...ती वेळ आली आहे
By Admin | Updated: August 11, 2015 00:46 IST2015-08-11T00:46:20+5:302015-08-11T00:46:20+5:30
शिकण्याचा टप्पा आता संपला असून, खेळाडूंनी २० बळी कसे मिळवायचे, याचा शोध घेत विदेशात कसोटी सामने जिंकण्यास प्रारंभ करायला पाहिजे, असे मत टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री

...ती वेळ आली आहे
गॅले : शिकण्याचा टप्पा आता संपला असून, खेळाडूंनी २० बळी कसे मिळवायचे, याचा शोध घेत विदेशात कसोटी सामने जिंकण्यास प्रारंभ करायला पाहिजे, असे मत टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान बुधवारपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. भारतीय संघ दोन दशकांपेक्षा अधिक कालावधीनंतर श्रीलंकेत मालिका विजय साकारण्यास उत्सुक आहे.
शास्त्री म्हणाले, ‘क्रिकेट मैदानावर सामना अनिर्णीत राखण्यासाठी संघ उतरत नाही. २० बळी घेण्याचा प्रयत्न करणे सर्वांत महत्त्वाचे आहे. सामना जिंंकण्यासाठी २० बळी कसे घेता येतील, याबाबत विचार करायला हवा. सामने जिंंकायला सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियात शिकण्याची प्रक्रिया संपली. भारतीय संघाने विदेशात बरेच क्रिकेट खेळलेले आहे. याच वातावरणात पुन्हा खेळायची संधी मिळाली म्हणजे हा अनुभव उपयुक्त ठरेल.’
शास्त्री यांनी पाच गोलंदाजांसह खेळण्याच्या विराटच्या रणनीतीचे समर्थन केले. शास्त्री म्हणाले, ‘एक अतिरिक्त गोलंदाज सामना संपण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. अधिक धावांबाबत बोलत नसून २० बळी घेण्याबाबत विचार करतो. इंग्लंडच्या अॅशेसमधील कामगिरीचा विचार करता गोलंदाजांमुळे फरक स्पष्ट झाला.’
भारताने यापूर्वी श्रीलंकेत १९९३मध्ये मालिका जिंकली होती. त्या वेळी तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-०ने सरशी साधली होती. त्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेत मालिका विजयासाठी संघर्ष करीत असल्याचे दिसून आले. यजमान संघ सध्या संक्रमणाच्या स्थितीत आहे, त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला विजयाची चांगली संधी आहे.
शास्त्री म्हणाले, ‘भूतकाळात श्रीलंका संघात दर्जेदार खेळाडूंचा समावेश होता. त्यांची सांघिक कामगिरीही चमकदार ठरली. या मालिकेत दोन युवा संघांदरम्यान चुरशीचा खेळ बघायला मिळेल. येथे येणाऱ्या युवा भारतीय संघांपैकी हा एक संघ आहे. या संघाचे सरासरी वय २५-२६चे आहे. गेल्या १५ वर्षांत येथे आलेल्या भारतीय संघाबाबत असे म्हणता येणार नाही. हा युवा संघ आहे. श्रीलंका संघही युवा आहे, पण त्यांना मायदेशात खेळण्याचा लाभ घेण्याची संधी आहे. युवा विरुद्ध युवा ही लढत चुरशीची होईल.’
रोहित शर्मा व चेतेश्वर पुजाराबाबत बोलताना शास्त्री म्हणाले, ‘रोहित अंतिम संघात स्थान मिळविण्याचा दावेदार आहे. रोहित प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने खेळपट्टीवर वेळ घालविला तर तो काय करू शकतो, याची आपल्याला कल्पना आहे. पलटवार करण्याची क्षमता लक्षात घेता त्याच्यासाठी ही चांगली संधी आहे.
पुजाराचा जर संघातील सर्वोत्तम पाच फलंदाजांमध्ये समावेश असेल तर तो खेळेल आणि त्यात जर त्याचा समावेश नसेल तर तो खेळणार नाही. ज्या वेळी आम्ही चार गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेऊ त्या वेळी तो नक्की पुनरागमन करेल.’ (वृत्तसंस्था)
तळाच्या फलंदाजांवर जबाबदारी
पाच गोलंदाजांसह खेळण्याच्या रणनीतीमुळे तळाच्या फलंदाजांवर अतिरिक्त जबाबदारी येणार आहे. त्यामुळे सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या रिद्धीमान साहावर सर्वांची नजर राहील. बंगालचा हा यष्टिरक्षक फलंदाज सध्या फॉर्मात नसून संघासाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे.
‘साहा चांगला खेळाडू आहे. तो लवकर बाद झाला असला तरी त्याच्यात धावा फटकावण्याची क्षमता आहे. त्याने सिडनी कसोटीमध्ये सामना वाचविण्यासाठी दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली होती. त्याला ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी त्याने चांगली फलंदाजी केली. चांगल्या सुरुवातीचा लाभ घेण्यास तो प्रयत्नशील असतो, असे शास्त्री म्हणाले.
मुरली विजय पहिल्या कसोटीला मुकणार भारताचा सलामीवीर
फलंदाज मुरली विजय स्नायूच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. मुरली विजयच्या अनुपस्थितीत बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात शिखर धवन व लोकेश राहुल भारताच्या डावाची सुरुवात करणार आहेत.
रवी शास्त्री म्हणाले, ‘मुरली विजय पूर्णपणे फिट नाही. आम्ही जोखीम पत्करणार नाही. भारतीय संघासाठी हा मोठा धक्का आहे. विजय फॉर्मात असून त्याच्यात मोठी खेळी करण्याची क्षमता आहे.’
भारतीय संघ पाच गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता आहे, पण खेळपट्टीच्या स्वरूपावर सर्वकाही अवलंबून आहे. रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर खेळणार असल्याचे शास्त्रींनी संकेत दिल्यामुळे चेतेश्वर पुजाराला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
भारताचे लक्ष्य तिसऱ्या स्थानाचे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ बुधवारपासून सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा सफाया केला,तर आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी पोहोचू शकतो.
आयसीसीने म्हटले आहे की, ‘पाचव्या स्थानी असणाऱ्या भारताला ३-० विजयाने क्रमवारीत प्रगती करता येईल व सध्याच्या अॅशेज मालिकेनंतर तिसऱ्या स्थानी ते पोहोचू शकतात हे माहीत आहे; परंतु आॅस्ट्रेलियाने द ओव्हलमध्ये इंग्लंडला पराभूत करणे हेही भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे. भारताने जर मालिका २-१ने जिंकली तर त्यांना तीन गुणांचा लाभ होणार आहे.’
सातव्या क्रमांकावरील श्रीलंकेने भारताला ३-० असे पराभूत केल्यास त्यांना आठ रँकिंग गुणाचा लाभ होणार आहे आणि ते पाचव्या स्थानावर जातील तर भारताचे ८९ गुण होतील. यजमान संघाने जर २-१ने विजय मिळवला तर त्यांना चार गुणांचा फायदा होईल आणि कोहलीच्या संघाला पिछाडीवर टाकत ते पाचव्या स्थानी पोहोचतील. २०१०ची भारत-श्रीलंका मालिका १-१ अशी ड्रॉ झाली होती.