आफ्रिकेने गोलंदाजांना झोडपले, भारतासमोर विजयासाठी ४३९ धावांचे लक्ष्य
By Admin | Updated: October 25, 2015 18:03 IST2015-10-25T14:09:07+5:302015-10-25T18:03:24+5:30
डी कॉक, डू प्लेसिस आणि डी व्हिलीयर्स या त्रिकुटाने भारतीय गोलंदाजांना झोडपून काढत शतके ठोकल्याने दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी ४३९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

आफ्रिकेने गोलंदाजांना झोडपले, भारतासमोर विजयासाठी ४३९ धावांचे लक्ष्य
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - डी कॉक (१०९), डू प्लेसिस (नाबाद १३३) व डी व्हिलीयर्स (११९) या तिघांनी भारतीय गोलंदाजांना झोडपून काढत शतके केल्याने दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी ४३९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आफ्रिकेने ५० षटकांत ४ गडी गमावून ४३८ धावा केल्या आहेेत.
भारतविरुद्धच्या पाचव्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज हाशिम अमला अवघ्या २३ धावांवर बाद झाल्याने त्यांना पहिला धक्का बसला. मात्र त्यानंतर डी कॉकने (१०९) फटकेबाजी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. मात्र शतक पूर्ण झाल्यावर अवघ्या काही वेळातच तो बाद झाला. त्यानंतर डू प्लेसिसने (नाबाद १३३) भारतीय गोलंदाजांना अक्षरश: झोडपून काढलं, पण १३३ धावांवर खेळत असताना तो जखमी होऊन तंबूत परतला. त्यानंतर एबी डी व्हिलियर्सने ५७ चेंडूत शतक ठोकून एकदिवसीय कारकिर्दीतील २३ वे तर भारतविरुद्धच्या मालिकेतील तिसरे शतक पूर्ण केले. ४६ व्या षटकांत तो बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ३८४ इतकी होती. त्यानंतर मिलरने फटकेबाजी केल्याने आफ्रिकेवे चारशेचा टप्पा सहज पार केला आणि अखेर ५५० षटकांत ४ बाद ४३८ अशी वानखेडे मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या उभारली.
भारतातर्फे मोहित शर्मा, सुरेश रैना, हरभजन सिंग आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी १ बळी टिपला. भुवनेश्वर कुमारने १० षटकांत दिलेल्या तब्बल १०६ धावा भारताला चांगल्याच महागात पडल्या.
भारत व दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी दोन सामने जिंकले असून हा शेवटचा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा भारताचा मानस होता, मात्र आफ्रिकन खेळाडूंनी फटकेबाजी करत उभारलेली ही मोठी धावसंख्या पाहता भारताला विजयासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत, हे स्पष्ट दिसत आहे.