दोन तरूण आपल्या गावाला डिजिटल करतात तेव्हा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 03:00 IST2018-08-23T03:00:00+5:302018-08-23T03:00:00+5:30
ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्यात दोन तरुणांनी उभ्या केलेल्या एका नव्या डिजिटल अनुभवाची गोष्ट.

दोन तरूण आपल्या गावाला डिजिटल करतात तेव्हा.
- सचिन लुंगसे
जमाना डिजिटलचा आहे. त्या डिजिटल जमान्यात पाड्या आणि वाड्यावस्त्यांनाही घेऊन जाण्याचं काम दोन तरुण मुलं करत आहेत. पालघर जिल्ह्यातील साधारण चौदा गावांना ‘पुकार’ या सामाजिक संस्थेच्या श्रुतिका शितोळे आणि किरण सावंत या नव्या दमाच्या तरुणांनी ऑनलाइन आणलं आहे. त्यांना मदत केली आहे त्यांच्यासोबतच्या ई-सेविकांनी. केंद्रासह राज्य सरकारच्या योजनांसह सगळी कामं कशी ऑनलाइन करायची, सातबारा कसा काढायचा, योजनांची माहिती मिळवत त्याचा गावाला कसा फायदा करून घ्यायचा अशी अनेक कामं पुकारच्या टीमनं गावाला शिकवली. नुसती शिकवली नाही तर आव्हानांचा सामना करत इंटरनेट, संगणक, बँकिंग, केंद्र आणि राज्याच्या योजनांची माहिती देत लोकांना ई-साक्षर केलं. त्या गावांची ही गोष्ट.
आयआयटी मुंबईला एक प्रकल्प करायचा होता. ‘व्हाइट स्पेस टेक्नॉलॉजी’ नावाची त्यांची टेक्नॉलॉजी त्यांना टेस्ट करायची होती. त्यासाठी मुंबईपासून जवळ असा एखादा प्रदेश, परिसर त्यांना पाहिजे होता. जिथं डोंगर असेल. जंगल असेल तिथं त्यांना ही टेक्नॉलॉजी टेस्ट करायची होती. हा शोध सुरू असतानाच ‘फोर्ड फाउण्डेशन’च्या रविना अग्रवाल यांनी त्यांना ‘पुकार’ला कनेक्ट करून दिले. दोघांनी मिळून हा उपक्रम राबवावा, असं सुरुवातीला ठरले. मग दोघांनी मिळून हा उपक्रम हाती घेतला. त्यातून श्रुतिका आणि किरणच्या ‘रिसर्च ऑन इंटरनेट एक्ससेस’च्या कामाला सुरुवात झाली.
त्यांनी या प्रकल्पासाठी तीन गावांची निवड केली. पालघर तालुक्यातील बहाडोली, खामलोली, धुकटन अशी या तीन गावांची नाव. दीडेक वर्षे या गावांत हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यासाठी गावातल्या तरुण मुलांची निवड करण्यात आली. ‘ई-सेवक’ म्हणून त्यांचा गावाला परिचय करून देण्यात आला. सरकारच्या इंटरनेटवरच्या योजना गावातल्या लोकांना माहिती करून देणं आणि त्या योजनांचा फायदा करून देणं असे काम त्यांनी हाती घेतलं. हे काम करण्यासाठी ई-सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. इंटरनेट, प्रिंटर, संगणक, स्कॅनर असं साहित्य ई-सेवा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आलं.
महाविद्यालयीन विद्यार्थी, पार्टटाइम काम करणारी तरुण मुलंच ई-सेवक म्हणून काम करू लागली. सरकारी योजनांची माहिती गावातल्या लोकांना देऊ लागली. हे करण्यापूर्वी ई-सेवकांना पुकारने प्रशिक्षण देण्यात आलं. इंटरनेट वापरायचं शिकवलं. सरकारी योजना, साताबारा उतारा, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, पासपोर्ट या सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यांनी मग गावातल्या लोकांना माहिती दिली. लोकांना इंटरनेट म्हणजे काय? याची माहिती दिली. त्याचा वापर कसा करायचा याची माहिती दिली. तोवर अनेक गावकर्यांचा इंटरनेटशी कधी संबंध आला नाही; आणि आला असला तरी ते वापरायचं कसं याबाबत ते अनभिज्ञ होते.
प्रकल्प सुरू असताना इंटरनेटसाठीचे पैसे आयआयटी भरत होती. कारण ते त्यांची टेक्नॉलॉजी टेस्ट करत होते. मात्र हे काम सुरू असतानाच एक अडचण अशी आली की आयआयटीचा टेक्नॉलॉजीचा परवाना संपला. मुदत संपली. आता प्रकल्प पुढे कसा सुरू राहणार असा प्रश्न साहजिकच सर्वांनाच पडला. एवढं सर्व काम केल्यावर माघारी कसं फिरायचं असे अनेक प्रश्न निर्माण झाले. पुकार संस्थेच्या डॉ. अनिता पाटील-देशमुख यांनी मग स्वत:च्या हिंमतीवर काम पुढं न्यायचं ठरवलं. पण इंटरनेटचा प्रश्न कायम होता. मग त्यांनी येथे डोंगलच्या मदतीने काम करण्याचा निर्णय घेतला.
कालांतरानं कामानं वेग पकडला. तीन गावात प्रकल्प यशस्वी होत असल्यानं आता पालघर तालुक्यातल्या चौदा गावात हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘इन्फॉर्मेशन फॉर ऑल, ई-गव्हर्नन्स फॉर ऑल’ असं या नव्या प्रकल्पाचे नाव. चहाडे, वसरे, खडकोली, विर्शामपूर, तांदुळवाडी, उचावली, पारगाव, नगावे, साखरे, दहिसर, गुंदावे, पोचाडे, तामसई, नेटाळी अशी ही या चौदा गावांची नावे. येथेही ई-सेवक तयार करण्यात आले. चौदा गावांमध्ये ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आली. महिलांना संगणक आणि इंटरनेट शिकविण्यात आलं. गॅस सबसिडी कशी तपासायची याचीही माहिती महिलांना देण्यात आली. याच काळात एक हेल्पलाइनही सुरू करण्यात आली. ही हेल्पलाइन चौदा गावांसह उर्वरित ठिकाणांनाही सेवा देत होती. शासनाशी संबंधित ज्या काही सेवा आहेत, त्या सेवांची माहिती हेल्पलाइनवर दिली जात होती.
या उपक्रमातून एक नवा डिजिटल अनुभव गावकर्यांना मिळतोय तर पुकारच्या तरुण दोस्तांनाही तंत्रज्ञान थेट गावांत पोहचवल्याचं समाधान लाभलं.
(सचिन लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वार्ताहर आहे.)
sachin.lungse@gmail.com