सचिन, सौरव व लक्ष्मण सल्लागार समितीत

By Admin | Updated: June 2, 2015 01:18 IST2015-06-02T01:18:44+5:302015-06-02T01:18:44+5:30

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना सोमवारी बीसीसीआयच्यानवनियुक्त सल्लागार समितीत स्थान

Sachin, Sourav and Laxman in the Advisory Committee | सचिन, सौरव व लक्ष्मण सल्लागार समितीत

सचिन, सौरव व लक्ष्मण सल्लागार समितीत

नवी दिल्ली : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना सोमवारी बीसीसीआयच्यानवनियुक्त सल्लागार समितीत स्थान देण्यात आले. ही समिती बीसीसीआय व राष्ट्रीय संघाला भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची बोर्डाच्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य म्हणून निवड केली. या दिग्गज क्रिकेटपटूंनी समितीच्या सदस्यपदाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. आगामी आव्हानांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांसाठी हे दिग्गज खेळाडू मदत करतील.’’
समितीमध्ये या दिग्गजांच्या भूमिकेबाबत बीसीसीआयने स्पष्ट केले, की हे तिन्ही खेळाडू स्थानिक क्रिकेटला मजबुती प्रदान करण्यासोबतच राष्ट्रीय संघाच्या विदेश दौऱ्याच्या तयारीसाठी मार्गदर्शन करतील.
बीसीसीआयने म्हटले आहे की, पहिले लक्ष्य राष्ट्रीय संघाला मार्गदर्शन करण्याचे राहील. कारण विदेशात भारतीय संघाची कामगिरी सुधारण्यास प्राधान्य देण्यात आलेले आहे. याव्यतिरिक्त प्रतिभावान खेळाडूंना सल्ला देणे आणि स्थानिक क्रिकेटचा विकासासाठी हे दिग्गज क्रिकेटपटू मदत करतील. हे तिन्ही दिग्गज क्रिकेटपटू भारतीय क्रिकेटला यशाचे नवे शिखर गाठून देतील, असा विश्वास बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी व्यक्त केला.
बीसीसीआयचे सचिव ठाकूर यांनीही दालमिया यांच्या सुरात
सूर मिसळताना या तिन्ही खेळाडूंचे आभार मानले.
ठाकूर म्हणाले, ‘‘सचिन, सौरव व लक्ष्मण यांनी या प्रस्तावाचा स्वीकार केल्यामुळे बीसीसीआयतर्फे त्यांचे आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे भारताला क्रिकेटच्या सर्व स्वरूपांत यशाचे नवे शिखर गाठण्यास मदत मिळेल, असा मला विश्वास आहे. भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असून खेळाला काही परत देण्यास इच्छुक असल्यामुळे ते प्रशंसेस पात्र आहेत.’’
लक्ष्मणने १३४ कसोटी व ८६ वन-डे सामने खेळलेले आहेत. गांगुलीवर संघाचा मुख्य प्रशिक्षक किंवा संघ संचालक या पदाची जबाबदारी सोपविण्यात येण्याची चर्चा सुरू होती; पण सल्लागार समितीमध्ये त्याची नियुक्ती करण्यात आल्यामुळे रवी शास्त्री संघ संचालकपदी कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नवे मुख्य प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफची नियुक्ती आगामी काही दिवसांत करण्यात येईल.
बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेटपटू या तिन्ही दिग्गज खेळाडूंचे मार्गदर्शन घेऊ शकतील. खडतर आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी क्रिकेटपटूंनी विशेषत: सचिनसोबत चर्चा करावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. विदेश दौऱ्यातील यशासाठी गांगुलीकडून ब्लू प्रिंट तयार करण्यासाठी सल्ला घेतला जाऊ शकतो. लक्ष्मण बेंच स्ट्रेंथ व नवी प्रतिभा शोधण्यासाठी कार्य करणार आहे. भारतीय संघ ७ जून रोजी कोलकात्याहून बांगलादेशाला रवाना होणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Sachin, Sourav and Laxman in the Advisory Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.