पाच वर्षे तरी दबदबा असावा!
By Admin | Updated: June 3, 2015 00:43 IST2015-06-03T00:43:09+5:302015-06-03T00:43:09+5:30
अशी टीम बनायला हवी, जी विश्व क्रिकेटवर किमान पाच वर्षे तरी अधिराज्य गाजवेल. असा संघ पाहण्यास आपण उत्सुक आहोत,

पाच वर्षे तरी दबदबा असावा!
नवी दिल्ली : अशी टीम बनायला हवी, जी विश्व क्रिकेटवर किमान पाच वर्षे तरी अधिराज्य गाजवेल. असा संघ पाहण्यास आपण उत्सुक आहोत, असे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी सांगितले. महेंद्रसिंग धोनीने जानेवारीमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यानंतर कसोटी क्रिकेटला ‘अलविदा’ केला होता. त्यानंतर विराट कोहलीकडे कसोटी क्रिकेटचे नेतृत्व सोपविण्यात आले. कर्णधार म्हणून आज तो प्रथमच बोलला. एका मुलाखतीत तो म्हणाला, आपण संघात मैत्रिपूर्ण वातावरणाची अपेक्षा करीत आहे.
विश्व क्रिकेटवर भारतीय संघाने किमान पाच वर्षे तरी अधिराज्य गाजवावे, असे मला वाटते. तशा संघाची मी अपेक्षा करतो. आपल्याकडे प्रतिभेची कमतरता नाही. क्षमताही भरपूर आहे. प्रश्न फक्त योग्य ताळमेळाचा आहे. एवढेच नव्हे, तर आम्ही वर्षातून २५०-२८० दिवस सोबत राहतो. त्यामुळे संघात मैत्रिपूर्ण वातावरण असणे गरजेचे आहे आणि तसेच वातावरण तयार करण्याचा माझा प्रयत्न असेल.
संघ हा शंका आणि असुरक्षिततेपासून मुक्त राहायला हवा. आॅस्ट्रेलिया संघ जेव्हा आपण खेळताना पाहतो तेव्हा तो संघ सर्व क्षेत्रात एकजुटीने खेळताना दिसतो आणि त्यामुळे या संघाविरुद्ध सर्वाेत्कृष्ट प्रदर्शनाची गरज असते. भारतीय संघाने सुद्धा अशीच कामगिरी करावी, असे मला वाटते. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात विराटने ४ कसोटी सामन्यांत ६९२ धावा केल्या होत्या. या मालिकेबाबत तो म्हणाला, मला आठवतेय की, या मालिकेसाठी मी दोन महिन्यांपूर्वीच मानसिक तयारी केली होती. मला आक्रमक क्रिकेट खेळायचे आहे. आॅस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुटून पडायचे आहे आणि तेच झाले.सकारात्मक दृष्टिकोन असेल तर सर्वच शक्य आहे.(वृत्तसंस्था)