आझाद परिंदा
By Admin | Updated: October 15, 2015 17:57 IST2015-10-15T17:57:49+5:302015-10-15T17:57:49+5:30
अक्रम फिरोज त्याचं नाव. त्याच्या खिशात दोन-तीनशेच रुपये असतात; पण तो प्रवासाला निघतो, कधी पायी, कधी सायकलवर, कधी लिफ्ट मागत, मिळेल तिथं राहतो. त्याची एकच इच्छा मला जग पहायचंय, जगभर फिरायचंय, माणसांना भेटायचंय..

आझाद परिंदा
>‘वर्ल्ड विदाउट बॉर्डर्स, बिना सरहदो की दुनिया’ यही मेरा सपना है, और इसीके लिए एक आझाद पंछी की तरह मै जीता हूॅँ, कोई मुङो पागल कहता है, कोई दिवाना. मुङो इससे फर्क नही पडता. मैने अपनी अंदर की दिवारे कब की तोड दी है !’ - काही शब्दात अक्रम फिरोझ स्वत:चं स्वप्न, ध्येय आणि जगण्याची पद्धत सांगून जातो.
तेलंगणातलं करीमनगर नावाचं एक छोटंसं शहर. तिथे वाढलेला, शिकलेला अक्रम फिरोझ आपल्या पदवीच्या शिक्षणासाठी हैदराबादमध्ये गेला. तिथे त्याला काही मित्र भेटले. मित्रंच्या गप्पा गोष्टीत ‘वॉकिंग अक्रॉस द वर्ल्ड’सारखा विषय निघाला. आणि या एका विषयानं अक्रमला पुरतं झपाटून टाकलं.
एखादं गाव, शहर फिरावं तसं अख्खं जग फिरायला काय हरकत आहे. कोण आपल्याला अडवणार? असा विचार करताना त्याला आजूबाजूला दिसणा:या न दिसणा:या अनेक सीमांची जाणीव झाली. पदवीचं शिक्षण अर्धवट सोडून तो भटकायला निघाला. आधी त्यानं आपल्याच देशातल्या गावागावांच्या सीमा लांघायचं ठरवलं. फिरणं, जग पाहणं याबरोबरच त्याला लोकांना काही द्यावसंही वाटत होतं. त्यानं त्यासाठी थिएटरचा उपयोग करण्याचं ठरवलं. ‘सायकल नाटक’ करत करत तो गावागावात फिरला. दहा हजार किलोमीटरचा सायकलवरच्या प्रवासानं त्याला खरं जग पाहायला, अनुभवायला मिळालं.
सोबतीला दोन ड्रेस, एक लॅपटॉप आणि खिशात दोन-तीनशे रुपये घेऊन निघालेल्या अक्रमला परक्या गावात, परक्या लोकांमध्ये जगताना कोणतीच अडचण आली नाही. त्यानं स्वत:च्या मनातला लोकांविषयीच्या परकेपणाच्या भावनेला हद्दपार केलं होतं. अनोळखी लोक त्याला मदत करत होते, त्याला आपल्या घरात राहू देत होते. धाबेवाले जेवू घालत होते.
या अनुभवावरचं त्याचा ‘वर्ल्ड विदाउट बॉर्डर्स’चा प्रवास सुरू झाला. देशाच्या चारी दिशांच्या बॉर्डर्सवरच्या गावागावात जायचं आणि तिथे ‘इनव्हिजिबल थिएटर’चा प्रयोग करायचं त्यानं ठरवलं. ब्राझीलमध्ये अस्तित्वात आलेली नाटकाच्या जगातली ही संकल्पना. नाटक सादर करायचं ते थिएटरमध्ये. पण छोटय़ा गावात खेडय़ात कुठे आलेय थिएटर. रोजच्या जगण्याशी झगडणा:या लोकांमध्ये नाटक बघण्याची मानसिकता तरी असते का? अशा परिस्थितीत लोकांना समजून घेऊन, लोकांच्या जवळ जाणारं नाटक म्हणजे इनव्हिजिबल थिएटरचा प्रयोग. अक्रमच्या स्वप्नाशी एकदम मिळती-जुळती संकल्पना. रस्त्यावर जाणा:या एखाद्या बाइकची लिफ्ट घेतली की गावात पोहोचेर्पयत अक्रमची त्या बाइकवाल्याशी मैत्री झालेली असायची. एखाद्या ट्रकची लिफ्ट घेऊन गावात पोहोचेर्पयत ट्रकमधल्या माणसांशी गप्पा मारत, त्यांचे प्रश्न समजून घेत त्यांच्याच विषयावरच नाटक अक्रम सादर करायचा. आणि लोकांना कळायचंही नाही की आपल्यासमोर जे झालं ते नाटक होतं.
पायी, लिफ्ट घेत देशाच्या चारी बाजूंवरच्या सीमांवर वसलेल्या गावागावात फिरत अक्रमने पन्नास हजार किलोमीटरचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्याला जाणवलं की सीमा नसलेलं जग एकदम छोटं आहे. आपलंस करणारं, जीव लावणारं एकदम आपलचं आहे असं वाटणारं जग खूप सुंदर आहे. माणसं एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्यात युद्ध होत नाही. त्यांच्यात गप्पा होतात. मैत्री होते. मग सीमेचा प्रश्न येतोच कुठे? सीमा येतात त्या तू कोणत्या गावाचा, कोणत्या देशाचा, कोणत्या धर्माचा असा प्रश्न विचारल्यावर. पण या प्रश्नांच्या पलीकडे फक्त मैत्री असते. हे मैत्रीचे पूल बांधत अक्रम गावागावातून फिरतो आहे.
आता अक्रमच्या डोक्यात ‘वल्र्ड पासपोर्ट’ची कल्पना सळसळते आहे. जगातल्या माणसांशी मैत्री करायला, नातं जोडायला हाच पासपोर्ट उपयोगी पडणार आहे. मी जगाचा नागरिक आहे. मला जगातल्या कोणाशीही मैत्री करता यायला हवी. त्यासाठी मला कोण आणि का अडवेल?
अक्रम जिथे जातो तिथे लोकांना आपण का जगतो, हा प्रश्न विचारतो. या प्रश्नावर चर्चा करताना लोकांना स्वत:च स्वत:ला घातलेल्या चौकटी स्वच्छ दिसू लागतात. मग एकच प्रश्न उरतो की या चौकटी आपण भेदणार की नाही? अक्रम आपल्या उदाहरणातून चहुबाजूंच्या सीमांवर वसलेल्या माणसांना हेच सांगू पाहत आहे की मैत्री करायला, माणसं जोडायला सीमांची अडचण येत नाही. माणसाच्या मनात जागा निर्माण करणं हे अजिबात अवघड नसतं.
वर्ल्ड विदाउट बॉर्डर्स हे स्वप्न घेऊन अक्रमला जगभरात फिरायचं आहे. त्याच्या खिशात आजही नेहमीसारखेच दोनशे तीनशे रुपये असतात. बॅँकेत दोन चार हजार रुपयांचा बॅलन्स. अक्रम थिएटर वर्कशॉप घेतो शाळा-कॉलेजांमध्ये भाषणं देतो. त्याचे कोणी आपल्याला पैसे द्यावेत हा आग्रह नसतो. पण अनेक कार्यक्रमातून पैसे मिळतात आणि त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतो. आझाद परिंदा म्हणून फिरताना अक्रम फिरोझला सेटल होऊन जगण्याची भ्रांत पडत नाही.
तो म्हणतो जसा मी मुक्त फिरतोय, माणसांना भेटतोय, तसं जगभरातल्या माणसांना फिरता यावं, जग पहाता यावं?
स्वत:ला बांधून एकाच रुटीनमधे कोंबण्यात कसलं आलंय, सेटल होणं?
- माधुरी पेठकर