रहाणे एका रात्रीत उत्कृष्ट झाला नाही
By Admin | Updated: November 18, 2015 01:42 IST2015-11-18T01:42:12+5:302015-11-18T01:42:12+5:30
अजिंक्य रहाणे एका रात्रीत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून घडला नाही, तर यासाठी त्याने सराव सत्रांत शेकडो झेल घेण्याचा कसून सराव केला. त्यामुळेच त्याला आज स्लीपमधील सर्वोत्कृष्ट

रहाणे एका रात्रीत उत्कृष्ट झाला नाही
बंगळुरू : अजिंक्य रहाणे एका रात्रीत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून घडला नाही, तर यासाठी त्याने सराव सत्रांत शेकडो झेल घेण्याचा कसून सराव केला. त्यामुळेच त्याला आज स्लीपमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जाते, असे टीम इंडियाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी सांगितले.
कसोटी सामन्यात एकाच डाव सर्वाधिक झेल घेण्याचा जागतिक विक्रम नोंदवलेल्या रहाणेविषयी श्रीधर यांनी सांगितले की, रहाणेमध्ये उत्तम स्लीप क्षेत्ररक्षक बनण्याचा जोश आहे. यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली आहे.
त्याने सराव सत्रात शेकडो झेल घेण्याचा सराव केला असून, यातून त्याला काय साध्य करायचे आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. त्याचप्रमाणे सामन्यात झेल कसा व किती उंचीने येईल हे तो जाणून आहे. संघाची रणनीती तयार करताना, त्याने स्वत:ला स्लीप क्षेत्ररक्षक म्हणून तयार केले. याचा संघाला खुप फायदा होतो आहे, असेही श्रीधर म्हणाले.
क्षेत्ररक्षणाबाबत अधिक माहिती देताना श्रीधर यांनी सांगितले की, स्लीप क्षेत्ररक्षणासाठी आमचा भर कायमस्वरूपी क्षेत्ररक्षकांवर असतो; मात्र श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत शिखर धवन आणि मुरली विजय दुखापतग्रस्त झाल्यानंतर लोकेश राहुलला त्या जागी उभे राहावे लागले होते. आता विराट कोहली आणि रहाणे यांच्यामुळे आमचे प्रश्न सुटले असून, जेव्हा कधी परिस्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर असते, तेव्हा आम्ही आमचे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्लीपच्या ठिकाणी उभे करतो.
भारत-दक्षिण आफ्रिका संघांच्या क्षेत्ररक्षकांविषयी श्रीधर म्हणाले की, एबी डिव्हीलियर्स उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असल्याचे तुम्ही सांगू शकता; मात्र माझ्या मते रवींद्र जडेजा नैसर्गिक क्षेत्ररक्षक आहे. टीम इंडियातील प्रत्येक क्षेत्ररक्षक काहीतरी
हटके करण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळेच सामूहिक क्षेत्ररक्षणाच्या दृष्टिकोनातून भारताचे क्षेत्ररक्षण उंचावले आहे. (वृत्तसंस्था)
विराट कोहलीमध्ये खूप जोश आहे, तर रहाणे फलंदाजांच्या जवळ उभा राहणारा चपळ क्षेत्ररक्षक आहे. काहीजण शांत असतात, तर शिखर धवन अप्रतिम अॅथलिट आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणाच्या बबतीत सध्याची टीम इंडिया उत्कृष्ट आहे. - आर. श्रीधर