समाजसेवा हेच करिअर असं ठरवलं तेव्हा भीती नाही वाटली?
By Admin | Updated: February 1, 2017 18:46 IST2017-02-01T15:41:04+5:302017-02-01T18:46:03+5:30
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब... या चक्रात फिरता फिरता तरुण मनांमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’

समाजसेवा हेच करिअर असं ठरवलं तेव्हा भीती नाही वाटली?
निर्माण आणि आॅक्सिजन
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब... या चक्रात फिरता फिरता तरुण मनांमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं.
गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७००हून अधिक मुला-मुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात,
त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे.
म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल...
त्यातला हा दुसरा प्रश्न :
मनासारखं जगायचं ठरवलं,मनासारखं काम आनंदानं करायचं ठरवलं, मग घाबरायचं कुणाला?
...त्यात कसली भीती
आयुष्यात जे मी त्या वेळी करत होतो तेच ते करत राहण्याची आणि आपणदेखील या सभोवतालच्या लोकांमधलेच एक होऊ याचीच जास्त भीती वाटत होती. कदाचित त्यातून मी जो पर्याय निवडला आणि जो त्यावेळी जास्त योग्य वाटला, आजही वाटतो; ज्याला बरेच लोक सोशल कॉज किंवा समाजसेवा म्हणतात. पण माझं स्वत:चं मत असं आहे की, मी काही समाजसेवा करत नाही कारण मी जे काही करतोय ते माझं आवडतं काम आहे. जर मला हे काम आवडलं नसतं तर कदाचित मी हे केलंच नसतं.
थोडक्यात, मी फक्त माझं फिल्ड बदललं बाकी काही नाही. एखादी व्यक्ती इंजिनिअरिंअची पदवी घेऊन एमबीए करते किंवा एमबीबीएस व इतर मोठमोठ्या पदव्या घेऊन तरुण यूपीएससी, एमपीएससीसाठी वर्षानुवर्षे घालतात त्यावेळी आपण त्यांना विचारत नाही की, का रे बाबा, तुला फिल्ड चेंज करताना भीती नाही का वाटली?
तुम्हाला जे काम आवडतं तेच जर तुम्हाला करायला दिलं तर त्यात तुम्ही जास्त रस घेऊन ते काम करता. मग मला जर लोकांत राहून त्यांच्या करता काम करायला आवडतं तर मग मी ते का करू नये?
मी आता सरळ मुद्द्यावर येतो. तर पहिला मुद्दा -मला भीती नाही का वाटली? तर हो, वाटली भीती. सगळं सोडून नवीन वाट शोधत वेगळं जाण्याची भीती वाटली. सुरुवातीला घरचा विरोध होता. कॉलेजपासून ते नोकरीपर्यंत सोबत असणाऱ्यांना मी वेडेपणा करतोय असं वाटत होतं, त्याची भीती वाटली. आपल्याला ज्या सेक्टरमध्ये जायचं आहे तिथं काहीच जमलं नाही तर परत येण्याचा मार्गदेखील कठीण होता, या साऱ्याची भीती वाटली. पण या सर्वांची भीती कुणाला नाही वाटत? तशी मला ही वाटली.
पण मी ज्या वेळी हा निर्णय घेतला त्यावेळी मला माहीत होतं की मला ज्या दिशेनं जायचं आहे ती दिशा नेमकी कोणती आहे आणि मला त्या दिशेनं जाताना मार्गदर्शन करणारे, साथ देणारे बरेच लोक दिसतही होते. ‘निर्माण’चे बरेच लोक आणि मार्गदर्शक सोबत होते आणि आपण एकटे पडणार नाही याची खात्री होती.
त्यात फायद्या-तोट्याचा जो विचार मी केला तो असा होता की, माझ्यावर माझ्या घरच्यांची आर्थिकदृष्ट्या डायरेक्ट अशी कुठली जबाबदारी नव्हती. वडील शिक्षक, घरी शेती आणि घरात आई-वडील व एकच बहीण. जेवढे उत्पन्न होते त्यामध्ये घरच्या पूर्ण गरजा भागत होत्या. म्हणून हा विचार करून मी हातात असलेली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. मला फक्त एवढंच कमवायचं होतं ज्यात माझ्या गरजा भागतील.
आता आधीचा महेश माझ्यात उरला नव्हता हे मला जाणवत होतं. पूर्वी दुकानात सर्वात महागडी, ब्रॅण्डेड गोष्टच मला आवडत असे. आता माझ्या गरजा बदलल्या. ‘मी अल्बर्ट एलिस’ सारख्या पुस्तकांनी मला शिकवलं की लोक काय म्हणतील याचा विचार करून आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागू लागतो. त्यापेक्षा लोकांना इग्नोर केलं तर आपण आपलं आयुष्य कमी गोष्टीत देखील सुखानं जगू शकतो. आज मी मागे वळून पाहतो तेव्हा मला लक्षात येतं की मी स्वत:चं घर, चारचाकी गाडी आणि बॅँकेत भरपूर पैसे नाही साठवू शकलो; पण आज जे मित्र, जो अनुभव आणि जे काम व त्याचा आनंद माझ्या जवळ आहे तो या सर्वांपेक्षा मोठा आहे.
- महेश लादे,
निर्माण ४
महेश सध्या येथे प्रोग्राम को-आॅर्डनेटर या पदावर कार्यरत आहे.
पैसा म्हणजे करिअर
कुणी ठरवलं?
चार भिंतीत कोंडून स्वत:साठी पैसा कमावणं
याचीच खरं तर भीती वाटली पाहिजे...
वयाच्या तेविसाव्या वर्षी, नोकरी न करता पूर्णवेळ सामाजिक प्रश्नांवर काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी कंपनी सेक्रेटरीच्या (सीएस) फायनलला होतो आणि पुण्यात असलेली चांगल्या पगाराची नोकरी नुकतीच सोडून जळगावला परत आलेलो होतो. सगळ्यांसाठीच तो एक धक्काच होता. बक्कळ पैसा कमावण्याची संधी देणारी एक चांगली नोकरी आणि शिक्षण मी सोडतोय म्हटल्यावर माझ्या आई-वडिलांव्यतिरिक्त जवळ जवळ सगळ्यांनीच मला मुर्खात काढलं होतं. (काही अजूनही काढतात!)
सामाजिक प्रश्नांवर काम करण्याचा निर्णय मी घेतला तेव्हा मला त्यातल्या फायदा-तोट्यापेक्षाही कामात मिळणारं समाधान जास्त महत्त्वाचं वाटलं. आत्मकेंद्री आयुष्य झुगारून जेव्हा तुम्ही समाजात मिसळता तेव्हा तो समाज खुल्या दिलाने तुम्हाला स्वीकारतो. तुमच्या अडचणी, तुमची दु:खं फक्त तुमच्या एकट्याची राहत नाहीत, त्यांना वाहून घेणारे असंख्य हात तुमच्या जोडीला उभे असतात. मग फायदा-तोटा तुम्हाला पैशात मोजताच येत नाही.
आज सुमारे ७ वर्षे झाली मी सामाजिक क्षेत्राशी जोडलेलो आहे. पण मी सीएस सोडलं याचं मला अजिबात वैषम्य नाही, उलट फक्त पैसा, स्पर्धा आणि सत्तेच्या दुष्टचक्र ात मी अडकून पडलो नाही याचा मला आनंदच आहे.
आज फक्त शनिवार-रविवारी मिळणाऱ्या सुटीची वाट पाहत सोमवार ते शुक्र वार काम ओढायचं असं करणारे असंख्य तुम्हाला मिळतील. पण सामाजिक प्रश्नावर काम करताना तुम्हाला दिवसाचं, वारांचं, तारखेचं महत्त्वच राहत नाही. येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येतो, तुम्हाला नवीन काहीतरी शिकवून जातो. तुमचं जगणं समृद्ध करून जातो. हा एकप्रकारे फायदाच नाही का?
अद्वैत दंडवते,
निर्माण ४
(अद्वैत त्यानेच सुरू केलेल्या ‘वर्धिष्णू’ या संस्थेमार्फत जळगावमधील कचरा वेचणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करतो.)
फार फार तर काय होईल ?
मी आयटी मध्ये जॉब करत होतो. ते सोडून एखाद्या सामाजिक संस्थेत काम करू असा निर्णय घेतांना मी काय विचार केला? तर दोन ठळक गोष्टी वाटल्या .
पहिलं तसं सरळ आणि जास्त व्यावहारिक होतं. मला माझं आयटीतील काम चॅलिंजिंग वाटतं नव्हतं. ते सोडून काहीतरी वेगळं करायला लागणारं आर्थिक स्थैर्य घरी होतं. सामाजिक क्षेत्रात आव्हान आहे, ते चांगलं करिअर आॅप्शन आहे असंही वाटलं. आता हे वयाच्या २३व्या वर्षी करणं तुलनेनं सोपं असेल असं ठरवलं अन् नोकरी सोडली.
दुसरं कारण खोल आणि तसं शोधायला अवघड होतं . फक्त आयटी पेक्षा वेगळं काम म्हणून हॉटेलं का नाही टाकत ? तसं स्वयंपाक करायला मला आवडतं. मग सामाजिक कामच का? या प्रश्नांवर विचार केला. घरच्या मूल्यांचा आणि निर्माण प्रक्रि येचा फायदा निर्णय प्रक्रियेमध्ये झाला. मला खूप मिळालंय, माझ्या आजूबाजूच्या लोकांचं मी काहीतरी देणं लागतो ही भावना खूप खोलवर भिनली होती. त्यामुळे फक्त माझी आवड आणि स्वभाव यावरून निर्णय घेण्यापेक्षा, एकंदर समाजाप्रती माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे आणि ते करायलाच पाहिजे असं वाटलं.
त्यामुळे भीती वाटली नाही. वयाने लहान होतो आणि खात्यात आपकमाईचे पैसे होते. इथे २ मंत्र कामात आले. फार फार तर काय होईल ? आणि तरी बरं ! फार फार तर मी परत आयटीला येईन किंवा काहीच जमलं नाही तरी गावी शेती तर आहेच असं वाटलं. माझ्याजवळ पैसे-काही कौशल्य आहेत. घरचे समजून घेतात. मग का नाही करायचं असं ठरवून मी ‘सर्च’ जॉईन करायचं ठरवलं.
उमेश जाधव, निर्माण ५
ऋतगंधा सर्च संस्थेत रिसर्च विभागात रिसर्च असोसिएट या पदावर कार्यरत आहे.
काय करायचं नाही, हे नेमकं ठरवलं..
वयाच्या २३व्या वर्षी ठरवलं की आयुष्यात आपल्याला ‘नेमकं काय करायचं नाहीये’. जसं की, बायोटेक्नॉलॉजीच्या कंपनीजमध्ये काम करायचं नाहीये, फक्त चार भिंतीत बसून आणि समाजापासून तुटून कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाहीये आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे मी करत असलेलं काम हे पैसा मिळवण्यासाठी नसेल तर माझ्यापेक्षा कमी संधी असणाऱ्यांसाठी असेल. जेणेकरून हा वर्ग माझ्यापर्यंत किंवा त्याहीपुढे जाण्यास मदत होऊ शकेल.
आणि खरंतर त्यामुळे बहुसंख्य मुली-मुले ज्याला ‘चौकटीतलं सुरक्षित आयुष्य’ म्हणून संबोधतात त्याची करिअर म्हणून निवड न करताना खूप भीती वाटली नाही. मग ‘काय करावं’ हे ठरवायला थोडं सोपं गेलं. जीवन जगताना ‘समाधान’ आणि ‘आनंद’ याला प्राधान्य असल्याने कामात पडण्याचा निर्णय घेताना आणि कामात पडल्यावर फारशी भीती जाणवली नाही. हे ठरवताना दिशा नक्कीच अस्पष्ट होत्या पण निर्णय मात्र ठाम होता, त्यामुळे तो होऊन गेला.
प्रामाणकिपणे सांगायचं म्हणजे कुटुंबात खूप श्रीमंती नव्हती पण समाधान मात्र नक्की होते. त्यामुळे पैशापेक्षा समाधान जास्त महत्त्वाचे असते हे लहानपणीच रूजलं असल्याने ‘कामात पडली तर फार कमी पैशात जगावं लागेल’ याचा विचार खूप कमी वेळा मनाला शिवला. कामात पडल्यावर मात्र विचारपूर्वक बऱ्याच अनावश्यक गरजा कमी केल्या आणि त्यामुळे ‘कामात पडून मी आयुष्य पणाला लावतेय’ ही भावनाही मनात आली नाही. त्यावेळी घेतलेल्या निर्णयाने आज खूप समाधानी असल्याने काम करताना असुरक्षितता नाही जाणवत.
प्रणाली सिसोदिया, निर्माण ७
प्रणाली सध्या ‘कुमार निर्माण’ या उपक्रमाची समन्वयक आहे.
करिअर नाही, करिअरचा मार्ग बदलला
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला पुण्यातील कंपनीमध्ये जॉब लागला. येथे काम करत असताना नवीन नवीन मला खूप मजा येत होती व नवीन शिकायला मिळत होते. पण सहा ते आठ महिन्यानंतर रोज तेच तेच काम व साईटवर मजुरांना शिव्या देऊन काम करु न घेणे नको वाटत होते. या सगळ्या गोष्टीमुळे मला काय करायचे नाही हे तर नक्कीच समजले होते व त्यामुळे काय करायला हवे या दिशेने प्रवास तरी चालू झाला.
जॉब सोडल्यानंतर मला समाजासाठी काहितरी करायचे आहे हा विचार जास्त न करता, सुरूवातीला मला नक्की काय करायचे व मी काय काय करु शकतो याचा शोध घेऊ लागलो. जेणे करून माझा दिनक्र म पुन्हा पहिल्यासारखा होणार नाही.
याच दरम्यान निर्माणच्या एका शिबिरात विवेक सावंत सरांच्या एका लेक्चरचा माझ्यावर खूप परिणाम झाला. त्यानंतर मला स्वत:ला प्रश्न पडू लागले की आपण जे काम करतोय याचा फायदा फक्त १० ते २० टक्के शहरातील लोकांनाच होतो. तो बाकीच्यांना कसा होईल? आपण काय काय करु शकतो हे शोधण्यासाठी ‘करके देखो’ या धर्तीवर मी नाशिक मधील प्रगती अभियान बरोबर काम चालू केले.
अगोदर मी गावातून कामासाठी शहरात यÞेणाऱ्या लोकांकडून शिव्या देऊन साईट वर काम करत होतो तर आता याच स्थलांतरीत होणाऱ्या मजुंराना त्यांच्याच गावात काम कसे मिळेल व तसेच त्यांच्या गावात पाणलोटाची कामे करून त्यांचा पाणी प्रश्न कसा कमी होईल हे काम करतो. (एवढाच काय तो फरक!)
त्यामुळे मला तरी असे वाटते की मी माझे करिअर न बदलता फक्त करिअरचा मार्ग बदलला व थोडीफार पगारामध्ये तडजोड केली. त्यामुळे आपण सगळे सोडून काहीतरी वेगळे करतोय असे कधी वाटलेच नाही त्यामुळे भिती कधी वाटलीच नाही.
महत्वाचे म्हणजे मी जर पहिल्याच जॉबमध्ये खुश असतो तर या कामाकडे आलोच नसतो, त्या कामामध्ये खुश नसल्यामुळे मला काय करायला आवडेल याचा शोध घेतला गेला व त्यामध्ये मी माझ्या फायद्याचाच विचार केला असे मला वाटते.
शेवटी आपल्याला काय येते/आवडते (आपलं स्कील) व आपण काय काय करु शकतो तसेच लोकांचे प्रश्न व त्यांची गरज काय आहे यांची जर सांगड घातली तर आपले बरेच प्रश्न आपोआप सुटू शकतात.
अजय होले, निर्माण ४
अजय सिव्हिल इंजिनिअर आहे आणि प्रगती अभियान, नाशिक या संस्थेत रोजगार हमी या विषयावर काम करतो.
उत्तरं नाही, प्रश्न समजलेत!
कॉलेजमधल्या इतर सगळ्या मित्रांनी एकतर चांगल्या कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली किंवा उच्च शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला. त्यावेळी बऱ्याच वेळा वेगवेगळे विचार मनात यायचे. आपलं कसं होणार? सगळे मित्र माझ्यापुढे तर निघून जाणार नाहीत ना? मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल की नाही? नंतर बऱ्याच दिवसांनंतर लक्षात आले की, या सगळ्या विचारांच्या मागे एकच मोठा विचार होता की मला पुरेसे पैसे कमावता येतील का? हा मूळ प्रश्न जेव्हा लक्षात आला तेव्हा त्याच्या उत्तराच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आणि मग आणखी चांगले पर्याय सापडू लागले. आयुष्यात यश म्हणजे पैसा हे समीकरण किती चुकीचं आहे हे जाणवायला सुरु वात झाली. लवकर चांगली नोकरी, भरपूर पैसा, वयाच्या तिशीमध्ये स्वत:चं घर, ऐषोरामात आयुष्य म्हणजे यश या विचारामधील पोकळपणा तेव्हा जाणवायला लागला. या सगळ्यांपेक्षा मी कोणत्या प्रश्नावर काम करतो आहे आणि तो सोडवल्यामुळे किती जणांना फायदा होणार आहे हे मला जास्त महत्वाचं वाटलं. पूर्ण प्रश्न सोडवायला किती वेळ लागेल हे मला आजही माहित नाहीये. पण त्याची चिंता करावीशी वाटत नाही. माझ्या बुध्दीप्रमाणे आणि कुवतीनुसार ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या सगळ्या मी हा प्रश्न सोडवण्यासाठी वापरणार आहे. या क्षेत्रामधील माझे ज्ञान वाढवण्यासाठी पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे. त्यामुळे अजून किती वर्ष लागतील हा प्रश्न माझ्यासाठी तितकासा महत्वाचा नाहीये. मी रोज जे काम करतो आहे ते हा प्रश्न सोडवण्याच्या दिशेने आहे की नाही हे बघणे नक्कीच महत्वाचे आहे. स्पर्धा हा एक विचार सोडला तर मग दरवेळी फायद्यातोट्याचा विचार मनात येत नाहीये.
मला आता ५ वर्षानंतर असं वाटतंय की, सामाजिक प्रश्नावर काम करायचं ठरवलं तेव्हा माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नव्हती. काही प्रश्नांची आजही नाहीयेत. पण एक नक्की वाटतं की, संपूर्ण आयुष्य कसं जगायचं आणि कोणत्या वर्षी काय काय करायचं असं नियोजन करून ठेवण्यातही काहीच मजा नाहीये. यापुढेही कामाबद्दलचे आणि जगण्याबद्दलचे प्रश्न असणारच आहेत. पण ते त्या त्या वेळी विवेकबुध्दीचा वापर करून सोडवू असं ठरवलंय.
मयूर सरोदे निर्माण ४
प्रश्नोत्तरांचं हे प्रकरण फार कठीण नाहीये. ‘निर्माण’ आणि‘आॅक्सिजन’ यांच्यातला पूल असेल आकाश भोर. आकाश स्वत: निर्माणच्या पाचव्या बॅचमध्ये होता आणि सध्या तो गडचिरोलीलाच सर्चमध्ये काम करतो आहे. तुमचे प्रश्न आकाशला थेट कळवा. त्यासाठी ई-मेल : nirman.oxygen@gmail.com यातल्या निवडक प्रश्नांच्या निमित्ताने होणारा संवाद आॅक्सिजनच्या अंकात वाचायला मिळेल. आणि उरलेल्या गप्पांचा आॅनलाइन कट्टा असेल www.lokmat.com/oxygen इथे!!!