खेलो इंडिया! तळातल्या ‘टॅलेण्ट’ला मिळालेला हा बळकट हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 07:00 IST2019-01-24T07:00:00+5:302019-01-24T07:00:12+5:30

खेडय़ापाडय़ांतले जे खेळाडू मैदानावर अप्रतिम कामगिरी करून बातमीत झळकले, त्यातली बहुतेक मुलं ग्रामीण भागातली आणि अत्यंत गरीब घरातली आहेत. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती, अशा तरुण खेळाडूंच्या डोळ्यांत आता 2020, 2024 आणि 2028च्या ऑलिम्पिकची स्वप्नं रुजत घातली गेली आहेत!

Khelo India! news start with Hope | खेलो इंडिया! तळातल्या ‘टॅलेण्ट’ला मिळालेला हा बळकट हात

खेलो इंडिया! तळातल्या ‘टॅलेण्ट’ला मिळालेला हा बळकट हात

ठळक मुद्दे मुलामुलींचं नशीब बदलण्याची जादू

समीर मराठे

ज्यांचं नावही कधी ऐकलं नव्हतं, वर्तमानपत्रांत, टीव्हीवर कुठल्या कानाकोपर्‍यातही ज्यांना कधी प्रसिद्धी मिळाली नाही, अशी खेडय़ापाडय़ांतली तरुण मुलं आज मैदान गाजवताहेत, पदकांची लयलूट करताहेत, टीव्हीवर त्यांचा स्पोर्ट्स इव्हेण्ट लाइव्ह झळकतोय आणि त्यांच्यातलं टॅलेण्ट असं खुलेपणानं पहिल्यांदाच सगळ्यांच्या समोर येतंय.
‘खेलो इंडिया’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पुण्यात बालेवाडी येथे नुकत्याच झालेल्या यूथ गेम्समधून पुढे आलेलं हे चित्र.
महाराष्ट्रानं ही स्पर्धा खर्‍या अर्थानं गाजवली आणि सर्वाधिक सुवर्णपदकं पटकावून देशात पहिला क्रमांक मिळवला. शहरी मुलांपेक्षाही ग्रामीण भागातील खेळाडूंनी या स्पर्धेवर मोठय़ा प्रमाणावर छाप पाडली, हे या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्टय़.
आजर्पयत कुठे होती ही मुलं? कुणालाच ती कधी का दिसली नाहीत? त्यांच्यातलं टॅलेण्ट आजच पुढे आलं का?. असे असंख्य प्रश्न या निमित्तानं विचारले जाऊ लागले आहेत. 
खरं तर याअगोदरही स्पर्धा होत होत्या, सार्‍या अभावांवर मात करत खेडय़ापाडय़ांतली हीच मुलं पूर्वीही मैदान गाजवत होती; पण याआधी त्यांना इतकी प्रसिद्धी, पैसा कधीच मिळाला नव्हता. त्यांच्याकडे जाणीवपूर्वक इतकं लक्षही कधीच दिलं गेलं नव्हतं.
खेडय़ापाडय़ांतली ही जी मुलं आज मैदानावर अप्रतिम कामगिरी करताना दिसताहेत, त्यातली बहुतेक अत्यंत गरीब घरातली. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असलेली. या सार्‍या मुलांसमोर या स्पर्धाच्या निमित्तानं एक ढळढळीत वास्तव पुढे आलं, ते म्हणजे. वेगवेगळे खेळ, मैदानावरचं कौशल्य, तिथे घाम गाळायला लावणारी आणि स्वतर्‍च्या क्षमता पणाला लावणारी कसोटी, कुठल्याही परिस्थिती मागे न हटण्याची आणि तगून राहण्याची जिद्द हे आपलं सर्वोच्च बलस्थान आहे आणि मैदानावरची हीच कामगिरी आपलं वर्तमान तसंच भविष्यही बदलू शकते हे या तरुण मुलांना अतिशय प्रकर्षानं लक्षात आलंय. त्यासाठी मैदानावरची ही लढाई आणखी जिद्दीनं लढण्याचं बळ त्यांच्यात आलं आहे, पुढे त्यात आणखी भर पडेल एवढं नक्की.
अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे अ‍ॅथलिट घडवणारे, ‘साई’चे (स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया) नाशिक येथील अ‍ॅथलेटिक्स कोच विजेंद्रसिंह यांना यासंदर्भात बोलतं केलं. त्यांचं म्हणणं होतं, योजना पूर्वीही होत्या, गुणवंत खेळाडू याआधीही होते; पण त्यांना हुडकणं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ते पोहोचू शकतील अशा पद्धतीनं त्यांना पैलू पाडणं. हे केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. व्यापक पातळीवर त्याचा श्रीगणेशा आता झाला आहे. ज्याच्यात धमक आहे, कौशल्य आहे, मेहनत घेण्याची तयारी आहे तो आता फार काळ दुर्लक्षित राहू शकत नाही. शिवाय खेळ आणि खेळाडूंना कुठल्याही परिस्थितीत आता पैसा कमी पडणार नाही, हे या योजनेचं आणखी एक वैशिष्टय़े.  
आंतरराष्ट्रीय, ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवणं हे सोपं काम नाही, एका रात्रीतून ते घडतही नाही. त्यासाठी दीर्घ पल्ल्याचं प्लॅनिंग आणि अत्युच्च दर्जाचं प्रशिक्षण, सुविधाही लागतात. 2020, 2024 आणि 2028चं ऑलिम्पिक डोळ्यांसमोर ठेवून सरकारनं ही योजना तयार केली आहे. ग्रामीण भागातल्या खेळाडूंकडे उपजत टॅलेण्ट आहे. या टॅलेण्टचा उपयोग केला तर कुठलीही गोष्ट आपल्याला अशक्य नाही, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंनाही आपण टक्कर देऊ शकतो आणि आपलं भविष्य स्वबळावर, स्वतर्‍च्या हिंमतीवर आपण स्वतर्‍च बदलू शकतो, हेही या खेळाडूंना आता कळू लागलंय. त्यामुळे खेळाडू आणि देशातलं खेळाचं वातावरण बदलण्यासाठी ‘खेलो इंडिया’ योजना एक मैलाचा दगड ठरेल.
‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत गेल्या वर्षी केंद्र सरकारनं दिल्लीत पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केल्या. स्कूल गेम्सपुरत्या आणि दहा ते अठरा या वयोगटातील खेळाडूंसाठीच या स्पर्धा मर्यादित होत्या. या स्पर्धाचं फलित लक्षात आल्यावर यंदापासून या स्पर्धाची व्याप्ती सरकारनं वाढवली असून, युनिव्हर्सिटी लेवलर्पयत आणि 21 वर्षे वयार्पयतच्या खेळाडूंचाही या योजनेत समावेश केला आहे. या योजनेत निवड झालेल्या खेळाडूंना आता दरवर्षी पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती पुढील तब्बल आठ वर्षे मिळेल.
अर्थात या योजनेसाठी खेळाडूंची निवड झाली म्हणजे पुढच्या आठ वर्षाची चिंता मिटली असं नाही. या योजनेत निवड झालेल्या खेळाडूंना ‘खेलो इंडिया’च्या पुढील सर्व स्पर्धात खेळावंच लागेल आणि आपला परफॉर्मन्सही दाखवावा लागेल. अन्यथा या योजनेतील त्यांची निवड रद्दही होऊ शकते.
 या योजनेंतर्गत खेळाडूंना काही रोख रक्कम (दरमहा दहा हजार रुपये) त्याचबरोबर स्पोर्ट्स किट, अत्यावश्यक सुविधा, डाएट, स्पर्धाचा खर्च. अशा अनेक गोष्टीही पुरवल्या जातील.
ग्रामीण भागातील खेळाडूंपुढे नेमक्या याच गोष्टींची अडचण, कमतरता होती. त्यामुळे अनेकांना आपला खेळ अध्र्यातूनच सोडावा लागला होता. ती वेळ आता त्यांच्यावर येणार नाही.
वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धात आपली छाप सोडणारी आणि ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतर्गत पुण्यात दोन सुवर्णपदकांची कमाई करणारी नाशिकची धावपटू दुर्गा देवरेही या स्पर्धेचा दर्जा आणि सुविधा याबाबत समाधान व्यक्त करते.
वेगवेगळ्या सात देशांतील आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अनुभव गाठीशी असलेली दुर्गा सांगते, यापूर्वी देशांतर्गत आणि परदेशातही वेगवेगळ्या स्पर्धामध्ये मी सहभागी झाले आहे. यंदा पुण्यात झालेल्या यूथ गेम्सचा दर्जा खरोखरच उत्तम होता आणि सुविधाही आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धाना साजेशा होत्या. प्रत्येक खेळाडूला टू-थ्री स्टार सुविधा देण्यात आल्या. यापूर्वीच्या देशांतर्गत स्पर्धातील सुविधांचा अनुभव मात्र तितकासा चांगला नव्हता.
खेळाडूंचा स्तर उंचावण्यासाठी ‘खेलो इंडिया’ उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचं सांगतानाच काही शंका आणि प्रश्नचिन्हंही दुर्गाच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात.
दुर्गा सांगते, या योजनेमुळे खेळाडूंना प्रेरणा मिळेल; पण समजा नंतर सरकार बदललं, अस्थिर झालं, तर ही योजना पुढेही चालू राहील का? खेळाडूंना आठ वर्षे या सुविधा देण्याचं वचन सरकारनं दिलं आहे, नवीन सरकार ही योजना पुढे चालू ठेवील का? तसं जर झालं नाही, तर खेळ आणि खेळाडूंच्या आयुष्याशी तो खेळ होईल.
खेळात राजकारण आणू नये, किमान यापुढे तरी तसं होणार नाही, ही अपेक्षा; पण सध्या तरी खेळाडू हुडकणं आणि खेळासाठी त्यांना शक्य त्या सार्‍या गोष्टी पुरवणं याकडे सरकारनं लक्ष केंद्रित केल्याचं दिसतं आहे. ग्रामीण भागातले खेळाडूही त्यामुळे पुढे येताहेत. सर्वसामान्य लोकांमध्ये खेळांबद्दलची जागृती वाढते आहे. एवढं पुरेसं नसलं तरी त्यामार्गावरचा हा प्रवास खेळ, खेळाडू आणि खेळांबद्दलचं भारतातलं वातावरण नक्कीच बदलू शकेल. 

***
जिगर दाखवा आणि दरवर्षी घ्या पाच लाख रुपये!


* भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक स्पर्धात चमकावेत यासाठी ‘खेलो इंडिया’ या योजनेंतर्गत दरवर्षी प्रतिभावान एक हजार खेळाडूंची निवड केली जाईल.
* पुढील ऑलिम्पिक स्पर्धाचा विचार करून त्यांना दरवर्षी प्रत्येकी पाच लाख रुपयांची स्कॉलरशिप पुढील आठ वर्षार्पयत दिली जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षणही त्यांना मिळेल. 
* सन 2018 ते 2020 या काळात त्यासाठी 1756 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 
* ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धात पदकं मिळवली आहेत त्यांना आणि त्यांच्या कोचलाच यापूर्वी प्रोत्साहन म्हणून आर्थिक रकमेनं गौरवलं जायचं, आता स्थानिक स्तरावरील कोच आणि इतर घटकांनाही त्याचा लाभ मिळेल.
* या योजनेंतर्गत घेतल्या जाणार्‍या खेळांचा स्तरही आतार्पयतच्या स्पर्धापेक्षा खूपच उच्च असेल. 
* ग्रामीण भाग आणि तिथल्या खेळाडूंमध्ये मोठय़ा प्रमाणात टॅलेण्ट आहे, हे लक्षात आल्यानं ग्रामीण भागातही आता खेळासाठी उच्चस्तरीय सुविधा देण्यात येणार आहेत. 
* ग्रामीण भागात लवकरच अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वीमिंग पूल, फुटबॉल आणि हॉकीची सुसज्ज मैदानं आता पाहायला मिळतील.
* ठिकठिकाणच्या सिन्थेटिक अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकसाठी सात कोटी रुपये, सिन्थेटिक हॉकी फिल्डसाठी साडेपाच कोटी रुपये, सिन्थेटिक टर्फ फुटबॉल ग्राउण्डसाठी पाच कोटी रुपये, स्विमिंग पूलसाठी पाच कोटी रुपये, बहुउद्देशीय हॉलसाठी आठ कोटी रुपये, स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि स्पोर्टस डिस्ट्रिक्ट हेडक्वॉर्टरच्या बांधकामासाठी पन्नास कोटी रुपये. असा मोठय़ा प्रमाणात निधी खेळांसाठी मंजूर करण्यात आला आहे.
* देशभरातील निवडक वीस विद्यापीठे ‘क्रीडा नैपुन्य केंद्रे’ म्हणून विकसित केली जाणार आहेत. त्यामुळे प्रतिभावान खेळाडूंना खेळामध्ये करिअर करतानाच औपचारिक पदवी अभ्यासक्रमही पूर्ण करता येईल.
* या योजनेंतर्गत गेल्या वर्षीपासून प्रथमच खेळाडूंना मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्धीही मिळते आहे. या स्पर्धाचं टीव्हीवर रोज आठ तास प्रक्षेपण केलं गेलं.
* ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 3500 खेळाडू सहभागी झाले होते. यंदा बालेवाडी येथे झालेल्या स्पर्धेत 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील तब्बल दहा हजारपेक्षाही जास्त खेळाडूंनी भाग घेतला.

Web Title: Khelo India! news start with Hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.