जेल को नहीं, देश को जरुरत है!
By Admin | Updated: September 25, 2014 17:39 IST2014-09-25T17:39:48+5:302014-09-25T17:39:48+5:30
'तुमचा मुलगा काय करतो?’ २२ ऑगस्टचा अंक पाहताच आणि हा प्रश्न वाचला. आतमध्ये उघडून पाहिलं तर गुन्हेगारीचा लेख, त्याचा आलेख.मध्यमवर्गीय मुलांचा गुन्ह्यातला वाढता सहभाग.

जेल को नहीं, देश को जरुरत है!
>'तुमचा मुलगा काय करतो?’
२२ ऑगस्टचा अंक पाहताच आणि हा प्रश्न वाचला. आतमध्ये उघडून पाहिलं तर गुन्हेगारीचा लेख, त्याचा आलेख.मध्यमवर्गीय मुलांचा गुन्ह्यातला वाढता सहभाग.
त्याचवेळी आठवलं, ‘सिंघम रिटर्न’मध्ये अजय देवगण मुलांना म्हणतो, ‘जेल को नहीं इस देश को तुम्हारी जरुरत है.’
सिंघम पाहिला असेल, सटकली असं म्हटलंही असेल. पण त्यातलं हे वाक्य गांभीर्यानं घेतील का तरुण मुलं?
कारण आम्ही वाचतो. पाहतो. बालगुन्हेगारी वाढली. तरुण पिढी वाईट मार्गाला लागली. पण आपल्या डोक्यात काही घुसत नाही. आई-वडील दिवसभर कामाला जातात. त्यांना काय माहिती दिवसभर मुलगा काय करतो ते !
मला वाटतं, तरुण मुलांनीच स्वत:च स्वत:ला सावरायला हवं. बालगुन्हेगारीचं विेषण करणारे अनेक भेटतील, पण या मार्गाला तरुणांनीच जाऊच नये, स्वत:चं आयुष्य घडवावं हे सांगणारे, मार्गदर्शन करणारे, योग्यवेळी कान पकडणारे कुणी भेटत नाही, हीच आमची खरी खंत आहे.
- प्रवीण काळे
मराठवाडा मित्रमंडळ, कॉलेज ऑफ कॉर्मस, पुणे.
तारुण्याचा खरा चेहरा कोणता?
२२आणि २९ ऑगस्टचे ऑक्सिजन वाचले. एकीकडे बालगुन्हेगारीची समस्या, तर दुसर्या अंकात गणेशोत्सवातले काही वेगळे मंडळ. त्यातले ‘जागे’ तरुण, त्यांचं छोटंसं का होईना, पण समाजोपयोगी काम.
हे सारं आपल्या अवतीभोवती घडतं. असे दोन चेहरे दिसतात हे मान्य करायला हवं. गणेशोत्सवातही काही तरुणांचा धांगडधिंगा भयानक असतो.
यातलं काय खरंय ?
तरुणांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. गंभीर गुन्ह्यांना, बलात्कारसारख्या गुन्ह्यात तर फाशीचीच शिक्षा करा, अशी मागणी होतेय. पण मला वाटतं, अशी कठोर शिक्षा झाल्यानं समाज सुधारेल का?
आपला समाज आणि विचारसरणी जोवर बदलत नाही, तोवर कठोर शिक्षा तरी किती बदल घडवतील?
तू मुलींशी कसं नीट वाग, त्यांचा कसा आदर कर, हे घरातून किती मुलांना शिकवलं जातं? जरा काही वावगं घडलं की, आजही लोकं म्हणतात, मुलगीच तशी असणार !
हे चित्र तर घरोघरी बदलू शकतं. मुलांना घरातूनच चांगला माणूस होण्याचं शिक्षण मिळू शकतं.
तरुण मुलं बर्यापैकी सजग होताहेत, त्यांना चांगलं मार्गदर्शन फक्त मिळायला हवं !
आशा आहे, गोष्टी नक्की बदलतील !
- पूनम राऊळ
मु. पो. मळगाव, ता. सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग