श्रीनिवासन हेच सर्व वादाचे मूळ
By Admin | Updated: July 19, 2015 01:04 IST2015-07-19T01:04:03+5:302015-07-19T01:04:03+5:30
भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून जी घाण साचली ती श्रीनिवासन यांच्यामुळेच. स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसारखी प्रकरणे बाहेर आल्यानंतर क्रिकेटची

श्रीनिवासन हेच सर्व वादाचे मूळ
कोलकाता : ‘‘भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून जी घाण साचली ती श्रीनिवासन यांच्यामुळेच. स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसारखी प्रकरणे बाहेर आल्यानंतर क्रिकेटची बदनामी होऊनही बीसीसीआयने मौन पाळले. स्वच्छ आणि पारदर्शी कारभारासाठी श्रीनिवासन यांनी कुठलीही पावले उचलली नाहीत, शिवाय अध्यक्षपदी चिटकून राहिले. त्यांनी आयसीसी चेअरमनपदही भूषविले. सर्व वादाचे मूळ ते स्वत: आहेत. त्यांनी आयसीसी चेअरमनपद सोडून द्यायला हवे,’’ अशी घाणाघाती टीका बोर्डाचे माजी अध्यक्ष अॅड. शशांक मनोहर यांनी शनिवारी केली.
श्रीनिवासन यांच्याविरुद्ध उघडपणे बंडाचे निशाण फडकविणारे मनोहर यांनी बीसीसीआयमधील घाण स्वच्छ करायची झाल्यास लोढा समितीच्या शिफारशी लागू करणे, हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले.
काल रात्री बीसीसीआय प्रमुख जगमोहन दालमिया यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत आयपीएलचे सीईओ सुंदर रमन यांची ताबडतोब उचलबांगडी व्हावी, तसेच बोर्डातील व्यवहाराची सीबीआय चौकशी झाल्यास लोकांचा क्रिकेटवरील विश्वास पुन्हा कायम होईल. मुदगल समितीच्या अहवालात प्रथमदृष्ट्या श्रीनिवासन दोषी आढळले, तरीही त्यांनी पदाचा राजीनामा दिला नाही. आयपीएलमध्ये पाररदर्शीपणा आणायचा झाल्यास रमन यांना हटविण्याची गरज आहे. बोर्डाकडे तपासाची कुठलीही साधने नसल्यामुळे सीबीआय चौकशी हाच पर्याय उरतो, असे मनोहर यांचे मत होते. निलंबित दोन्ही संघांची मालकी बीसीसीआय सांभाळू शकते काय, या शंकेबाबत विचारताच ते म्हणाले, की बोर्डाचे नियम अशी परवानगी देत नाहीत. बीसीसीआयचा अधिकारी खेळाडूंच्या लिलावात सहभागी होऊ शकत नाही. अशी भूमिका दुटप्पी ठरत असल्याने लोकांचा रोष वाढेल. जे वाद उद्भवले त्यासाठी आयपीएल जबाबदार नसल्याचे स्पष्ट करीत ही स्पर्धा सुरू राहायला हवी, असे मनोहर यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)
२०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग व सट्टेबाजी प्रकरण उजेडात आले तेव्हाच मनोहर यांनी बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. कुठलीही व्यक्ती संस्थेपेक्षा मोठी नसते. त्यांनी खतपाणी घातल्यामुळेच अनेक वाद उत्पन्न झाले. त्यांनी तर आयसीसी चेअरमनपदावरून ताबडतोब दूर व्हायला हवे.
- शशांक मनोहर,
माजी बीसीसीआय अध्यक्ष