सायना-सिंधूसह ७ बॅडमिंटनपटू पात्र

By Admin | Updated: May 4, 2016 03:56 IST2016-05-04T03:56:39+5:302016-05-04T03:56:39+5:30

आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यासह ७ बॅडमिंटनपटू ब्राझीलच्या रिओमध्ये यंदा आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले

Saina and Sindh along with 7 badminton characters | सायना-सिंधूसह ७ बॅडमिंटनपटू पात्र

सायना-सिंधूसह ७ बॅडमिंटनपटू पात्र

नवी दिल्ली : आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यासह ७ बॅडमिंटनपटू ब्राझीलच्या रिओमध्ये यंदा आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंची एकूण संख्या आता ८६ झाली आहे.
लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदकविजेती सायना व सिंधू (विश्व क्रमवारीत अनुक्रमे आठवे व दहावे स्थान) यांचा अव्वल १० खेळाडूंमध्ये समावेश आहे. किदांबी श्रीकांत पुरुष एकेरीच्या क्रमवारीत ११व्या स्थानी, तर महिला दुहेरीची जोडी ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा १५व्या स्थानी आहे. मनू अत्री व बी. सुमीत रेड्डी पुरुष दुहेरीच्या मानांकनामध्ये १९व्या स्थानी आहेत. या सात खेळाडूंनी बॅडमिंटन स्पर्धेसाठी रिओ आॅलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे.
भारताचे मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद म्हणाले, ‘‘पात्रता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमच्याकडे सरावासाठी जवळजवळ आठ आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. खेळाडूंसाठी हा कालावधी पुरेसा आहे. मला या वेळी अधिक पदकांची आशा आहे. लंडन आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत भारतातर्फे एकमेव कांस्यपदक सायना नेहवालने पटकावले होते.’’
भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात सर्वांत अधिक खेळाडूंनी या वेळी पात्रता मिळवली आहे. ही संख्या २०१२च्या आॅलिम्पिकमध्ये पाच होती. या वेळी यात दोनची भर पडली असून, सात झाली आहे. भारतातर्फे यात आणखी एका खेळाडूची भर पडू शकली असती; पण पारुपल्ली कश्यपवर गेल्या महिन्यात शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे तो आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला. याव्यतिरिक्त भारतीय भारोत्तोलकांनी महिला व पुरुष विभागांत प्रत्येकी एक कोटा स्थान मिळविले आहे. २०१२च्या आॅलिम्पिकमध्ये एकूण ८३ भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. त्यांत ६० पुरुष व २३ महिला खेळाडूंचा समावेश होता. या वेळी हा आकडा ८६ पर्यंत पोहोचला आहे. त्यात ४८ पुरुष व ३८ महिला खेळाडूंचा समावेश अहे.
रिओसाठी भारतीय पथकाचे प्रमुख असलेले राकेश गुप्ता म्हणाले, ‘‘सात बॅडमिंटनपटू रिओसाठी पात्र ठरणे मोठी बाब आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या अन्य खेळाडूंनाही त्यामुळे प्रेरणा मिळेल. भारत्तोलनामध्ये भारताने दोन कोटा स्थान मिळवली असून भारोत्तोलकांच्या नावाची घोषणा निवड चाचणीनंतर केली जाईल. आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या खेळाडूंच्या संख्येत आणखी भर पडणार असून हा आकडा १०० पर्यंत जाण्याची आशा आहे.’’
गुप्ता पुढे म्हणाले, ‘‘रिओसाठी पात्रता मिळवणारे खेळाडू प्रशंसेस पात्र आहेत. विश्व मानांकन, पात्रता प्रक्रिया आणि आंतरराष्ट्रीय महासंघ व आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे मापदंड पूर्ण केल्यानंतरच खेळाडू आॅलिम्पिकसाठी पात्र ठरतो.’’
भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये आणखी कोटा मिळविण्याची संधी आहे. त्यासाठी पुढच्या महिन्यात चाचणी होईल. याव्यतिरिक्त दोन पुरुष व एक महिला गोल्फरला पात्रता यादीमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. टेनिसमध्येही लवकरच काही मोठी नावे रिओ आॅलिम्पिकच्या पात्रता यादीमध्ये दिसतील. बॉक्सिंगमध्येही भारताला आशा आहे.
टेनिसमध्ये २०१२च्या आॅलिम्पिकसाठी पाच पुरुष व दोन महिला खेळाडूंसह एकूण ७ खेळाडू पात्र ठरले होते. भारताने तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, रोइंग, जिम्नॅस्टिक्स, नेमबाजी, टेबल टेनिस, भारोत्तोलन आणि कुस्ती आदी क्रीडाप्रकारांसाठी पात्रता मिळविली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina and Sindh along with 7 badminton characters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.