तांडोर गावचा हर्षल युपीएससी टॉप करतो तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 01:02 PM2019-11-07T13:02:30+5:302019-11-07T13:10:43+5:30

तांडोर. जेमतेम दोनच महिने झाले या गावात एसटी यायला लागली. अजूनही गावात एक साधं हॉटेल नाही. शिकलेल्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच. शेतीत मोलमजुरी करूनच इथं माणसं प्रपंच चालवतात. विकासाचं वारं या गावार्पयत अजून पोहोचलेलंच नाही. त्या गावातला एक मुलगा यूपीएससीच्या आयईएस परीक्षेत देशात पहिला येतो तेव्हा त्याच्या यशाची गोष्ट फक्त त्याचीच नसते, तर ती सार्‍या गावाची असते.

Harshal Bhosale, a young man from small village tops UPSC | तांडोर गावचा हर्षल युपीएससी टॉप करतो तेव्हा.

तांडोर गावचा हर्षल युपीएससी टॉप करतो तेव्हा.

Next
ठळक मुद्देजिथं विकास पोहोचला नाही, तिथं स्वप्न कशी रुजली हे सांगणारा एक खास रिपोर्ताज

   मल्लिकार्जुन  देशमुखे, 

सोलापूर जिल्ह्याच्या अगदी टोकावर कर्नाटक सीमेलगतचं हे गाव. मंगळवेढा तालुक्यातलं, गावाचं नाव तांडोर. या लहानशा गावाचं नाव एरव्ही कुणाला कळलंही नसतं; पण एकाएकी या गावाचं नाव माध्यमांत झळकलं. त्याचं कारण असं की, याच गावचा एक मुलगा हर्षल भोसले; यूपीएससीच्या परीक्षेत देशात प्रथम आला. यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या आयईएस या परीक्षेत त्यानं देशात पहिला येण्याचा मान पटकावला. हर्षलच्या या उत्तुंग यशानं केवळ मंगळवेढा तालुक्याचंच नव्हे तर या गावाचंही नाव झालं. ज्या गावात राहणार्‍या साध्या भोळ्या माणसांना यूपीएससी परीक्षा काय असते हेही नीट माहिती नाही, त्या गावातला पोरगा देशात पहिला येतो. त्यामुळे मोठ्ठा साहेब तो होऊ शकतो, याचं किती अप्रूप असणार! 
ग्रामीण भागात नसलेल्या सेवासुविधांचा कसलाच बाऊ न करता हे गाव आपल्या लेकाचं यश साजरं करत होतं, पण ते यश सार्‍या गावाचं कसं झालं हे शोधतच आम्ही त्या गावाकडे निघालो.
एकटय़ा हर्षलची ही गोष्ट नाही, तर त्याच्या आईच्या कष्टाची आहे तशी एका गावाचीही आहे. ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’च्या वतीनं घेण्यात येणार्‍या ‘भारतीय अभियांत्रिकी सेवा’ परीक्षेत एका छोटय़ा गावातील तरुण देशात पहिला येतो, ही ग्रामीण भागासाठी खूप मोठं यश. तांडोर गावाकडं जाणारा पाच किलोमीटरचा रस्ता, त्या रस्त्यानं निघालो तर जेमतेम पाच किलोमीटर जायला तब्बल पंचवीस मिनिटांहून जास्त वेळ लागला. रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय. म्हणजे रस्ता नसल्यातच जमा. वाटेत दोन किलोमीटर तर खडीच खडी. टायर कट होईल या भीतीनं गाडी जाते फक्त वीसच्या स्पीडनं.
कसेबसेच पोहोचलो. 
गावाजवळ असणार्‍या वेशीतून आत प्रवेश केला, तर गावात तसा शुकशुकाटच होता. गावात केवळ 30 ते 40 घरं. बरेचजण शेतात वस्ती करून राहणारे. जेमतेम 15 -20 माणसं दिसली. तीही गावालगत असणार्‍या हनुमान मंदिराजवळ बसलेली होती. त्यातही काही वडीलधारीच होती, निवांत गप्पा मारत होती. त्यांच्याशी बोलता बोलता कळलं की जेमतेम दोन महिने झाले गावात एसटी यायला लागली. तोवर तर एसटीही येत नव्हती. अजूनही गावात एक साधं हॉटेल नाही. शिकलेल्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच. अनेकजण शेती करून प्रपंच चालवतात. विकासाचं वारं काही या गावार्पयत अजून पोहोचलेलंच नाही.
आणि त्या गावात लहानाचा मोठा झालेला हा हर्षल. त्याच्या गावी, त्याच्या घरी निघालो होतो तर वाटेत भेटलंच त्याचं हे असं विकासाच्या वाटेत मागेच राहून गेलेलं हे गाव.
गावात पोहोचताच मंदिराच्या कट्टय़ावर बसलेल्या सोमण्णा मळगे या 70 वर्षाच्या आजोबानं विचारलं, ‘पाहुणं कुठले आहात. कोण पाहिजे?’ 
त्यांना म्हटलं, ‘तुमच्या गावचा हर्षल देशात पहिला आलाय. त्याच्या यशाची पेपरात स्टोरी छापायची म्हणून तुम्हाला नी त्याला भेटायला आलोय.!’ 
हे ऐकताच सारी माणसं खूश झाली, डोळे चकाकलेच त्यांचे, ते पटकन कौतुकानं म्हणाले, ‘तो सोन्या व्हय? अहो. त्या सोन्याच्या माउलीनं लय हाल -अपेष्टा सोसल्यात; पण सोन्यानं आईच्या कष्टाचं सोनंच केलं बगा.’
    हर्षल ऊर्फ गावकर्‍यांचा सोन्या. त्यानं कोणती तरी साहेब होणारी मोठी परीक्षा पास केली हे त्या आजोबांना नी त्यांच्या मित्रांना माहिती होतं. आणि सुपाएवढं काळीज करून ते आपल्या गावच्या पोराचे कष्ट नी यश सांगत होते. आईच्या कष्टांचं पोरानं चीज केलं म्हणत होते. 
हर्षलची आई कमल भोसले. त्यांना गावात शेतीत राबताना किती कष्ट पडले असतील हे गावचा नूरच सांगत होता. त्यात कुटुंब मोठं. हर्षल आणि त्याच्या पाच बहिणी असं हे कुटुंब. या मुलांना शिकवायचं हेच त्या माउलीचं ध्येय होतं; पण परिस्थितीच अशी की साधं शिक्षण घेण्याइतपतही घरची परिस्थिती नव्हती. एकेका रुपयासाठी त्याची आई शेतात राबत होती. 
आर्थिक परिस्थिती हलाखीची, कौटुंबिक ओढाताण, घरात दोन वेळच्या अन्नाची भ्रांत. त्यात वडिलांचे छत्र नाही, अशी  बिकट परिस्थिती. खासगी टॅक्सीवर ड्रायव्हर म्हणून काम करणारे त्याचे वडील ज्ञानेश्वर भोसले अकाली गेले. घरात खाणारी तोंडं जास्त आणि कमावणारा कोणीच नाही अशी परिस्थिती या कुटुंबावर ओढवली. पण हर्षलची आई अवसान गाळून बसली नाही. त्यांनी कुटुंबाची कमान हाती घेतली. जे जमेल ते काम करून प्रसंगी मजुरी करून त्यांनी घर सावरलं. त्यात  हर्षलनं सातवीर्पयत शिक्षण घेतलं. त्यामध्ये त्यानं चौथीर्पयत गावात तर पाचवी व सहावी मंगळवेढा इंग्लिश स्कूलमध्ये तेथील वसतिगृहात राहून एकेक वर्ष तो पुढं सरकला.
मात्र त्यालाही आपल्या आईचे कष्ट पाहवत नव्हते. तिची खूप ओढाताण होतेय म्हणून त्यानं सातवीत असताना शाळाच सोडून दिली होती. एक वर्षभर त्यानं शाळेत जाणं बंद केलं. आईबरोबर खुरपणीला तो जायचा. मोलमजुरी करायचा.  घरची चार एकर शेती सांभाळून बहिणींनी शिकावं म्हणून राबू लागला. पण त्यावेळी त्याच्या आईनं त्याला सांगितलं की, ‘तू शाळा शिक. तुझ्या शाळेला कितीपण खर्च येऊ दे. मी करते, तू शाळा सोडू नको.’ 
   मुलगा असो की मुलगी कोणीही शिक्षण सोडू नये ही हर्षलच्या आईचीच इच्छा. त्यासाठी त्यांनी कष्ट केले. 
यादरम्यान सिद्धापूर येथील चौगुले सरांची भोसले कुटुंबासोबत भेट झाली. त्यांनी हर्षलला देगाव येथील आश्रमशाळेत अ‍ॅडमिशन घेऊन दिली. एक वर्षानंतर त्याची पुन्हा शाळा सुरू झाली. शालेय शिक्षणानंतर त्यानं बीडच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला.
उत्तम गुण मिळवून त्यानं डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पदवीनंतर लगेच त्याला भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिथल्या प्रशिक्षणानंतर तो ऑईल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये रुजू झाला आणि स्पर्धा परीक्षेची तयारीही त्यानं तिथंच जोमानं सुरू केली. इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षाला असतानाच त्यानं ठरवलं की स्पर्धा परीक्षाही देऊ. तिसर्‍या आणि चौथ्या वर्षाचा अभ्यासक्र म इंजिनिअरिंग सव्र्हिसेसच्या परीक्षांसाठी महत्त्वाचा असतो, त्याकाळात त्यानं हा अभ्यासही जोमानं केला. पुढे काही काळ दिल्लीतही क्लास लावला, मात्र स्वतर्‍ जास्तीत जास्त अभ्यास करत राहिलो हे आपलं यश असल्याचं हर्षल सांगतो.
आज त्याचं सारं गाव त्याचं यश आपलंच म्हणत साजरं करत आहेत. त्याचे मित्र आणि माजी सैनिक तायप्पा मळगे सांगतात, अभ्यास व शेतातील काम याशिवाय त्याला दुसरं वेड नव्हतंच. आज त्याच्या कष्टांचं चीज झालं.
त्या कष्टांचा आनंद आणि यशाचं तेज आज सार्‍या गावात पदोपदी भेटतंय.

*************

 घरकुलाचा आधार..
हर्षलला राहायला चांगलं घर नव्हतं. त्यावेळचे सरपंच सिद्धेश्वर गायकवाड यांनी 2011-12 साली इंदिरा घरकुल आवास योजनेतून घर घेण्यात त्यांना मदत-मार्गदर्शन केलं. आणि तेव्हा कुठं निदान डोक्यावर छप्पर तरी आलं!  


उसाची लागवड नी सिलेक्शन
हर्षलची आई रोज पाच किलोमीटर पायी चालत शेताला जातात. कधी रात्री लाइट असेल तरीसुद्धा शेतात पाणी भरायलाही थांबतात. त्यांनी शेतात कधी कामाला मजूर लावले नाहीत. उलट शेतीवर सर्व संसाराचा गाडा चालत नसल्याने मोलमजुरीसाठी दुसर्‍याच्या शेतावरही कामाला जात. हर्षलचा यूपीएससीचा निकाल लागायचा होता. त्याकाळात तो गावी आला होता. त्यानं आणि आईनं मिळून त्याच काळात चार एकर उसाची लागवड केली. निकाल लागायच्या दोन दिवस अगोदर हर्षल आईसोबत स्वतर्‍ दोन एकर ऊससुद्धा खुरपून काढला. शेतीत काम केलंच पाहिजे, आपण नाही तर कोण करणार, असं हर्षल म्हणतो.

. मग घेतला पहिला स्मार्टफोन
    हर्षलच्या वयाची तरुण मुलं किती स्टायलिश राहतात. अभ्यास करायचा तर केवढय़ा गोष्टी मागतात. पण हर्षलकडे हे सारं नव्हतंच. मनगटावर ब्रँडेड घडय़ाळ नाही, अभ्यासासाठी स्वतंत्र खोली नाही, टेबल-खुर्चीचा तामझाम नाही आणि लिहायला महागडा पेनसुद्धा नाही. पेन्सिल, खोडरबरापासून गणित, विज्ञानातील आकृत्यांसाठी उपयोगी पडणार्‍या पट्टीर्पयत बर्‍याच गोष्टी त्याच्याकडे नव्हत्या. ज्या होत्या त्या त्यानं कायम पुरवून वापरल्या. एकेक रुपया कमावण्यासाठी आईला किती कष्ट पडतात हे तो कधी विसरला नाही. त्यामुळे आपल्याकडे स्मार्टफोनच हवा असा त्याचा आग्रहही कधी नव्हता. आता यूपीएससीचा निकाल लागल्यानंतर त्यानं स्मार्टफोन घेतला. 
--------------

 तीन ‘सी’ हवेत!
हर्षलला विचारलंच की तुझ्या यशाचं सूत्र सांग. तर त्याचं उत्तर एकच, पुस्तकांशी मैत्री. तो म्हणतो, पुस्तकांशी इतकी घट्ट मैत्री करायला हवी की पुस्तकं सोबत नसली तर करमतच नाही. आणि याशिवाय हव्यात आपल्यासोबत कायम तीन गोष्टी. तीन सी.  करेज, कॉन्फिडन्स आणि कॉन्सन्ट्रेशन. धैर्य-आत्मविश्वास आणि एकाग्रता.!’
कष्ट आणि परिस्थिती यांच्यापुढे न वाकता, न हारता एकचित्त होऊन हर्षल अभ्यास करत राहिला, त्याचं फळ त्याला मिळालं हे तर उघडच आहे.
 


( लेखक लोकमतचे मंगळवेढा येथील वार्ताहर आहेत.)

Web Title: Harshal Bhosale, a young man from small village tops UPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.