रहाणे, जडेजासमोर दक्षिण आफ्रिकेच लोटांगण
By Admin | Updated: December 4, 2015 20:12 IST2015-12-04T16:59:09+5:302015-12-04T20:12:26+5:30
फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू असलेल्या अंतिम कसोटी सामन्यात आज रविंद्र जाडेजाच्या प्रभावी फिरकी मा-यासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव १२१ धावात संपुष्टात आला आहे.

रहाणे, जडेजासमोर दक्षिण आफ्रिकेच लोटांगण
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विनच्या दमदार फलंदाजीनंतर रविंद्र जाडेजाने केलेल्या प्रभावी फिरकी गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १२१ धावात संपुष्टात आला आणि भारताला २१३ धावांची मोठी आघाडी मिळाली. सावध सुरुवात करणा-या दक्षिण आफ्रिकेचे सर्व फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. डीएन एल्गार (१७), बावुमा (२२), कर्णधार हाशिम अमला (३) , जेपी डयुमिनी (१), डेन पीट (५) आणि फा डु प्लेसिस (०) यांना स्वस्तात तंबूत परतवले. रविंद्र जाडेजाने ५, उमेश यादव आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले, तर इशांत शर्माने एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला.
त्यापूर्वी अजिंक्य रहाणे (१२७) आणि आर. अश्विनच्या (५६) झुंजार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३३४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे अॅबॉटने ५, पिएटने ४ तर इम्रान ताहिरने १ बळी टिपला.
भारताने ७ बाद २३१ वरून दुस-या दिवसाचा खेळ सुरू केला. अजिंक्य रहाणेने चिवट खेळी करून भारतीय मैदानावर शानदार शतक झळकावले, त्याला अश्विनचीही चांगली साथ मिळाली. मात्र १२७ धावांवर खेळताना रहाणे इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि भारताची स्थिती ८ बाद २९६ अशी झाली होती. त्यानंतर आर. अश्विनने अर्धशतकी खेळी करत भारताला ३०० धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र भारताच्या ३३४ धावा झालेल्या असताना अश्विनच्या रुपाने (५६) नववा गडी बाद झाला आणि त्यापाठोपाठ इशांत शर्मा (०) भोपळाही न फोडता तंबूत परतला आणि भारताचा डाव ३३४ धावांवर आटोपला.