मुंबईच्या रस्त्यांवर AI चे स्मार्ट स्पिकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 03:00 IST2018-07-05T03:00:00+5:302018-07-05T03:00:00+5:30

मुंबईत धारावीतील काही दुकानांमध्ये लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणारी उपकरणं बसवण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या उपकरणांना लोकांनी भन्नाट प्रश्न विचारले. त्या अनोख्या प्रयोगाची ही गोष्ट.

AI's Smart Speakers on the streets of Mumbai | मुंबईच्या रस्त्यांवर AI चे स्मार्ट स्पिकर

मुंबईच्या रस्त्यांवर AI चे स्मार्ट स्पिकर

ठळक मुद्देया प्रयोगामध्ये धारावीतील दुकानांमध्ये एक उपकरण बसवण्यात आलं आहे. या मशीनवर असणारं बटण प्रश्नकत्र्याने दाबायचं. प्रश्न विचारल्यावर तेथे एक नंबर उमटतो. तो टिपून घ्यायचा. दहा मिनिटांनी तोच नंबर तिथं दाबल्यावर आपल्या प्रश्नाचं उत्तर मशीनमधील स्पीकरमधून ऐकू य

- ओंकार करंबेळकर

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात एआय हा शब्द आता आपण सतत ऐकतोय. या एआयच्या जोरावर भविष्यात मानवी जगणंच आमूलाग्र बदलून जाईल अशी चर्चा आहे. आजच आपल्या आयुष्यात फोन, संगणक याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेनं शिरकाव केला आहे. आपल्याला माहितीही नाही आणि एआयनं आपल्या आयुष्याचा ताबा घ्यायलाही सुरुवात केली आहे. अमेझॉनच्या अ‍ॅलेक्झाचं नाव आपण ऐकतोय. आयफोनमधल्या सीरीच्या रूपानं आपल्या आयुष्यात सगळी कामं करणार्‍या अदृश्य व्यक्तींचा प्रवेश झाला आहे. आयफोनच्या या सीरीला कोणत्याही आज्ञा देता येतात, कामं सांगता येतात, प्रश्न विचारता येतात.
 ‘हे.. सिरी आता माझ्या फोनमध्ये कोणाचे मेसेजेस आले आहेत? असतील तर ते मला वाचून दाखवतेस का?’ असं म्हणताच त्या व्यक्तीचे संदेश ही सिरी वाचून दाखवते. ते ऐकल्यावर तुम्ही अमूक उत्तर त्याला दे असं म्हटल्यावर ती परस्पर त्याला उत्तर देऊन टाकते. किंवा तुम्हाला एखाद्या भेटीसाठी उशीर होत असेल तर त्याला ‘मला 15 मिनिटे उशीर होईल’ असं सांग म्हटल्यावर ती परस्पर त्याला मेसेज देऊन मोकळी होते. त्यासाठी तुम्हाला गाडी चालवताना फोन हातात घेण्याची किंवा संदेश टाइप करण्याचीसुद्धा गरज नाही. हे सिरी मला एक विनोद सांग असं म्हटलं तरी ती एखादा जोक तुम्हाला सांगते. आता अँड्रॉइड फोनमध्ये एखाद्याला फोन करायचा असेल तर त्याचं नाव लिस्टमध्ये शोधण्याऐवजी त्याचं नाव मोठय़ाने कॉल असं म्हणून त्या व्यक्तीचं नाव घेतलं तरी फोन आपोआप त्या व्यक्तीला फोन लावून देतो. जर त्या नावाची माणसं असतील तर नक्की कोणती व्यक्ती हवी आहे असं विचारून मग उत्तरानुसार योग्य व्यक्तीशी संपर्क करण्यासाठीही फोन मदत करतो.  
हे सारं उच्चभ्रू जगाचाच भाग. आम जनता या सार्‍याहून कोसो दूर असेल असं तुम्हाला वाटलं असेल हे वाचून क्षणभर. पण तंत्रज्ञान माणसामाणसांत भेद करत नाही. त्याचंच एक उदाहरण अलीकडच्या काळात मुंबईत दिसलं.
मुंबई आयआयटी आणि इंग्लंडमधील स्वानसी विद्यापीठानं एक प्रयोग मुंबईत करून पाहिला. सार्वजनिक ठिकाणी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असलेलं एखादं उपकरण लावलं  तर काय होईल़? लोक कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतील़़? अशा विचारातून ही संकल्पना उदयास आली. 
मुंबईत धारावीतील काही दुकानांमध्ये लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणारी ही उपकरणं बसवण्यात आली. पहिल्या टप्प्यात यंदाच्या मार्च महिन्यात दोन दुकानांमध्ये धारावीत हा प्रयोग झाला. लहान मुलांपासून मोठय़ांर्पयत या उपकरणाला लोकांनी भरपूर प्रश्न विचारले. 
आज हवामान कसं आहे, आज पाऊस पडणार का, कोणती बस कुठं जाते, बस किती वाजता आहे इथपासून ते या जीवनाला काही अर्थ आहे का इथर्पयतचे प्रश्न लोकांनी विचारले. तंत्रज्ञानापासून दूर असलेल्या लोकांना ही उपरकणं चांगलीच आवडली. त्यात थोडी गंमतही होती आणि काहीतरी नवं त्यांच्या आयुष्यात आलं होतं. घडत होतं.
या प्रयोगाबद्दल आयआयटी मुंबईचे आयडीसी स्कूल ऑफ डिझाइनचे प्राध्यापक अनिरुद्ध जोशी म्हणतात, अशा प्रकारची 20 उपरकरणं धारावीत विविध भागांमध्ये लावली जात आहेत. एखाद्या प्रश्नाचं उत्तर संगणकानं देणं आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर संगणक किंवा तंत्रज्ञान वापरून माणसाने देणं यामध्ये फरक आहे. या दोन्ही पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास सुरू आहे. उदाहरणार्थ तुमच्या आजीला एखाद्या गोष्टीची माहिती हवी आहे तर तिला तुम्ही संगणक किंवा इतर तंत्रज्ञान वापरुन मिळवलेले उत्तर कसे द्याल आणि आजीला त्याच प्रश्नाचं संगणक थेट कसं उत्तर देईल याचा अभ्यास करण्यात येत आहे.  माणूस आणि संगणक एकाच प्रश्नाचं उत्तर कसे देईल याचा विचार या नव्या प्रयोगातून केला जात आहे. 
स्व्ॉनसी विद्यापीठातील प्राध्यापक मॅट जोन्स यांनीही या प्रयोगाबद्दल अत्यंत सकारात्मक भूमिका मांडली आहे. ते म्हणतात, मुंबईच्या प्रयोगातून मिळालेले निष्कर्ष पाहण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. तंत्रज्ञानाबद्दल विचार करण्याच्या विविध पद्धती या प्रयोगामुळे अभ्यासता येणार आहेत. या प्रयोगातून मिळणारी माहिती केवळ भारतापुरती नाही, तर सर्व जगासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

 

कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग
    
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेचा उगम 1950 च्या दशकामध्ये झाला असला, तरी त्याचं  मूर्त स्वरुप आता दिसू लागलं आहे किंवा ते रोजच्या आयुष्यामध्ये आलं आहे असं म्हणता येईल. 1955 मध्ये जॉन मॅकार्टी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संज्ञा दिली.  कृत्रिम बुद्धिमत्ता या सं™ोमध्येच त्याचा अर्थ लपला आहे. मानवाद्वारे म्हणजे कृत्रिमरीत्या तयार केलेल्या यंत्रातून ती आलेली असेल. पण आता पुढं काय करायचं याचा स्वतर्‍च निर्णय घेणारी ही प्रणाली असेल. इतकी वर्षे यंत्राला किंवा संगणकाला आज्ञा दिल्याशिवाय यंत्र काम करत नसे; पण आता त्याच्या पुढे जात यंत्र स्वतर्‍ निर्णय घेऊ शकेल. 
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या नव्या आविष्काराने माणसाचं आयुष्य सोपं होणार आहे. ऑटो पायलटद्वारे विमान, मेट्रो किंवा कार चालवणे याद्वारे ते सुरु झालेलंच आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला सर्वात प्रथम गांभीर्याने घेतलं गेलं ते 1997 साली झालेल्या एका अभूतपूर्व, धक्कादायक घटनेमुळे. बुद्धिबळाच्या विश्वात आदराने नाव घेतल्या जाणार्‍या गॅरी कॅस्पारोव्ह आणि रोबोट डीप ब्लू यांच्यामध्य़े बुद्धिबळाचा 1996 साली सामना झाला होता. या पहिल्या सामन्यात गॅरी कॅस्पारोव्ह यांनी डीप ब्लूला पराभूत केलं मात्र त्याच्या पुढच्या वर्षी झालेल्या सामन्यात डीप ब्लूने कॅस्पारोव्ह यांच्यावर मात केली. या घटनेमुळे जगभरात चर्चेचे वादळ उठलं. तोर्पयत मानवाचा मेंदू, त्याची बुद्धिमत्ता सर्वोच्च, अजिंक्य मानली जात होती. मात्र या सामन्यांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेवर विचारमंथन सुरु झालं. या सामन्यावर मॅन व्हर्सेस मशीन नावाचा माहितीपटही प्रसिद्ध झाला होता.


 

Web Title: AI's Smart Speakers on the streets of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.