हवं. या शहराचा वेग, अस्वस्थता, खालीपन सगळ्यांना समजून घ्यायला हवं. 
शहराशी जशी जवळीक वाढायला लागली, तसं कळालं, इथंही अनेक गावं आपापल्या इलाक्यात आपलं गावपण घेऊन सालोसाल राहतात की! मराठवाडा, खान्देश, विदर्भातून स्थलांतरित होत शहरात रोजगारासाठी दाखल झालेल्यांच्या अनेक वस्त्या, कॉलन्यांमधून फिरताना हे ‘गावपण’ तुकड्या-तुकड्यांत भेटत राहिलं. 
‘कम्फर्ट झोन’ सोडणं आता कदाचित अंगवळणी पडलं होतं. तोवर पुन्हा शांत-निवांत पुणं सोडून औरंगाबाद नावाच्या शहरात स्वत:ला शोधावंसं वाटलं. कित्येक युद्ध, संघर्ष आणि दंगली सोसलेलं, गंगाजमनी तहजीबची खुशबू जपलेलं हे ऐतिहासिक शहर. इतर मराठवाड्याहून केवढी तरी वेगळी असलेली इथली मराठी आणि हिंदी. दखनी अंदाजातल्या उर्दूशी रिश्ता सांगणारी. गुलमंडी, शहागंज, बेगमपुरा, दिवाण देवडी, जयसिंगपुरा... शहरातल्या ठिकाणांची शायराना नावंच प्रेमात पाडणारी. सिटी चौकातल्या अत्तर बाजारात दरवळणारी हीना, फिरदौस, चमेलीची अत्तरं हरेक दिवसाचा जश्न करणारी. जुन्या-पुराण्या नजाकतदार मशिदी, काही ढासळलेले तर काही बुलंद दगडी दरवाजे, बुरु ज, वाडे, अनोळख्या गल्या-मोहल्ले.... ज्याच्याशी तासन्तास मूकपणे बोलत राहावं, अनकही दास्तान ऐकावी असा संगमरवरी मकबरा...ईदच्या महिन्यात अफलातून पदार्थांनी ओसंडणारी बुढीलेन... सगळंच नजरबंदी करणारं. 
औरंगाबादमध्ये असलेल्या भोईवाडासारख्या वस्त्या तर अगदी औरंगजेबाच्या काळापासून येऊन वसलेल्या लोकांच्या. औद्योगिक शहर म्हणून मिळालेल्या ओळखीनंतर गेल्या चार दशकांत इथं भारतभरातून स्थलांतरित झालेले कामगार येऊन राहिलेत. त्यांच्या वस्त्या, तिथं त्यांनी सोबत आणलेले आपापले सण-उत्सव, खाद्यसंस्कृती, भाषा जीवनशैली यांचा शोध घेत फिरण्याचा अनुभव खासच होता.
‘वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज’चा जयघोष करणाऱ्या या काळात सगळंच कसं एकरंगी, एकसुरी होत चाललंय. सगळ्या शहरांना ‘स्मार्ट सिटीज’ बनवण्याच्या नादात त्यांचा ओबडधोबड का असेना पण एकमेव असलेला खास चेहराच आपण गमावून बसू की काय अशी भीती शहरांच्या प्रेमात असलेल्या अनेकांना वाटते आहे. हा चेहरा नसला तर मग मागे उरेल ते काय असेल? 
शहराला समजून घेताना जाणवलं, केवळ शहरातल्या माणसांमुळं शहराची ओळख बनत नसते. या माणसांना वगळूनही शहर स्वत: कुणीतरी सजीव व्यक्ती असते. त्याचा स्वत:चा असा बदलता चेहरा असतो. त्याचं बरं-वाईट चरित्र समजावून घेणं समृद्ध करतं. काही लोक मिळून शहर वसवत असतील, पण पुढचा सर्वकाळ शहरच माणसाला वसवत, घडवत राहतं. माणसांची बरी-वाईट वृत्ती, संकुचितता, खुलेपण, सुकून, बेचैनी, संघर्ष यासाठीची रसद त्याला शहर पुरवतं. माणसाच्या माणूस असण्यात वा नसण्यात त्याच्या भौगोलिकतेचा केवढा तरी वाटा असतो हे मी दोन-चार शहरं बदलल्यावर नक्की म्हणू शकते. 
आर्थिक अडचणीमुळे गावाकडची शेती, वाडा विकून शहरात आल्यावर माझे एक चुलतकाका आतून खूप मोडून पडले. पण त्यांना ते दाखवण्याचीही मुभा नव्हती. आता नव्या शहरात मुलीची शाळा बदलायला त्यांची धावपळ सुरू होती. एका फॉर्मवर कागदावर सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता असं लिहायचं होतं. ‘कायमचा पत्ता’ लिहिताना ते थबकले आणि ‘आता आपल्याला कायमचा पत्ता कुठं उरला गं...’ असं बायकोला सांगत हमसून-हमसून रडायलाच लागले. मी बरीच लहान होते तेव्हा. पण आता ते आठवताना कळतं, ‘कायमचा पत्त्या’मध्ये केवढं काय काय साठवलेलं होतं ते.
अजून इतकं तीव्रतेनं वाटलं नाही कदाचित, पण ‘कायमचा पत्ता’ मिळवायला मी काही धडपड केली नाही. असोशी आहे ती वाहतं, खळाळतं राहण्याची. स्थावर जंगम मालमत्तांच्या नाईलाजांना नाकारत माझ्याएवढंच जिवंत स्थलांतर स्वीकारत राहण्याची.
‘तू मूळची कुठली?’ असं कुणी विचारलं की एका शब्दातलं उत्तर नसतं आता माझ्याकडं
मी माझ्यापुरती निदा फाजलींच्या आवडत्या ओळी गुणगुणते, 
‘वक्त के साथ है मिट्टी का सफर सदियोंसे 
किसको मालूम कहॉँ के है, 
किधर के हम है...’
- शर्मिष्ठा भोसले
( शर्मिष्ठा मुक्त पत्रकार आहे.sharmishtha.2011@gmail.com)

Web Title: Where are you?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.