फलंदाजांचे अपयश चिंतेचा विषय

By Admin | Updated: November 20, 2015 03:35 IST2015-11-20T03:35:25+5:302015-11-20T03:35:25+5:30

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असलेल्या पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघासाठी नागपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी हा चिंतेचा विषय आहे.

The subject of concern for batsmen's failure | फलंदाजांचे अपयश चिंतेचा विषय

फलंदाजांचे अपयश चिंतेचा विषय

नागपूर : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असलेल्या पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघासाठी नागपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी हा चिंतेचा विषय आहे.
मोहालीमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात १०८ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात निराशाजनक झाली. दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव पहिल्या दिवशी २१४ धावांत संपुष्टात आला; पण पावसाच्या व्यत्ययामुळे त्यानंतर सलग चार दिवस खेळ शक्य झाला नाही आणि सामना अनिर्णीत संपला. या लढतीत पावसाचा व्यत्यय निर्माण झाला नसता, तर आतापर्यंत भारतीय संघाने मालिकेत २-० अशी अघाडी मिळवली असती.
भारताला भारतातच टी-२० व वन-डे सामन्यांच्या मालिकेत पराभवाचा धक्का देणारा जगातील अव्वल कसोटी संघातील फलंदाज सध्या संघर्ष करीत आहे. कर्णधार
व प्रमुख फलंदाज हाशिम
अमलाला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या व्यतिरिक्त संघातील अनेक प्रमुख खेळाडू दुखापतींनी त्रस्त असल्यामुळे पाहुण्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
नागपूरमध्ये २५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ विजयी मार्गावर परतण्यास प्रयत्नशील आहे, पण फलंदाजांचे अपयश त्यांच्यापुढे सर्वांत मोठी समस्या आहे. दक्षिण आफ्रिका संघाने दोन कसोटी सामन्यांत तीन डावांमध्ये एकूण ५०७ धावा फटकावल्या आहे. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारतीय फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे.
बंगळुरू कसोटी सामना अनिर्णीत संपल्यानंतर अमलाने स्पष्ट केले, की चार दिवस खेळ शक्य न झाल्यामुळे आम्हाला आमच्या संघातील फलंदाजीतील उणिवा शोधण्यासाठी मदत झाली. संघाबाबत अधिक सकारात्मक नाही, पण एखादा निराशाजनक दिवसही उणीव शोधण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.
बंगळुरूमध्ये दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या डावात २१४ धावांत गारद झाला, तर भारताने दिवसअखेर बिनबाद ८० धावांची मजल मारली. त्यानंतर चार दिवस खेळ शक्य झाला नाही. पाहुण्या संघातर्फे केवळ एबी डिव्हिलियर्स (८५) सन्मानजक खेळी करण्यात यशस्वी ठरला.
अमला म्हणाला, ‘‘कसोटी सामने केवळ पहिल्याच दिवशी जिंंकता येत नाही. आमच्याकडे सामन्यात पुनरागमन करण्यासाठी बराच वेळ होता. कसोटी सामन्यांत काय घडू शकते, हे आपल्याला माहीत नसते. निराशाजनक सुरुवातीनंतर आम्हाला पुनरागमनचा विश्वास होता. नागपूर वेगळे स्थळ असून, तेथे आम्हाला चांगल्या सुरुवातीची आशा आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी डेल स्टेन संघात परतेल, अशी आशा आहे. स्टेनच्या दुखापतीमध्ये किती सुधारणा आहे, हे आताच सांगता येणार नाही. मी याबाबत अद्याप फिजिओसोबत चर्चा केलेली नाही, पण नागपूर कसोटीपर्यंत तो फिट होईल, असा विश्वास वाटतो.’’ (वृत्तसंस्था)


बंगळुरूची खेळपट्टी चांगली होती, पण फलंदाजीदरम्यान आम्हाला भागीदारी नोंदवण्यात अपयश आले. एबीने चांगली कामगिरी केली, त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ लाभली नाही. नागपूर कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा विश्वास वाटतो.
- हाशिम आमला

Web Title: The subject of concern for batsmen's failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.