भारतात खेळण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही
By Admin | Updated: November 17, 2015 03:10 IST2015-11-17T03:10:09+5:302015-11-17T03:10:09+5:30
पाकिस्तानसाठी भारतात प्रस्तावित द्विपक्षीय मालिका खेळणे सयुक्तिक ठरणार नाही, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले.

भारतात खेळण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही
नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी भारतात प्रस्तावित द्विपक्षीय मालिका खेळणे सयुक्तिक ठरणार नाही, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पीसीबीला भारतात मालिका खेळण्याचा सल्ला दिला आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पीसीबीला पत्र लिहून पाकिस्तानला डिसेंबर महिन्यात भारतात प्रस्तावित द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी आमंत्रण दिले आहे, असे शहरयार खान यांनी सांगितले.
शहरयार म्हणाले, ‘भारताने यूएईमध्ये खेळण्याची तयारी दर्शविली तरच मालिका शक्य आहे. लाहोरमध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर २००९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान संघ मायदेशातील मालिका यूएईमध्ये खेळत आहे.’
उभय देशांच्या बोर्डांदरम्यान झालेल्या करारानुसार पाकिस्तानला दोन कसोटी, पाच वन-डे आणि दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी यजमानपद भूषवायचे आहे. आता मालिकेसाठी केवळ महिन्याचा कालावधी उपलब्ध आहे. कारण भारतीय संघ १२ जानेवारीपासून प्रारंभ होत असलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ८ जानेवारी रोजी आॅस्ट्रेलियाला जाणार आहे.
भारतात द्विपक्षीय मालिकेचा अंतिम निर्णय सरकावर अवलंबून असतो. त्याप्रमाणे पीसीबीविरुद्धच्या प्रस्तावित मालिकेच्या अंतिम निर्णयासाठी सरकारच्या मंजुरीची गरज आहे. (वृत्तसंस्था)
भारतात खेळण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. यूएईमध्ये न खेळण्याचे कारण अद्याप कळलेले नाही. त्या कारणाची मला अद्याप प्रतीक्षा आहे. आम्ही २००७ व २०१२मध्ये भारत दौऱ्यावर गेलो होतो. या वेळी पुन्हा तसे होणार नाही. ही आमची मालिका असून आम्ही आमच्या स्थळांवर (यूएई)
सामने खेळू. यूएईमध्ये खेळण्यास कुठली अडचण आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या काही सामन्यांचे यूएईमध्ये आयोजन केले होते, मग पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळण्यास कुठली अडचण आहे.
- शहरयार खान