आशियाई स्पर्धेसाठी नेमबाज सज्ज

By Admin | Updated: September 24, 2015 23:45 IST2015-09-24T23:45:01+5:302015-09-24T23:45:01+5:30

येथील डॉ. कर्णसिंग शूटिंग रेंजवर २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या आशियाई एअर गन चॅम्पियनशिपसाठी भारतीय नेमबाज सज्ज आहेत.

Shooter ready for Asian Games | आशियाई स्पर्धेसाठी नेमबाज सज्ज

आशियाई स्पर्धेसाठी नेमबाज सज्ज

नवी दिल्ली : येथील डॉ. कर्णसिंग शूटिंग रेंजवर २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या आशियाई एअर गन चॅम्पियनशिपसाठी भारतीय नेमबाज सज्ज आहेत. आॅलिम्पिक कोटा मिळविण्यासाठी धडपडत असलेल्या भारतीयांसाठी ही स्पर्धा मोलाची ठरेल, असे मत स्टार नेमबाज अभिनव बिंद्रा, जितू रॉय अणि भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रानिंदरसिंग यांनी गुरुवारी व्यक्त केले.
रानिंदर म्हणाले, ‘‘या स्पर्धेचे आयोजन भारतीय आणि आशियाई नेमबाजीसाठी मोलाचे आहे. २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेनंतर भारतात आयोजित होणारी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल.’’
भारताने रिओ आॅलिम्पिकसाठी आतापर्यंत ८ कोटे मिळविले आहेत. लंडन आॅलिम्पिकमधील कामगिरीमुळे भारताला आॅलिम्पिकमध्ये ११ पर्यंत कोटा मिळविण्याची संधी असेल. चार दिवसांच्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत १४ देशांमधील १८० नेमबाज सहभागी होतील. यजमान भारताचे ५६ नेमबाज सिनियर, युवा आणि ज्युनियर गटात सहभागी होतील. पाक आणि चीनमध्ये आॅलिम्पिकसाठी चाचणी स्पर्धेचे आयोजन सुरू असल्याने दोन्ही देश या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत, असे रानिंदरसिंग यांनी सांगितले.
जितू राय याला या स्पर्धेद्वारे अधिक अनुभव मिळवायचाय, तर चैनसिंग याच्यासाठी आशियाई स्पर्धा तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहील. बिंद्राशिवाय आॅलिम्पिक कोटा मिळविणारे नेमबाज आणि आॅलिम्पिक कांस्यविजेता गगन नारंग, पिस्तुल नेमबाज जितू रॉय, गुरप्रीतसिंग, प्रकाश नांजप्पा, चैनसिंग तसेच अपूर्वी चंदेला हे स्पर्धेत आव्हान सादर करणार आहेत.
चंदेला म्हणाली, ‘‘ही स्पर्धा आॅलिम्पिक तयारीचा भाग आहे. मी रायफलसह काही वस्तू बदलून घेतल्या. ही स्पर्धा भारताच्या यजमानपदाखाली होत असल्याने
येथे खेळणे अभिमानास्पद आहे.’’ पिस्तुल नेमबाज श्वेता सिंग म्हणाली, ‘‘मला या स्पर्धेत आत्मविश्वास उंचावण्यासाठी पदक जिंकायचे आहे.’’
एका प्रसिद्ध शॉटगन नेमबाजाविरुद्ध अन्य एका महिला नेमबाजाच्या आईने रायफल संघाकडे गंभीर तक्रार केली. याबाबत विचारताच रानिंदर म्हणाले, ‘‘हा दोन्ही खेळाडूंमधील वाद आहे. हा वाद आम्ही अ‍ॅथलिट आयोगाकडे सोपविला असून, सावधपणा बाळगला जात आहे. या प्रकारात कुणालाही पाठीशी घालायचे नाही, असे आमचे धोरण आहे.’’ (वृत्तसंस्था)
रिओच्या तयारीसाठी ही चांगली संंधी असेल. भविष्यातील तयारीसाठी हे महत्त्वाचे आहे. यासाठी दररोज सराव करीत असून, रेंजवर घाम गाळत आहे. भारताने सलग तीन आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याने आमच्याकडे प्रतिभावान खेळाडूंची उणीव नाही, याची खात्री पटली.- अभिनव बिंद्रा

Web Title: Shooter ready for Asian Games