गजर

By Admin | Updated: August 29, 2014 10:03 IST2014-08-29T10:03:14+5:302014-08-29T10:03:14+5:30

सामाजिक कामात ‘खारुताई’ होऊ पाहणार्‍या तरुण दोस्तांच्या कडक ढोलांचा नया ताल

Alarm | गजर

गजर

- राजानंद मोरे
 
 
कोण म्हणतं, ढोल पथक म्हणजे नुस्ता कडकडाट? ढोल वाजवणार्‍या या पथकांना भेटा, 
स्वत: रात्रंदिवस कष्ट करुन  हे तरुण दोस्त आपण कमावलेले पैसे स्वत:हून सामाजिक कामांना देताहेत.ढोलाच्या आवाजात त्यांच्या उपक्रमाची ही लय नजरेआड होऊ नये, 
म्हणून पथकांची ही एक खास झलक
 
 
गणपती पहायचे तर पुण्याचेच ! 
आणि ढोल पथकं पहायची तर तिही पुण्याचीच.
एकदम कडक काम. बाकी महाराष्ट्रात गणेशोत्सव आज सुरू होत असला तरी पुण्याच्या तरुण ढोलपथकात मात्र दीड-दोन महिन्यांपूर्वीपासून बाप्पाच्या स्वागताची तयारी जोमानं सुरू आहे. ढोल वाजताहेत, ताशांचा तडतडणारा आवाज कानावर पडतोय, देहभान हरपून वाजवणारे वाजवताहेत. गेल्या काही वर्षांत पुण्यात ही ढोल संस्कृती चांगलीच रूजली आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यात केवळ बोटावर मोजण्या इतपतच पथकं होती.  आज मात्र ही ढोल पथकं तरूणाईच्या गळ्यातली ताईत बनली आहेत. शिस्त, विशिष्ट लय, मराठमोळा पेहराव यामुळे प्रत्येक पथकाने आपला स्वतंत्र ब्रॅण्ड तयार केला आहे. गणेशोत्सावातील मिरवणुका आणि पुणेरी ढोल हे जणू समीकरणच होऊन बसलं आहे. मुख्य म्हणजे आपण ढोल पथकात वाजवतो हे एक नवीन स्टेटस सिंबल बनतंय. त्यात इथं मुलंमुली असा काही भेद नाही. मुलांच्या बरोबरीनं मुलीही तितक्याच जोशात असतात.
हजारोंच्या जनसमुदायाला प्रचंड ऊर्जेने थिरकायला लावणारी ही ढोल पथकं आणि त्यांचा सराव ही एक थक्क करणारी गोष्ट असते, स्पीकर्सच्या कितीही भिंती रचल्या तरी जो रावडी अनुभव येत नाही तो अनुभव ढोल ताशाची झिंग डोक्यात गेल्यावर नक्की येतो. अर्थात अनेक पुणेकरांना हा आवाज कर्कश्यच वाटतो. नको वाटतो हा कल्लोळ. असे ढोल बडवणारे जत्थे पाहिले की काही पुणेकर संतापायचे. अनेक मंडळांबाबत तर पोलीस कंप्लेंटही करण्यात आल्या.
पण आता मात्र पुण्यातल्या ढोल पथकांच्या मंडळांनी केवळ ‘वाजवण्यापलीकडे’ काही नवीन उपक्रम सुरू केले आहेत. एक नवाच ‘सामाजिक गजर’ या गणेशोत्सवाच्या निमित्तानं सुरू होतो आहे.
ढोल-ताशाच्या गजरातही त्यांचे डोके एकदम ताळ्यावर आहे. आणि त्या डोक्यात एक विशेष सामाजिक भानही टक्क जागं होताना दिसत आहे. आपल्या कष्टातून मिळत असलेल्या पैसे सरळ काही सामाजिक उपक्रमांना देण्याचे या मंडळांनी घाटले आहे. बाप्पांचं आगमन आणि विसर्जन या काळात विविध गणेश मंडळांच्या या ढोल पथकांना निमंत्रित करतात. त्या मोबदल्यात काही हजार रुपयेही पथकं मंडळांकडून घेतात.
विशेष म्हणजे अनेक पथकातील तरुण वादक मात्र कोणतेही मानधन घेत नाहीत. वर्षभर विविध कार्यक्रम, सामाजिक संस्था, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याबरोबरच स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, स्वच्छतागृह बांधणी, वृक्षारोपण अशा कामांसाठी  हे पैसे वापरले जातात. आता तर बहुतेक मंडळांची नोंदणी चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे खर्चाचा ताळेबंदही त्यांना  सादर करावा लागतो. त्यामुळे ही पथकं केवळ गणेशोत्सवातली ढोल पथकं न राहता सामाजिक उपक्रम त्यातून आकार घेऊ लागले आहेत.
 
 
कडक पॅशन
सामाजिक कामांना ५0 लाखांचा निधी
पुण्यात जवळपास १५0 ढोल-ताशा पथकं आहेत. या पथकांमध्ये १७ ते १८ हजार तरूण-तरूणी सहभागी असतात. सर्वच जण उच्चशिक्षित. काही जण डॉक्टर, इंजिनिअर, सीए आहेत. केवळ आवड म्हणून ते पथकात येतात. पैसा कमविणे हा उद्देश मुळीच नसतो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मिळालेल्या निधीचा सामाजिक कार्यासाठी वापर करण्याकडे त्यांचा ओढा असतो. त्यातून त्यांच्यातील सामाजिक जाणिवेला एकप्रकारे व्यासपीठ मिळत आहे. वादन ही आवड तर सामाजिक काम ही पॅशन बनली आहे. बँड पथके चरितार्थ चालविण्यासाठी वादन करतात, तर ढोल-ताशा पथकांची सुरूवातच सामाजिक परंपरेतून झाली आहे. त्यामुळे पथकांनी त्याकडे पैसे कमविण्याचे साधन म्हणून कधीही पाहिले नाही. गणेशोत्सवासाठी होणारा खर्च वगळून पथकांमार्फत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षी नाविण्यपुर्ण कल्पना समोर ठेवून कुठल्या ना कुठल्या समाजकार्याला हातभार लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यानिमित्ताने तरूणांमध्ये विचारांची आदान-प्रदान होते. ही युवाशक्ती समाजाच्या जडणघडणीत खारीचा वाटा उचलते. दरवर्षी पुण्यातील ही पथकं सामाजिक कामांसाठी सुमारे ५0 लाख रुपयांचा निधी उभा करते. त्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचाही प्रयत्न असतो, असे ढोलताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी सांगितले.
 
 
 
श्रीराम पथक प्रश्न समजून घ्यायची धडपड
 
शिस्तप्रिय पथक म्हणून नावाजलेले श्रीराम पथक. मागील २0 वर्षांपासून त्यांनी पुण्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गणेशोत्सवात मिळालेले पैसे ट्रस्टमध्ये जमा होतात. त्याच पैशातून पथकामार्फत वर्षभराचं नियोजन केलं जातं.  ग्रामीण भागात शैक्षणिक, सामाजिक काम करणार्‍या संस्थांना दरवर्षी देणगी स्वरूपात आर्थिक मदत केली जाते. मागील काही वर्षांत १0 ते १२ संस्थांना सुमारे दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. मागील वर्षी एका स्पर्धेमध्ये पथकाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कारात मिळालेला सर्व निधी पथकाने शैक्षणिक क्षेत्रात ग्रामीण भागात काम करणार्‍या एका संस्थेला देऊ केला. हे पथक वर्षातून दोनदा रक्तदान शिबिर आयोजित करते. मागील काही वर्षांपासून पथकाचं हे काम अविरतपणे सुरू आहे. पथकातील मुलांचा यात सक्रिय सहभाग असतो. तसेच पथकातील ५0 ते ६0 तरूणांचा गट दरवर्षी एका किल्ल्याला भेट देतो. केवळ निसर्ग सौंदर्य न्याहाळत बसण्यात हे तरूण धन्यता मानत नाहीत. तर किल्ल्याची स्वच्छता, डागडूजी करून ऐतिहासिक वारसाचे पावित्र्य जपण्याचं काम करतात. पथकामार्फत विविध सामाजिक प्रश्न, समस्या, समाजोपयोगी विषयांवर व्याख्यानमाला घेतली जाते. सामाजिक प्रश्नांविषयी तरुणांना माहिती तरी व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय असं पथक प्रमुख महेश शेठ सांगतात.
 
 
 
सर्मथ प्रतिष्ठान जेवढे जमेल तेवढे
 
या ढोल-ताशा पथकाने स्थापनेपासूनच आपले वेगळेपण राखले आहे. गणेशोत्सव संपला की लगेचच म्हणजे २ ऑक्टोबरला प्रतिष्ठानचा वर्धापनदिन असतो. सामाजिक कार्यात पुढे असूनही प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या संस्थांना हेरून या दिवशी ‘सर्मथ गौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला जातो. पथकामध्ये अंध मुला-मुलींच्या शाळा मुलंही आहेत. या शाळेला दरवर्षी आर्थिक मदत केली जाते. शहरातील विविध वृद्धश्रमांमध्ये जाऊन तेथील ज्येष्ठांशी संवाद साधत त्यांना मदतीचा हात देण्याचे कामही दरवर्षी ठरलेले. दुर्गम खेडेगावांमध्ये जाऊन रस्ते दुरुस्ती, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, नाला बांधणी या कामातही पथकातील तरूण पिढी सक्रिय सहभाग घेत असते. भाऊबीज, रक्षाबंधन हे सण पथकातील मुली विविध संस्थांमध्ये जाऊन साजरे करतात. यावेळी भुस्खलनामुळे गाडल्या गेलेल्या माळीण गावातही या मुली गेल्या. तसेच पथकाने तेथील सहा मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली आहे. पथकातील बारावीपर्यंतच्या सुमारे २00 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच गरजेनुसार आर्थिक सहाय्यही केले जाते. ‘आपण आपल्याला जमेल तेवढे काम करावे, ही भावना आम्ही जपतोय असं या प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते सांगतात.
 
 
 
एकदंत पथक दुष्काळ जोगवा मागत  फिरली तरुण मुलं
 
मागील वर्षी राज्यात मोठा दुष्काळ पडला होता. जनावरांच्या मोठ-मोठय़ा छावण्या लागल्या होत्या. माणसांनाही पुरेसं अन्न मिळत नव्हतं. अशा परिस्थितीत तीनच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या एकदंत पथकातील तरूण मुलं-मुली एकत्र आले. दुष्काळग्रस्तांना काही ना काही आर्थिक मदत देण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. त्यातूनच ‘दुष्काळी जोगवा’ ही कल्पना पुढे आली. पथकाकडे असलेल्या टोल गाड्यावर दुष्काळी मदतीचा फलक लावून ही पोरं शहरभर फिरत जोगवा मागत फिरली. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळालं. त्यातून तब्बल २२00 किलो धान्य गोळा झालं. हे धान्य शिखर शिंगणापूर येथील छावणीतील ७५0 शेतकर्‍यांना पाठवून दिलं. त्याचबरोबर छावणीतील जनावरांसाठी दोन ट्रक चाराही पाठवला. त्याचबरोबर अनाथाश्रमातील मुलांसाठी वस्त्रदान, अन्नदान असे विविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षी काही ना काही नवीन कल्पना राबवून सामाजिक कामांत हातभार लावण्याचा या पथकाचा संकल्प असल्याचे पथक प्रमुख उमेश भेलके व प्रतीक हातवळणे यांनी सांगितले.
 
 
 
शिवगर्जना पथक तालवाद्यांचा नवा ताल
 
ढोल-ताशाचा गजर होत असताना संभळ, चौघडा, दिमडी यांसारखी पारंपरिक तालवाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ढोल-ताशाबरोबर ही वाद्यही पुढे यावीत, यासाठी पथकामार्फत मागील दोन वर्षांपासून या तालवादकांचा सत्कार करण्यात येतो. त्यांना आर्थिक मदतही दिली जाते. त्याशिवाय गतीमंद मुलांच्या दोन संस्थांना इमारत बांधणीसाठी ५0 हजार रुपयांची मदत करण्यात आली. एका शाळेला ३५ हजार रुपयांचे शालेय साहित्य देण्यात आले. रक्षाबंधनाच्या दिवशी खडकी येथील पॅराप्लेजिक सेंटरमधील जवानांसोबत पथकातील मुलींना रक्षाबंधन साजरे केले. त्यांना ४१ हजार रुपयांचा निधीही देण्यात आला. याशिवाय विविध उपक्रमही घेतले जातात. दरवर्षी या कामांसाठी १ ते १.५ लाख रुपयांचा निधी खर्च होतो, असे पथक प्रमुख शिरीष थिटे यांनी नमूद केले.
 

 

Web Title: Alarm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.