पुणे ते सिंगापूर बाइकवरून १७000 किलोमिटरचा एक प्रवास
By Admin | Updated: February 19, 2015 20:19 IST2015-02-19T20:19:10+5:302015-02-19T20:19:10+5:30
पुणे-भुतान-म्यानमार-थायलॅण्ड -कंबोडिया-मलेशिया-सिंगापूर असा प्रवास करणार्या एका दोस्ताचा थरार अनुभव

पुणे ते सिंगापूर बाइकवरून १७000 किलोमिटरचा एक प्रवास
>हिनाकौसर खान-पिंजार -
बूमऽऽऽऽऽ बूमऽऽऽऽ बूम्बाट. बाइकला किक मारली की, सुसाट धावायचं. वेगाची नशा आणि त्यासाठी भटकंतीचा कैफ असला की वेगळे समीकरण तयार होतं. बाइकवरून अशी भटकंतीची आवड तर कित्येकांना असते; पण त्या भटकंतीला जर एखाद्या विचाराची जोड मिळाली तर तो अधिकच अर्थपूर्ण होतो आणि कधीकधी तर हा प्रवास एखादा विक्रमही घडवतो.
पुणेकर डॉ. सतीश पाटील या प्रवासवेड्या शास्त्रज्ञाची अशीच एक कहाणी. थक्क करणारा १७ हजार किलोमीटरचा प्रवास. बुलेटवरून ८ देशांची सफर करत आणि भिन्न संस्कृतीचा, विज्ञानाचा जवळून अनुभव घेऊन सतीश नुकताच परतला आहे. डॉ. सतीश आणि त्यांच्यासह ८ जण या बाइक सफरीवर गेले होते. प्रवास होता पुणं ते सिंगापूर! बाइकवरून निघायचं आपला देश ओलांडत, प्रवासात येणारी राज्यं, नवनवे देश, माणसं पाहत, त्यांच्याशी बोलत पुढं जायचं असं त्यांनी ठरवलं. ते निघाले आणि सलग ७१ दिवसांत त्यांनी हा पुणे, भुतान, म्यानमार, थायलंड, कंबोडिया-मलेशिया आणि सिंगापूर असा प्रवास पूर्ण केला.
सतीश सांगतो, ‘गुवाहाटी-नागालॅण्डमार्गे आम्ही मणिपूरला गेलो. मणिपूर आणि म्यानमार ही बॉर्डर लागून आहे. बॉर्डरवरचं शेवटचं गाव मोर्हे. ते गाव ओलांडून पलीकडे गेलं की, समोर म्यानमार. तिथं गेलो तर कसलातरी उत्सव सुरू होता. लोक नशेत शस्त्रास्त्र घेऊन रस्त्यावर नाचत होते. अशावेळी तुम्ही तिकडे फिरकू नका, ‘बाहेरचे’ म्हणून तुमच्या जिवाला धोका आहे, असं स्थानिक मित्रांनी सांगितलं. टेन्शन जाणवत होतंच. जिवाची भीती होती, परक्या नजरा होत्या. झारखंड, नागालॅण्ड, मणिपूर यासार्या टप्प्यात आपल्याच देशात ही असुरक्षितता जाणवली याचं वाईटच वाटलं! पण, पुढं शेजारी देशात मात्र बाइकवरून जग पहायला निघालेत म्हणत आम्हाला उत्तम आदरातिथ्य लाभलं.
म्यानमार, तिथून पुढे थायलॅण्ड, कंबोडिया, मलेशिया असा प्रवास त्यांनी केला. चकाचक रस्ते, शिस्त तर शहरात होतीच पण, खेड्यातही इको टुरिझम, इंग्रजी शिकण्याची धडपड जाणवली.’ असं सतीश सांगतो.
म्यानमार-थायलंड-क्वालांलपूर या प्रवासात रोज किमान चार तास त्यांना पावसात बाइक चालवावी लागली. पाऊस, तुफान वारा आणि अनोळखी रस्ते, परका देश यासार्यात बाइक चालवणं म्हणजे स्वत:चाच कस पाहणं होतं, असं सतीशला वाटतं; पण फक्त बायकिंगपुरता हा आनंद महत्त्वाचा नाही, तर आपल्यापेक्षा वेगळी संस्कृती, भाषा, लोकजीवन, दुसर्या देशातली खेडी, तिथलं जगणं, हे सारं प्रत्यक्ष पाहणं आणि अनुभवणं देखील आपल्याला खूप काही शिकवतं असं सतीश आणि टीमचं ठाम मत आहे.
--------------
आपली नजर बदलते!
सतीश पाटील -
‘‘आपली संस्कृती, आपली माणसं तर आपण समजून घेतो; पण त्यापलीकडेही जग आहे, इतर देशात काय सुरू आहे, त्या माणसांचं जगणं कसं बदलतंय, हे स्वत: प्रवास करत अनुभवलं तर नीट कळतं. आपली नजरच विस्तारत जाते. आपल्या शेजारी देशात राहणार्या माणसांची जीवनपद्धती, संस्कृती आपण प्रत्यक्ष पाहिली पाहिजे. देशोदेशी फिरताना हे जाणवतं की, आपली आणि या देशातील संस्कृती बर्याच अंशी सारखीच आहे. माणसांचं जगणं, आनंद, वेदना आणि पाहुण्या माणसाला मदत करण्याची वृत्तीही सारखीच आहे! मला वाटतं आपण आपली नजर बदलायची, आपलं आकलन वाढवायचं तर असे प्रवास हवेत, जे खर्या अर्थानं जग दाखवतात!’