३ दोस्त आणि १०० माणसं
By Admin | Updated: April 28, 2016 13:53 IST2016-04-28T13:44:53+5:302016-04-28T13:53:10+5:30
रेल्वेच्या सेकंडक्लास डब्यातून विनाआरक्षण प्रवास करत देशाची चारी टोकं फिरणाऱ्या दोस्तांचा आॅँखो देखा विशेष रिपोर्ट.

३ दोस्त आणि १०० माणसं
- आॅक्सिजन टीम
तीन दोस्त.
मुंबईकर. उच्चशिक्षित.
मात्र नोकरी आणि बड्या पगाराच्या मळलेल्या वाटा सोडून आपले क्रिएटिव्ह आनंद शोधत त्याप्रमाणे करिअरची वाट चालणारे..
समर्थ महाजन, रजत भार्गव, ओमकार दिवेकर.
एकदा समर्थच्या आॅफिसमध्ये बसलेले असताना घमासान चर्चा, ब्रेनस्टॉर्मिंग चाललं होतं.
समर्थ आयआयटीवाला. मात्र ती लाइन सोडून क्रिएटिव्ह डिरेक्टर होत कलेच्या जगात आपला आनंद शोधणारा.
दोस्तांशी चाललेल्या घमासान चर्चेत त्यानं एक कल्पना मांडली की, आपल्याला माणसं, त्यांचं जगणं, जग, सुखदु:ख समजून घ्यायची, आपला देश पाहायचा तर आपण रेल्वेनं देशाच्या चारी दिशांना जाऊ! तेही विनाआरक्षित जनरल कम्पार्टमेण्टमधून..
त्यात जे दिसेल, सापडेल, अनुभव येतील, ते सारे आपले!
रजत आणि ओमकारलाही ती आयडिया आवडली.
रजत पटकथा लेखक, तर ओमकार सिनेमॅटोग्राफर.
काहीही उद्देश नाही, कसलाही हेतू नाही.
कुठलंही पर्यटन नाही, अमुक एक बघायचंच असा अट्टहास नाही, आणि कसलीही चंगळ नाही. मुख्य म्हणजे पर्यटक म्हणून आपला देश पाहायचा नाही, तर हा देश समजून घ्यायचा. इथल्या माणसांच्या जगण्यातून त्यातले ताणेबाणे समजून घ्यायचे एवढंच त्यांनी ठरवलं.
सोबत फक्त प्रवासाचे टप्पे, ठिकाणं ठरवली. त्यासाठी किती वेळ लागेल हे अंदाजे प्लॅन केलं.
आणि ‘देश पाहायचा, माणसं वाचायची’ म्हणत त्यांनी मुंबईहून सेकंडक्लास डबा गाठत बिनधास्त भ्रमंती सुरू केली..
मुंबई-गुजरात-दिल्ली-काश्मीर-आसाम-तामिळनाडू-मुंबई असा मोठ्ठा प्रवास करत, रात्रंदिवस रेल्वेत बसून लोकांशी गप्पा मारत एक मोठा ऐवज कमवून ते मुंबईत परतले..
या प्रवासात किमान १०० लोकांशी तरी त्यांच्या विस्तृत गप्पा झाल्या, प्रांत-भाषा-आर्थिक स्थिती-सामाजिक समस्या आणि व्यक्तिगत स्वप्न याची बदलती रूपं त्यांनी अनुभवलीच; पण त्यासोबत एक ठाम विश्वासही कमावला..
ते म्हणतात, ‘‘प्रचंड गर्दीत सुविधांची पुरती वानवा. स्वत:साठी त्या गर्दीत जागा करून घेणंही अवघड अशा अवस्थेतही लोक इतरांना समजून घेतात, सामावून घेतात, गप्पा मारतात, सुखदु:ख वाटतात. हे किती वेगळं आहे. माणसं इतकी चांगली असू शकतात, याचा अनुभव एरवी घरबसल्या कसा यावा?’’
अशाच थरारक अनआरक्षित प्रवासाची एक भन्नाट रेल्वे डायरी.
१० ट्रेन, १७ दिवस, २६५ तास