TRAPE

By Admin | Updated: June 5, 2014 17:54 IST2014-06-05T17:54:46+5:302014-06-05T17:54:46+5:30

मुबलक सोयी, चिक्कार माहिती, हाताशी पैसा, समजूतदार पालक, शहाणी मुलं. तरी निर्णय चुकतात. वाटा हरवतात आणि माणसं दुरावतात. असं का होतंय? आपणच स्वत:साठी लावलेली अपेक्षांची वेल आपल्याच गळ्याभोवती का आवळली जातेय?

TRAPE | TRAPE

TRAPE

>अवतीभोवती बेसुमार पर्याय, त्या पर्यायांपैकी कशाचीही निवड केली तरी आपल्या हातून काहीतरी निसटतंय, आपण कशाला तरी कायमचा ‘नकार’ देतोय ही भावना हल्ली मुलांपेक्षा पालकांनाच इतकी खातेय की, मुलांच्या करिअरची सूत्रं आपल्या हातात न ठेवताही पालक मुलांवर आपला रिमोट कण्ट्रोल चालवतच आहेत.
दुसरीकडे मुलंही आपल्यासाठी सोयीस्कर स्वातंत्र्य निवडत पालक जे म्हणतील ते करायला राजी आहेत, आणि आजच्या घडीला अनेक घरांसाठी हाच एक मोठ्ठा ‘ट्रॅप’ होऊन बसला आहे.
म्हणजे एकीकडे मुलं पालकांशी मोकळेपणानं बोलताहेत, त्यांचा सल्ला मागताहेत. दुसरीकडे बर्‍यापैकी पालक आपली इच्छा आणि स्वप्न मुलांवर न लादता त्यांना हवं ते करण्याचं, हवी ती करिअरची वाट निवडण्याचं स्वातंत्र्य देत आहेत. म्हटलं तर ही चांगली गोष्ट यात प्रश्न निर्माण होण्यासारखं काय आहे?
पण तरीही प्रश्न निर्माण होत आहेत कारण नव्या जमान्यातले पालक अतीच ‘सपोर्टिव्ह’ होत आहेत. मुलांइतकेच जागरूक आहेत. मुलांना शिक्षणासाठी वाट्टेल तेवढा पैसे द्यायला तयार होत आहेत. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाइतकं आणि करिअरइतकं महत्त्वाचं दुसरं असं काहीच उरलेलं नाही.
त्याचा परिणाम मात्र उलटाच झाला. पूर्वी आपल्या निर्णयासाठी पालकांशी वैर पत्करणारी मुलं सध्याच्या पालकांच्या चांगुलपणाखाली पुरती गुदरमरली आहेत. त्यांच्याही नकळत त्यांच्या करिअरचे आणि शिक्षणाचे निर्णय पालकांवर सोपवून मोकळे होत आहेत. त्यामुळे काही चुकलं किंवा जमलं नाही तरी पालकांकडे बोट दाखवायला, जबाबदारी ढकलायला मुलं मोकळी आहेत.
या सार्‍यातून होतंय एकच की, आपले निर्णय आपण घ्यायचे, अनेक पर्यायातून आपल्याला आवडेल, शंभर टक्के ज्यावर विश्‍वास वाटेल असा मार्ग निवडणं यात अनेक मुलं अडखळू लागली आहेत.
आणि पर्यायांचा महासागर अवतीभोवती असताना अनेक मुलं अक्षरश: सैरभैर अवस्थेत कन्फ्यूज होत केवळ मदत कुठे मिळेल असा मार्ग शोधत आहेत.
त्यातून काहींना मदत मिळते, तर काहींना केवळ फ्रस्ट्रेशन.
आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये भर घालतं अवतीभोवतीचं ‘बडबोलं’ वातावरण.
त्याचंच एक उत्तम उदाहरण. देशात सत्ताबदल झाला. आपण काय काम करू, देशात नेमके कोणते बदल करू हे सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारकाळात माध्यम म्हणून सोशल नेटवर्किंग साईट्सचा उत्तम वापर केला. अनेक दिग्गजांनी टीव्हीवर सोशल नेटवर्किंगच्या या प्रभावी वापराची, त्यातून एक निर्णायक प्रतिमा निर्माण होण्याविषयीची बरीच चर्चा केली. ज्यांचा पराभव झाला तेही आपण सोशल नेटवर्किंगमध्ये, आपल्या कामाच्या प्रचार-प्रसारामध्ये कसे मागे पडलो हे सांगू लागले.
घरोघरी पालकांनी ही चर्चा ऐकली. त्यातले काही पालक ज्यांनी स्वत: कधीही ही साधनं फारशी वापरली किंवा पाहिलीही नाहीत ती आज आपल्या मुलामुलींच्या मागे लागली आहेत की काय वाट्टेल ते कर, पण सोशल नेटवर्किंग इफेक्टिव्हली कसं वापरायचं शिक, उद्याचा सारा जमानाच ऑनलाइनचा आहे. बोलण्याचा, डायनॅमिक असण्याचा आहे. त्यासाठी सोशल नेटवर्किंगच्या गल्लोगल्ली सुरू झालेल्या क्लासेसलाही मुलांना रग्गड फिया भरून पाठवण्याची तयारीही अनेक पालकांनी सुरू केली आहे. त्यासाठी मुलांना महागडे स्मार्ट फोन घेऊन देत, आपल्या मुलाचा सोशल नेटवर्किंग प्रेझेन्सही वारंवार तपासू लागले आहेत. आणि मुलांना ते जमत नसेल तर मात्र हेच पालक अस्वस्थ होऊ लागले आहेत.
पालकांचीच अवस्था अशी असेल तर मुलांच्या डोक्यात काय कल्लोळ असेल याची कल्पनाही न केलेलीच बरी.
 
एक्झॉस्ट मनांना नशेचा आधार?
 
काही मानसोपचार तज्ज्ञ तर सांगतात की, हल्ली आमच्याकडे येणार्‍या डिप्रेशन, फ्रस्ट्रेशनची तक्रार करणार्‍या अनेक शहरी मुलामुलींची हिस्ट्री घेत असतानाच आम्ही त्यांची एक ड्रग टेस्टही करतो.
अमली पदार्थ तर ही मुलं घेत नाही ना, हे शंका निरसन त्यातून करायचं असतं.
दुर्दैवानं आतल्या आत कुढणारे, आपण हरलोय असं वाटणारे अनेक मुलं अमली पदार्थाच्या आहारी गेलेले सापडतात. विचारलं तर १00 रुपयांपासूनची अनेक नशा देणारी साधनं त्यांनी वापरलेली असतात.
असं का झालं हे शोधायला गेलं तर कळतं की, ही मुलं एक्झॉस्ट झालेली असतात. परीक्षा-अभ्यास-परफॉर्मन्स-परीक्षा हे चक्र त्यांना दमवून टाकतं. कधी स्वत:च्या मनासारखं यश मिळत नाही, कधी पालकांच्या. हळूहळू या मुलांचं शिकणं बंद होतं आणि केवळ अभ्यास करण्याचं मशिन होतं.ते मशिन कंटाळतं आणि सगळं विसरून जाण्याच्या प्रयत्नात नशा करायला लागतं.
पालकांना हे सारं कळतही नाही, आणि आपण आपल्याच पालकांना फसवतोय ही जाणीव या मुलांना अधिक गर्तेत लोटते.
घरोघरच्या पालकांनी एकीकडे मुलांनां समजून घ्यायची, साथ देण्याची जशी तयारी केली, त्याचाच एक भाग म्हणून हेच पालक मुलांचं चुकण्याचं स्वातंत्र्यही नकळत हिरावून घेऊ लागले.
आणि मग सारं काही चांगलं असताना. मुलं स्वत:च स्वत:च्या विचित्र ट्रॅपमध्ये अडकायला लागलेत.
 
जबाबदार कोण?
 
सोपा निष्कर्ष काढून कुणावर तरी सगळ्या चुकांची जबाबदारी यासंदर्भात नाहीच ढकलता येत हाच खरा आणखी एक प्रश्न आहे. पालक मुलांना मदत करण्याचा, समजून घेण्याचाच प्रयत्न करत अधिकाधिक असुरक्षित आणि उतावीळ होताहेत, हे जसं खरं तसेच मुलंही पालकांशी वैर घेण्यापेक्षा त्यांना जे वाटतं ते आपल्या भल्यासाठी तर नसेल हे समजून घेण्याच्या टप्प्यात येऊन पोहचलेत. त्यामुळे अमक्याची चूक इतकं सोपं हे गणित उरलेलं नाही.
तारतम्य वापरून पर्यायांच्या जगात स्वत:ची वाट निवडणं, अनेक गोष्टी आपण सोडणार आहोत, हे मान्य करणं.यापलीकडे तरी दुसरा ‘शहाणा’ पर्याय दिसत नाही.
 
प्रेमभंगामुळे नापास? 
नव्हे, नापास झाल्यानं प्रेमभंग.
 
कॉलेजचं वारं लागलं, प्रेमात पडले म्हणून अभ्यासातलं लक्ष उडाले असा एक आजवरचा पॉप्युलर समज आहे.
आज मात्र अनेक मुलांच्या संदर्भात परिस्थिती नेमकी उलट झालेली आहे.
प्रेमात पडल्यामुळे किंवा अती चॅट, अती फेसबुकमुळे ते नापास होत नाहीत.
तर नापास झाल्याने, कमी मार्क पडल्याने, ड्रॉप घ्यायचा निर्णय घेतल्यानं त्यांचा प्रेमभंग होतो. मुली सहसा मुलांपेक्षा जास्त फोकस असतात, पण मुलं भावनिक निर्णय जास्त लवकर घेतात असं अनेक करिअर कौन्सिलर सांगतात. ड्रॉप घेतलेले, नापास झालेले अनेक मुलं असतात. त्यांचं ब्रेकप हमखास होतं कारण त्यांची मैत्रीण पुढे निघून जाते. ती तिच्या जगात रमते. मुलांना तिच्याविषयी एकतर आकस वाटतो किंवा संवाद कमी होतो किंवा गैरसमज होतात, अनेकदा तर मुलीच नको ‘फेल्युअर’शी मैत्री म्हणत अशा मुलांना टाळायला लागतात. परिणाम व्हायचा तोच होतो, अभ्यासातून उरलंसुरलं लक्षही उडतं.आणि मग जास्त डिप्रेशन येतं.
त्यातून मदत म्हणून अनेक जण नव्या मुलीच्या प्रेमात पडतात. पुन्हा ब्रेकप करतात. आणि अनेक मुलांचं करिअर केवळ या सार्‍या अनावश्यक चक्रामुळे धुळधाण होतं.
आपलं नेमकं काय चुकलं हेच या मुलांना कळत नाही.
पण वास्तव असतं ते हेच, की शिक्षण-करिअर संदर्भातले चुकणारे निर्णय व्यक्तिगत आयुष्याचाही चुथडा करतात. आणि एखादं होतकरू पोरगं कायमचं स्वत:ला हरवून बसतं.

Web Title: TRAPE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.