रणजी स्पर्धेत मुंबईचा विजयी भांगडा

By Admin | Updated: October 13, 2015 03:03 IST2015-10-13T03:03:10+5:302015-10-13T03:03:10+5:30

अखिल हेरवाडकरने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे पंजाबच्या फलंदाजांनी अक्षरक्ष: लोटांगण घातले. अखिलने चौथ्या दिवशी पंजाबच्या ६ फलंदाजांना बाद करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Ranji Trophy champions Mumbai win | रणजी स्पर्धेत मुंबईचा विजयी भांगडा

रणजी स्पर्धेत मुंबईचा विजयी भांगडा

मुंबई : अखिल हेरवाडकरने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे पंजाबच्या फलंदाजांनी अक्षरक्ष: लोटांगण घातले. अखिलने चौथ्या दिवशी पंजाबच्या ६ फलंदाजांना बाद करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एक डाव आणि १२ धावांनी पंजाब संघाला पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या डावात द्विशतक झळकवणाऱ्या मुंबईच्या श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. रणजी सामन्याच्या ग्रुप बी गटात मुंबईने ८ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
ग्रुप बी गटात मुंबईने दुसऱ्या लढतीत पहिल्या दिवसापासून दबदबा कायम ठेवला. विशेष म्हणजे, फलंदाजांनी चोख भूमिका पार पाडल्यानंतर मुंबईकरांच्या नजरा खिळल्या त्या गोलंदाजांच्या कामगिरीकडे. ४ बाद २४४ अशा स्थितीत पंजाब संघ चौथ्या दिवशी मैदानात उतरला. मनदीप सिंग (११३) आणि हिमांशू चावला (४५)ने सुरुवातीला आक्रमक फटकेबाजी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. अर्धशतकापासून केवळ ५ धावा दूर असताना बलविंदरच्या एका अप्रतिम चेंडूवर हिमांशू पायचित झाला.
कर्णधार आदित्य तरेने अखिलच्या हाती चेंडू सोपवला आणि मुंबईने विजयाच्या दिशेने चाल केली. मनदीपने गीतांश खेराच्या साथीने डाव पुढे नेला. खेराने सुंदर फटकेबाजी करत ८६ धावांचे योगदान दिले. मात्र अखिलने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत पहिला बळी मिळवला. त्याने मनदीप (११६)ला मंगेलाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
परिणामी, पंजाबच्या शेवटच्या आशादायी जोडीला सुरुंग लावला.
६ बाद ३३८ अशी स्थिती असताना सिद्धार्थ कौल (९), सरबजीत लढ्ढा (०) १२ धावांच्या अंतराने बाद झाले. खेरा (८६) बाद होताच पंजाबची शेवटची आशा संपुष्टात आली.
पंजाबची ९ बाद ३९८ अशी अवस्था झाली होती; तर मुंबईकडे अद्यापही १८ धावांची आघाडी होती. शेवटचा गडीदेखील अखिलने टिपला. बी. सरन (१५) जोरदार फटका लगावण्याच्या प्रयत्नात असताना त्याने शार्दुलच्या हाती झेल दिला. अखेर ४०३ धावांवर पंजाबचा डाव संपुष्टात आला. या पराभावामुळे गुणतालिकेत पंजाबची चौथ्या स्थानावर घसरण झाली.
सामन्यात विजयश्री मिळवून मुंबईचा संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला. पहिल्या डावात दमदार द्विशतक झळकावणारा मुंबईकर श्रेयस अय्यर सामनावीर ठरला. तिसऱ्या सामन्यात मुंबईला तामिळनाडू संघाचे आव्हान असणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबई : पहिला डाव ८ बाद ५६९ (घोषित )
पंजाब : पहिला डाव सर्वबाद १५४
आणि दुसरा डाव सर्वबाद ४०३
पंजाब (दुसरा डाव) : मनन वोहरा झे. तरे गो. ठाकूर ६, जीवनज्योत सिंग धावचित हरमित सिंग ९१, उदय कौल झे. मंगेला गो. हरमित सिंग २०, युवराज सिंग त्रिफळाचित हेरवाडकर १४, मनदीप सिंग झे. मंगेला गो. हेरवाडकर ११६, हिमांशू चावला पायचित संधू ४५, गीतांश खेरा झे. यादव गो. हेरवाडकर ८६, सिद्धार्थ कौल झे. मंगेला गो. हेरवाडकर ९, सरबजीत लढ्ढा पायचित हेरवाडकर ०, बी सरन झे. ठाकूर गो. हेरवाडकर ०, व्ही खन्ना नाबाद १.
अवांतर - १, एकूण- १२७.२ षटकांत
सर्वबाद ४०३
गोलंदाजी : धवल कुलकर्णी १९-४-६१-०; शार्दूल ठाकूर १७-१-७३-१; बलविंदर संधू २२-८-५६-१; अभिषेक नायर १३-१-३९-०; हरमित सिंग ३३-३-११७-१, अखिल हेरवाडकर २२.२-५-५२-६, सिद्धार्थ लाड १-०-५-०.

Web Title: Ranji Trophy champions Mumbai win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.