ए वतन तेरे लिए..
By Admin | Updated: January 26, 2017 02:21 IST2017-01-26T02:21:15+5:302017-01-26T02:21:15+5:30
आज २६ जानेवारी.प्रजासत्ताक दिन. जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून ताठ मानेनं जगण्याचा आणि लोकशाही मूल्याचा सन्मान करण्याचा हा दिवस.

ए वतन तेरे लिए..
आज २६ जानेवारी.प्रजासत्ताक दिन. जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून ताठ मानेनं जगण्याचा आणि लोकशाही मूल्याचा सन्मान करण्याचा हा दिवस.
आज सकाळपासून आपण देशभक्तीपर गाणी ऐकू. डोळ्यात पाणी येतं अनेकदा ते ऐकताना. पण ते आणि तेवढं म्हणजेच का आपलं राष्ट्रप्रेम? आपली देशभक्ती?
पण देशभक्त कोण हे ठरवणं खरंच इतकं सोपं असतं का?
एटीएम समोरच्या रांगेत कटकट न करता उभ्या असणाऱ्या माणसानं जर वेफर्सचं रिकामं पाकीट तिथेच टाकलं, इतस्तत: फेकून सार्वजनिक स्वच्छतेचा नियम धुडकावला तर आपण त्याला काय म्हणणार?
सैनिक प्राण पणाला लावून ज्या भूमीचं रक्षण करत असतात त्याच भूमीवर गुटखा खाऊन पचकन थुंकणाऱ्या कुणालाही सैनिकांच्या त्यागाबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे?
गाडीवर झोकात तिरंगा लावणारा कुणी जर सिग्नल तोडून पळत असेल तर खरंच तो जबाबदार राष्ट्रप्रेमी आहे का?
गोष्टी छोट्या वाटत असल्या, तरी त्यातून आपलं राष्ट्रप्रेम दिसतं. आपली देशाबद्दलची, देशातल्या कायद्याविषयीची कळकळ दिसते. आणि अनेक छोट्या गोष्टींतूनच आपण एक उत्तम समाज, देश घडवत असतो. स्वत: जबाबदार नागरिक बनत असतो.
एकूणच आपलं रोजचं वागणं आणि आपलं देशप्रेम याचा आपापसात काहीतरी संबंध आहे हे लक्षात घ्यायला हवं. आपलं जबाबदार नागरिक असणं ही एक मोठी गोष्ट आहे हे समजून घ्यायला हवं.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी सकाळी देशभक्तीपर गाण्यांची कॅसेट लावली म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. देशभक्ती जर इतकी सोपी असती तर आपला देश केव्हाच महान आणि प्रगत महासत्ता वगैरे झाला असता. पण स्वातंत्र्य मिळून ७० वर्षं होत आली तरी आपण अजून ‘विकसनशील राष्ट्र’च आहोत.
असं का बरं? इतक्या वर्षांत आपण ‘विकसित राष्ट्र’ का होऊ शकलो नाही? विकसित राष्ट्रांमध्ये आणि आपल्यामध्ये नेमका असा काय फरक आहे?
हा फरक शोधायला गेलं तर जगभरात प्रगत असणाऱ्या देशांतील नागरिकांच्या वागण्याचे, त्यांच्या जबाबदारीनं देश घडवण्याचे, नियम पाळण्याचे अनेक किस्से सापडतात. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण नागरिकांनी त्याचं पालन केल्यानं देशाला पडणारा फरक फार मोठा असतो. कारण त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून सगळ्यात दिसतो तो तिथल्या नागरिकांचा अॅटिट्यूड. त्यांची जबाबदार असण्याची वृत्ती.
या छोट्या छोट्या गोष्टी वाचल्या तर आपल्या लक्षात येतं की ‘विकसित’ आणि ‘विकसनशील’ मानसिकतेतला नेमका फरक काय आहे ते. भारताचे नागरिक म्हणून आपण स्वत:ला असं सतत देश आणि समाजासाठी जबाबदार मानलं पाहिजे. वाकलं पाहिजे.
पण आपण तसं करत नाही.
आपला राष्ट्रीय स्वभाव अजूनही झेब्रा क्रॉसिंगच्या पुढं जाऊन उभं राहण्याचा आहे.
वाट्टेल तिथे थुंकण्याचा आहे.
महिलांच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करून त्यांनी घातलेल्या कपड्यांवरूनच त्यांची किंमत ठरवण्याचा आहे.
रांग न लावता गर्दी आणि धक्काबुक्की करण्याचा आहे.
न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवून वेळीअवेळी आवाज करण्याचा आहे.
राजकीय ओळखीपाळखी काढून भर रस्त्यात रहदारी अडवून मांडव घालण्याचा आहे.
आजूबाजूला लहान मुलं असतील तरी भकाभका सिगारेटी पिण्याचा आहे.
रस्त्यात बेफिकीरपणे कचरा करण्याचा आहे. कुठंही कचरा फेकणं आहेच.
पादचारी आणि सायकलस्वार यांची जराही पर्वा न करता बेफाम गाड्या उडवण्याचा आहे.
आपण असे का आहोत?
आपलं प्रेम आहे म्हणतो ना या देशावर? मग आपण उत्तम वागण्याची, नियम पाळण्याची जबाबदारी का घेत नाही?
ती घ्यायची तर आपल्या रोजच्या वागण्यात आपल्यालाच बदल करावे लागतील.
ते केले तर आजच्या प्रजासत्ताक दिनाला दिलेली ती खरी मानवंदना असेल. ही राष्ट्रभक्ती आपण कधी शिकणार, एवढाच प्रश्न आहे.
- गौरी पटवर्धन
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
patwardhan.gauri@gmail.com