त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, सांगा, तुमचं काय गेलं?
By Admin | Updated: February 5, 2015 20:02 IST2015-02-05T20:02:37+5:302015-02-05T20:02:37+5:30
असा रोकडा सवाल विचारणारी कविता मंगेश पाडगावकरांनी लिहिली तेव्हाची तरुण पिढी आणि आजचं तारुण्य यांच्या जगण्यात खरं तर किती तफावत आहे..

त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, सांगा, तुमचं काय गेलं?
ऑक्सिजन टीम -
असा रोकडा सवाल विचारणारी कविता मंगेश पाडगावकरांनी लिहिली तेव्हाची तरुण पिढी आणि आजचं तारुण्य यांच्या जगण्यात खरं तर किती तफावत आहे..
पण तरीही आजही ‘प्रेम’ आणि ‘लग्न’ या दोन विषयात तरुण पिढी त्याच त्या जुन्या प्रश्नांशी झगडते आहे. घरच्यांचा विरोध, समाजाची मान्यता, जातीपातीचे प्रश्न, सामाजिक विरोध आणि बहिष्काराच्या तलवारी हे सारे प्रश्न शहरी भागात थोडेबहुत निवळलेले दिसत असले तरी ग्रामीण आणि निमशहरी भागात आजही हे काच तरुण मुलांना छळताहेत.
प्रेमाला विरोध, इमोशनल ब्लॅकमेल, जाणत्या मुलांना मन मारायला लावून मनाविरुद्ध लग्न करायला भाग पाडणं हे सारं तर आपल्याकडे सर्रास होतंच..
पण आता नव्या टेक्नॉलॉजीचा वापरही प्रेमात पडणार्यांच्या बदनामीसाठी होऊ लागला तर?
त्याचंच एक उदाहरण म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या एका प्रेमात पडलेल्या तरुणीला काही लोकांनी बेदम मारण्याचा व्हिडीओ. तो इतका व्हायरल झाला की, राज्यात अनेक तरुणांच्या हाती पोहोचला. त्यांनी पाहिला.
त्यातून पुण्यातील एक तरुण ग्रुप खवळला आणि त्यांनी एक रॅलीच काढली. समाजाला ठणकावून सांगितलं की, आम्हाला प्रेमात पडण्याचा अधिकार आहेच. तुम्ही कोण आमचा अधिकार नाकारणारे.
मूळचे ग्रामीण भागातले, पण आता शिक्षणासाठी शहरात राहणारे अनेक तरुण मुलंमुली या रॅलीत सहभागी झाले. त्यांचं म्हणणंच होतं की, ‘आज प्रेमात पडणं, उद्या ब्रेकअप परवा नवीन रिलेशनशिप या शहरी तारुण्याच्या सहज आयुष्याला आमचं जगणं कळतही नाही. आजही ग्रामीण भागात मनापासून आवडलेल्या व्यक्तीची आपल्या जगण्याचा जोडीदार म्हणून निवड करण्याचं स्वातंत्र्य नाही, आम्ही अजूनही कुटुंब आणि समाज यांच्यासाठी मन मारूनच जगावं लागतं. हे सारं कोण समजून घेणार? शहरी समाजच नाही तर शासनाला आमची ही कुचंबणा कधी कळणार?’
असे प्रश्न अनेक..
एकीकडे जगभर व्हॅलेण्टाइन वीक अर्थात रोमॅण्टिक साजरा होतो..
भारतीय बाजारपेठाही प्रेमाच्या उत्सवाचं सेलिब्रेशन करतात..
त्यासाठी सजतात..
आणि त्याच समाजातली बहुसंख्य ग्रामीण तारुण्य प्रेमात पडणं पाप आहे की गुन्हा असं वाटावं इतका समाज त्यांना छळतो..
या विरोधाभासात. कसं रुजावं प्रेम?
आणि कशी मिळावी उभारी प्रेमात पडून मनासारखं जगण्याची स्वप्न पाहणार्या तरुण मुलांना?
- याच प्रश्नांची विशेष चर्चा..
भेटतील काही अस्वस्थ धास्तावलेले प्रश्न..