तिसरी कसोटी अनिर्णीत, भारताने मालिका गमावली

By Admin | Updated: December 30, 2014 13:17 IST2014-12-30T09:54:23+5:302014-12-30T13:17:47+5:30

भारत वि. ऑस्ट्रेलियादरम्यानची तिसरी कसोटी अनिर्णीत राहिली असून चार कसोटी सामन्यांची मालिका भारताने गमावली आहे.

Third Test drawn, India lose series | तिसरी कसोटी अनिर्णीत, भारताने मालिका गमावली

तिसरी कसोटी अनिर्णीत, भारताने मालिका गमावली

ऑनलाइन लोकमत

मेलबर्न, दि. ३० - ऑस्ट्रेलियाच्या ३८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने पाचव्या दिवसाअखेर अवघ्या १७४ धावा केल्याने ही कसोटी अनिर्णीत राहिली असून भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका गमावल्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे. दुस-या डावात विराट कोहली ( ५४) आणि अजिंक्य रहाणे (४८) यांनी चांगली खेळी करत भारताचा डाव सावरायचा प्रयत्न केला खरा मात्र इतर फलंदाजांची पुरेशी साथ न मिळाल्याने ही कसोटी अनिर्णित राहिली. ऑस्ट्रेलियातर्फे जॉन्सन, हॅरिस व हेझलवूडने प्रत्येकी २ बळी टिपले. 
पहिले दोन कसोटी सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. तिसरा सामना जिंकून मालिकेत आव्हान कायम राखण्याची संधी भारताकडे होती, मात्र त्यांनी ती गमावली. ऑस्ट्रेलियाच्या ३८४ धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीचे फलंदाज  विजय (११), शिखर धवन (०) , के.एल.राहुल (१ ) पटापट तंबूत परतले. त्यानंतर कोहलीने रहाणेच्या साथीने चांगला खेळ केला. मात्र ते दोघे बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजी मंदावली. भरवशाचा पुजाराही २१ धावांवर बाद झाल्याने भारताच्या विजयाच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. पाचव्या दिवसाचा खेळ संपायला अवघा काही वेळ उरलेला असताना कर्णधार धोनी (नाबाद २४) फलंदाजीस आला, मात्र तो भारताला विजयाच्या समीप नेऊ शकला नाही. अखेर खेळ संपताना भारताने ६ गडी गमावत १७४ केल्या आणि कसोटी अनिर्णीत राहिली.
शॉन मार्श (९९) आणि रॉजर्सच्या (६९) खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर जिंकण्यासाठी ३८४ धावांचे आव्हान ठेवले. तळाच्या फलंदाजांची चिवट खेळी व भारतीय गोलंदाजांचे अपयश यामुळे ऑस्ट्रेलियाने दुस-या डावातही मोठी धावसंख्या उभारली. 
तिस-या कसोटीत एकूण ६ बळी टिपणा-या हॅरिसला 'मॅन ऑफ दि मॅच'चा पुरस्कार देण्यात आला.
 

 

Web Title: Third Test drawn, India lose series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.