विशेष विजय : कोहली
By Admin | Updated: December 8, 2015 02:23 IST2015-12-08T02:23:03+5:302015-12-08T02:23:03+5:30
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ३३७ धावांनी मिळवलेल्या विजयासाठी संघाला मेहनत घ्यावी लागली. त्यामुळे हा विजय विशेष आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.

विशेष विजय : कोहली
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ३३७ धावांनी मिळवलेल्या विजयासाठी संघाला मेहनत घ्यावी लागली. त्यामुळे हा विजय विशेष आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजय मिळवला. पहिला व तिसरा कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपला तर चौथा कसोटी सामना पाच दिवस रंगला. बेंगळुरू कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत संपला.
पुरस्कार वितरण समारंभानंतर बोलताना कोहली म्हणाला, ‘सर्वंच विजय महत्त्वाचे असतात, पण हा विजय अधिक महत्त्वाचा आहे. कारण यासाठी बराच घाम गाळावा लागला. दक्षिण आफ्रिका संघाने सामना अनिर्णीत राखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी गोलंदाजांना आक्रमक गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला आणि चहापानंतर
त्यांनी तेच केले.’
कोहली म्हणाला,‘मला दक्षिण आफ्रिकेच्या रणनीतीचे आश्चर्य वाटले. गोलंदाजांनी संयम ढळू न देता अचूक मारा केला. गोलंदाज आपल्या कामगिरीचा अभिमान बाळगू शकतात. संयम राखण्याचे दुसरे नाव कसोटी क्रिकेट आहे. मी एकटा काही करू शकत नाही, विजयाचे श्रेय सर्व ११ खेळाडूंना जाते.’
कोहली पुढे म्हणाला,‘गोलंदाजांची पाठराखण करणे गरजेचे आहे. आमच्याकडे वेगवान मारा करणारे गोलंदाज आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना चांगली कामगिरी करण्याची संधी मिळते. आज त्यांनी तेच केले.’
चौथ्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी करणारा अजिंक्य रहाणे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. रहाणे म्हणाला,‘मी एकाग्रता कायम राखली. मी नेहमी खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असतो. तंत्रावर विश्वास असेल तर निकाल अनुकूल मिळतात.’
मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेला रविचंद्रन आश्विन म्हणाला,‘मला आनंद झाला. चांगल्या मालिकेचा शानदार शेवट झाला. दक्षिण आफ्रिका संघाने सामना अनिर्णीत राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. आम्ही चांगली मेहनत घेतली व अखेर विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो. दुसऱ्या टोकाकडून रवींद्र जडेजाची चांगली साथ लाभली.’
आश्विन पुढे म्हणाला,‘खेळपट्टीवर चेंडूला अधिक उसळी मिळत नव्हती. मला जडेजाची चांगली साथ लाभली. उमेशनेही आज चांगला मारा केला.’