पंड्याची एकाकी झुंज भारत ९ बाद १६९
By Admin | Updated: September 15, 2016 23:24 IST2016-09-15T23:24:13+5:302016-09-15T23:24:13+5:30
हार्दिक पंड्याच्या नाबाद (७९ धावा) अर्धशतकी खेळीनंतरही आघाडीची फळी अपयशी ठरल्यामुळे भारताची आॅस्ट्रेलियाविरुद्ध चार दिवसीय चौरंगी ‘अ’ संघाच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीत

पंड्याची एकाकी झुंज भारत ९ बाद १६९
ब्रिस्बेन : हार्दिक पंड्याच्या नाबाद (७९ धावा) अर्धशतकी खेळीनंतरही आघाडीची फळी अपयशी ठरल्यामुळे भारताची आॅस्ट्रेलियाविरुद्ध चार दिवसीय चौरंगी ‘अ’ संघाच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीत पावसाच्या व्यत्ययापूर्वी पहिल्या दिवशी ९ बाद १६९ अशी अवस्था झाली आहे. पंड्याने ११२ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार व १ षटकार ठोकला.
फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर भारतीय संघाची आघाडीची फळी सपशेल अपयशी ठरली. तळाच्या फलंदाजांच्या मदतीमुळे भारताला दीडशेचा पल्ला ओलांडता आला. जयंत यादवने भारताच्या डावात उपयुक्त योगदान दिले. त्याने ६९ चेंडूंना सामोरे जाताना २८ धावा फटकावल्या. त्यात चार चौकारांचा समावेश आहे. आॅस्ट्रेलियातर्फे केन रिचर्डसन व जॅक्सन बर्ड यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. रिचर्डसनने (३७ धावांत ३ बळी) सुरुवातीला एकापाठोपाठ धक्के दिले. त्याने फैज फझल (०) याला खाते उघडण्यापूर्वीच तंबूचा मार्ग दाखवला. करुण नायर (१) बाद होणारा दुसरा खेळाडू ठरला. तो हिल्टन कार्टराईटच्या थेट फेकीवर धावबाद झाला. त्यानंतर भारताची ४ बाद ११ अशी नाजूक अवस्था झाली होती. भारत ‘अ’ संघाचा कर्णधार नमन ओझा (१९) उपाहारानंतर बाद झाला.