खेळाडू आरक्षणाच्या प्रमाणपत्रासाठी क्रीडा विभागाची दुकानदारी
By Admin | Updated: December 18, 2014 05:10 IST2014-12-18T05:10:42+5:302014-12-18T05:10:42+5:30
खेळाडूंना सुरक्षित नोकरीची हमी मिळून त्यांचा जास्तीत जास्त वेळ खेळामधील कौशल्य मिळविण्यासाठी देता यावा

खेळाडू आरक्षणाच्या प्रमाणपत्रासाठी क्रीडा विभागाची दुकानदारी
शिवाजी गोरे, पुणे
खेळाडूंना सुरक्षित नोकरीची हमी मिळून त्यांचा जास्तीत जास्त वेळ खेळामधील कौशल्य मिळविण्यासाठी देता यावा, या हेतूने सुरू केलेल्या पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी क्रीडा विभागातूनच दुकानदारी सुरू आहे. क्रीडा विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या ‘अर्थपूर्ण’ मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर या खेळाडूंवर वणवण भटकण्याची वेळ येत आहे. तायक्वांदोमध्ये राज्य पातळीवर पदके मिळवीत राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची जिद्द बाळगणारा पृथ्वीराज फडतरे हा खेळाडू क्रीडाविभागाकडून ‘गहाळ’ झालेली प्रमाणपत्रे शोधण्यासाठी वणवण भटकत आहे.
फडतरे या खेळाडूची ही प्रातिनिधिक कथा. लालफितशाहीमध्ये क्रीडा विभागातील सर्वाधिक महत्त्वाचा असलेला खेळाडू हाच घटक किती दुर्लक्षित आहे, हे दाखविणारी. सातारा जिल्ह्यातील वडूज गावचा असलेल्या पृथ्वीराजची हातातोंडाशी आलेली एक नोकरी तर गेली आहे. तर, दुसऱ्या नोकरीसाठी २०१० पासून आत्तापर्यंत किमान ३० ते ३५ वेळा चकरा माराव्या लागल्या आहेत. आता तर त्याला क्रीडा विभागाकडून सांगण्यात आले आहे, की, तुझी तीन प्रमाणपत्रे गहाळ झाली आहेत. तू दिलेल्या फाइलमध्ये नाहीत.
पृथ्वीराजने शासनाच्या खेळाडू प्रवर्गात ५ टक्के आरक्षण अंतर्गत नोकरीसाठी पहिला अर्ज नवी मुंबई पोलीस खात्यात २०१०मध्ये केला होता. २० डिसेंबर २०१० मध्ये नेमणुकीचे पत्र आले. क्रीडा संचालनालयाने त्याची सर्व प्रमाणपत्रे मागविली. ती जुलै २०११मध्ये प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविले. तोपर्यंत नवी मुंबई पोलीस खात्याने प्रमाणपत्राची पडताळणीची कागदपत्रे क्रीडा खात्याकडून वेळेवर न आल्यामुळे पृथ्वीराजच्या जागी दुसऱ्याचे नाव दाखल केले. त्यामुळे त्याची नोकरी गेली.
पृथ्वीराजने २०१४ मध्ये ठाणे पोलीस दलात नोकरीसाठी अर्ज केला. आॅगस्ट २०१४मध्ये त्याला नेमणुकीचे पत्र मिळाले. आॅगस्टमध्ये त्याची प्रमाणपत्रे क्रीडा खात्याकडे पडताळणीसाठी आली. येरवडा येथील क्रीडा विभागाच्या कार्यालयात त्याला मूळ प्रमाणपत्र (मेरिट सर्टिफिकीट) मागण्यात आले. मागील पडताळणीच्या वेळीच ही प्रमाणपत्रे दिली असल्याचे त्याने सांगितले. ती नवी मुंबईला पाठविली असल्याचे त्याला सांगण्यात आले. नवी मुंबई पोलीस कार्यालयात जाऊन चौकशी केली असता त्यांनी मूळ प्रमाणपत्रे आले नसल्याचे सांगितले गेले. पुन्हा येरवडा कार्यालयात गेल्यावर त्याला क्रीडा आयुक्तालयात पाठविण्यात आले.
कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या नोकरीप्रमाणे हीसुद्धा नोकरी हातची जाऊ नये म्हणून त्याने क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांना लवकर काम करण्याची विनंती केली. तुझी मूळ प्रमाणपत्रे आणून दे, असे सांगितल्यावर पृथ्वीराजला धक्काच बसला. प्रमाणपत्रे तुमच्याकडेच आहेत, असे त्याने सांगितले. ती आता आम्हाला शोधावी लागतील. पृथ्वीराजला आता काय करावे, हेच सुचेनासे झाले आहे. त्याच्याकडे प्रमाणपत्र व कागदपत्र मिळाल्याची पोहोचपावतीसुद्धा आहे.