ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. 17 - भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर अडचणीत सापडलेला भारताचा डाव कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी सावरला. विराट कोहली (१०४) आणि चेतेश्वर पुजारा (१०९) यांच्या नाबाद शतकी खेळीमुळे इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत भारत सुस्थितीत असून ६४.४ षटकांत भारताने २ गडी गमावून २३५ धावा केल्या आहेत.
पुजारा आणि कोहली दोघांनी १३० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करत भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. २२ धावांत भारताचे दोन गडी बाद झाल्यानंतर भारताचा डाव अडचणीत आला होता. पण कोहली आणि पुजाराने इंग्लंडच्या गोलंदाजीचा संयमाने सामना करत भारताच्या डावाला आकार दिला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताला लोकेश राहुलच्या रुपाने पहिला धक्का बसला. लोकेश राहुलला भोपळाही फोडू न (०) देता ब्रॉडने स्टोक्सकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ मुरली विजयही (२०) अँडरसनच्या उसळत्या चेंडूवर स्टोक्सकडे झेल देत बाद झाल्याने भारताला दुसरा धक्का बसला आणि भारताची स्थिती २ बाद २२ अशी बिकट झाली होती.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात एकमेव बदल करण्यात आला आहे. सलामीवीर गौतम गंभीरच्या जागी लोकेश राहुलचा संघात समावेश करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहलीने तसे संकेत याआधीच दिले होते. गंभीरला मिळालेल्या संधीमध्ये अपेक्षित छाप उमटवता आली नाही. राजकोटची पहिली कसोटी अनिर्णीत राहिली असली तरी, भारतीय संघ बॅकफूटवर ढकलला गेला होता.
चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजयचा अपवाद वगळता अन्य फलंदाज आणि गोलंदाज अपयशी ठरले होते. त्यामुळे बांगलादेशातून निराशाजनक कामगिरी करुन आलेल्या इंग्लंड संघाचे मनोधैर्य उंचावले.