दक्षिण आफ्रिका सर्वबाद २१४, भारत बिनबाद ८०
By Admin | Updated: November 14, 2015 17:10 IST2015-11-14T11:35:13+5:302015-11-14T17:10:04+5:30
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुस-या कसोटीला शनिवारी सुरुवात झाली असून भारतीय गोलंदाजांनी २१४ धावांमध्ये अफ्रिकेचा पहिला डाव संपुष्टात आणला आहे

दक्षिण आफ्रिका सर्वबाद २१४, भारत बिनबाद ८०
>ऑनलाइन लोकमत
बेंगळूर, दि. १४ - दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुस-या कसोटीला शनिवारी सुरुवात झाली असून भारतीय गोलंदाजांनी २१४ धावांमध्ये अफ्रिकेचा पहिला डाव संपुष्टात आणला आहे. तर दिवस अखेरीपर्यंत भारताने एकही गडी न गमावता २२ षटकांमध्ये ८० धावा केल्या असून शिखर धवन ४५ धावांवर तर मुरली विजय २८ धावांवर खेळत होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी अफ्रिका दबावाखाली आली असून भारताला सलग दुसरी कसोटी जिंकण्याची संधी आहे.
नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी घेतली आणि सुरुवातीपासूनच फिरकी गोलंदाजांना पाचारण केले. आर. अश्विनने अवघ्या १० धावांवर असलेल्या झिलला बाद केले तर ड्युप्लेसिसला तर भोपळाही फोडू दिला नाही. नंतर जे. पी. ड्युमिनीला स्लीपमध्ये रहाणेकरवी झेलबाद करत आश्विनने तिसरा गडी टिपला तर कप्तान हाशिम आमलाला ७ धावांवर बाद करत वरूण अरॉनने अफ्रिकेला चांगलाच धक्का दिला. रवींद्र जाडेजाने लंचनंतर पहिल्याच चेंडूवर सेट झालेल्या एल्गारला ३८ दावांवर त्रिफळाचीत केले आणि अफ्रिकेची अवस्था आणखी बिकट झाली. जाडेजा व आश्विनने प्रत्येकी चार गडी बाद केले, अरॉनने एक गडी बाद केला तर एक गडी धावचीत झाला आहे.
भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये १ - ० अशी आघाडी घेतली असून अफ्रिका बरोबरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल तर भारत २ - ० अशी आघाडी घेण्यासाठी उत्सुक असेल.