बीसीसीआयमधील बदलाचे वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 03:34 IST2015-12-28T03:34:03+5:302015-12-28T03:34:03+5:30
भारतीय क्रिकेट संघाने मैदानावर संमिश्र कामगिरी केली असली, तरी या खेळाचे संचलन करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयमध्ये यंदा बदलाचे वारे जोरात वाहिले.

बीसीसीआयमधील बदलाचे वर्ष
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने मैदानावर संमिश्र कामगिरी केली असली, तरी या खेळाचे संचलन करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयमध्ये यंदा बदलाचे वारे जोरात वाहिले. जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदी शशांक मनोहर यांची वर्णी लागली. वरकरणी हा औपचारिक प्रशासनिक बदल वाटत असला, तरी याचे अनेक सकारात्मक परिणाम बीसीसीआय; तसेच आयसीसीच्या वाटचालीत जाणवतील. एका सर्वंकष सत्ताधीशाच्या कारकिर्दीचा अंत आणि पारदर्शी धोरणांचा प्रारंभ असे या घटनेचे वर्णन करता येईल.
पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व करणारे जगमोहन दालमिया आपला विजनवास संपवून पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष बनले होते; पण दुर्दैवाने हा कार्यकाल त्यांना पूर्ण करता आला नाही. सप्टेंबर २0१५ मध्ये त्यांचे निधन झाले. क्रिकेट विश्वात सर्वांत ताकदवान समजल्या जाणाऱ्या संघटनेवर आणि पर्यायाने आयसीसीमध्ये अध्यक्षपदावर एन. श्रीनिवासन यांची पकड होती. आयपीएलमधील कथित भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाच्या निकालाने अडचणीत आलेल्या श्रीनिवासन यांना बाजूला करण्यासाठी त्यांचे सर्व विरोधक एकवटले. आयपीएलप्रश्नी मलीन झालेली बीसीसीआयची प्रतिमा सुधारणे आणि कारभारात पारदर्शकता आणणे, असे आव्हान त्यांच्या समोर होते. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे.
इंडियन ‘बदनाम’ लीग
आयपीएलच्या मैदानात यंदा मुंबई इंडियन्सने पिछाडीवरून आघाडीवर येत अजिंक्यपद पटकावले. २0१0, २0११ आणि २0१४ अशी तीन वर्षे अजिंक्यपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला हरवून मुंबई दुसऱ्यांदा विजेती बनली.
दर वर्षी यशाची नवी शिखरे पार करणाऱ्या आयपीएललचा भ्रष्टाचाराच्या भुंग्याने पोखरले आहे. याची परिणीती म्हणून २0१३च्या सत्रात झालेल्या सट्टेबाजीच्या मुद्यावरून ऐतिहासिक निकाल देताना न्यायालयाने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर बंदी घातली. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यपन यांचा हा संघ होता. त्यामुळे श्रीनिवासन यांच्या अधिकारावरही न्यायालयाने मर्यादा आणली.
चेन्नई आणि राजस्थान हे दोन संघ बाद झाल्याने त्यांच्याजागी पुणे आणि राजकोट या दोन नवीन संघांचा यंदा आयपीएलमध्ये समावेश झाला आहे. महेंद्रसिंह धोनी पुण्याचा, तर सुरेश रैना राजकोटचा कर्णधार बनला आहे. या संघातील उर्वरित खेळाडूंची निवड फेब्रुवारीमध्ये होईल.
दिग्गज खेळाडूंची निवृत्ती
आपल्या आक्रमक शैलीने क्रिकेटची पारंपरिक चौकट तोडणारा दिल्लीचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि डावखुरा गोलंदाज झहीर खान यांनी या वर्षी निवृत्ती स्वीकारली. या दोघांनी जवळ जवळ १४ वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. झहीरने ९२ कसोटी आणि २00 वनडेमध्ये ५९३ बळी घेतले आहेत. सेहवागने १0४ कसोटी २५१ वनडे सामने खेळणाऱ्या वीरूने ८ हजारच्यावर धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा या दोघांनी निवृत्ती घेतली. संगकाराने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर बाय बाय केला. त्यांच्याशिवाय मिसबाह उल हक (वनडे), शाहीद आफ्रिदी (कसोटी आणि वनडे), रेयान हॅरीस (तिन्ही प्रकारात), शेन वॉटसन (वनडे), इयान बेल (वनडे) यांनीही यंदा निवृत्ती घेतली.
दिग्गजांचा खेळ पुन्हा पाहण्याची संधी
भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि आॅस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांची क्रिकेट आॅल स्टार्स टी-२0 लीग अमेरिकेत खेळविण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या महान खेळाडूंचा खेळ या निमित्ताने पुन्हा पाहता आला. ब्रायन लारा, वासिम आक्रम, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, कर्टली अॅम्ब्रोस, जॉन्टी ऱ्होडस, मुथय्या मुरलीधरन, शोएब अख्तर, रिकी पाँटिंग यांच्या सारख्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या लीगमध्ये सहभाग घेतला.
‘गुलाबी’ सुरुवात
क्रिकेटच्या १३८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा अॅडीलेडमध्ये आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात गुलाबी चेंडूचा वापर करून दिवस-रात्रीचा कसोटी सामना खेळविण्यात आला. आॅस्ट्रेलियाने हा सामना सात विकेटनी जिंकला. आयसीसीचा हा प्रयोग यापुढेही सुरू राहणार आहे.