पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही वाया
By Admin | Updated: November 17, 2015 03:11 IST2015-11-17T03:11:41+5:302015-11-17T03:11:41+5:30
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याचा तिसरा दिवसही पावसामुळे वाया गेला. रविवारी पावसामुळे

पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही वाया
बंगळुरू : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याचा तिसरा दिवसही पावसामुळे वाया गेला. रविवारी पावसामुळे
खेळ रद्द करण्यात आल्यानंतर सोमवारीही पावसामुळे खेळ शक्य झाला नाही. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही खेळाडूंना मैदानात जाता आले नाही. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुरळक पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर मुसळधार पावसात झाले. सोमवारीही तुरळक पाऊस सुरू होता. त्यामुळे खेळ शक्य झाला नाही.
सकाळचे सत्र संपण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी शिल्लक असतानाही पाऊस थांबला नव्हता. त्यानंतर मैदानाची दुसऱ्यांदा पाहणी करण्यात आली. पावसाची शक्यता आणि मैदानावरील पाणी बघितल्यानंतर सध्या खेळ शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मंगळवारीही अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. चौथ्या दिवशीही पूर्ण खेळ होण्याची शक्यता धूसर आहे. मंगळवारी सव्वानऊला खेळ सुरू होणार आहे, पण हे सर्व काही हवामानावर अवलंबून आहे.
बंगळुरूमध्ये दुसरा कसोटी सामना प्रारंभ होण्यापूर्वी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती, पण पहिल्या दिवशीच्या खेळामध्ये पावसाचा अडथळा निर्माण झाला नाही.
पहिल्या दिवशी पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव
२१४ धावांत संपुष्टात आला. दिवसअखेर भारताने पहिल्या डावात बिनबाद ८० धावांची मजल मारली होती, पण दुसऱ्या दिवशी सकाळपासून पावसाने वर्चस्व गाजवले. त्यामुळे दोन दिवस खेळ शक्य झाला नाही. (वृत्तसंस्था)
दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ रद्द करण्यात आल्यामुळे सामन्यावर पकड निर्माण करण्याच्या भारतीय संघाच्या प्रयत्नांना खीळ बसली.
सोमवारी तिसऱ्या दिवशीही खेळ शक्य
न झाल्यामुळे सामना निकाली ठरण्याची शक्यता धूसर होत आहे.
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप १३४ धावांची
गरज आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी मुरली विजय (नाबाद २८) आणि शिखर धवन (नाबाद ४५) खेळपट्टीवर होते. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे.