इतिहास घडविण्याची संधी

By Admin | Updated: August 4, 2015 00:47 IST2015-08-04T00:47:31+5:302015-08-04T00:47:31+5:30

सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, अनिल कुंबळे आणि महेंद्रसिंह धोनी या दिग्गज कर्णधारांच्या संघांना जे शक्य झाले नाही तो पराक्रम करण्याच्या निर्धाराने

Opportunity to make history | इतिहास घडविण्याची संधी

इतिहास घडविण्याची संधी

नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, अनिल कुंबळे आणि महेंद्रसिंह धोनी या दिग्गज कर्णधारांच्या संघांना जे शक्य झाले नाही तो पराक्रम करण्याच्या निर्धाराने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. विराट कोहलीची प्रथमच पूर्णकालिक मालिकेसाठी कर्णधार म्हणून निवड झाली आहे. गेल्या २२ वर्षांत भारताला श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. या कालावधीत गांगुलीने भारतीय संघाला विदेशात विजय मिळविण्याचे शिकविले आणि धोनीने आयसीसी कसोटी मानांकनामध्ये संघाला अव्वल स्थान मिळवून दिले; पण शेजारी देशाविरुद्ध त्यांच्यात भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम मात्र त्यांना करता आला नाही.
कोहली अँड कंपनीची नजर आता श्रीलंकेमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची प्रदीर्घ कालावधीपासून असलेली प्रतीक्षा संपविण्यावर केंद्रित झालेली आहे. त्यांना महम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखालील संघाच्या पंक्तीत स्थान मिळविण्याची संधी आहे. भारताने आतापर्यंत श्रीलंकेत सहा कसोटी मालिका खेळल्या असून त्यात त्यांना केवळ एकदा मालिका विजय मिळविता आला आहे. अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली १९९३ मध्ये तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने विजय मिळविला होता.
या मालिकेचा अपवाद वगळता भारताने श्रीलंका दौऱ्यात मालिका गमाविली किंवा बरोबरीत सोडवली. श्रीलंकेने मायदेशात भारताविरुद्ध आतापर्यंत सहापैकी तीन कसोटी मालिका जिंकलेल्या आहेत. श्रीलंकेला भारतात अद्याप विजय साकारता आलेला नाही, ही वेगळी बाब आहे. त्यामुळे उभय संघांना एकमेकांच्या देशांमध्ये खेळताना अडचण भासत असल्याचे स्पष्ट होते.
श्रीलंकेत धोनीच्या नेतृत्वाखालीही संघाचे नशीब बदलले नाही. २०१० मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला मालिकेत पराभव स्वीकारावा लागला नसला तरी विजयही मिळवता आला नाही. तीन सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत संपली. त्यामुळे १९९३ पासून भारताला श्रीलंकेत मालिका विजय साकारता आलेला नाही.
श्रीलंका संघाला आताही माहेला जयवर्धनेसारख्या खेळाडूची उणीव भासत आहे. कुमार संगकारा भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळणार आहे.
श्रीलंकेला अलीकडेच पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतीय संघ परंपरागत प्रतिस्पर्धी संघाच्या कामगिरीतून प्रेरणा घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडूंना श्रीलंकेत कसोटी खेळण्याचा अनुभव नाही, ही वेगळी बाब आहे.
फलंदाजांबाबत विचार करता सध्याच्या संघातील केवळ मुरली विजयने श्रीलंकेत कसोटी सामना खेळलेला आहे. त्याने २०१० मध्ये दोन सामन्यांच्या मालिकेत ३३ च्या सरासरीने ९९ धावा केल्या होत्या. त्याची सर्वोच्च खेळी होती ५८ धावांची. याव्यतिरिक्त २००८ मध्ये रोहित शर्मा आणि २०१० मध्ये ऋद्धिमान साहा संघाचे सदस्य होते, पण त्यांना अंतिम संघात संधी मिळाली नव्हती.
अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली एका सामन्यात यश
भारताने १९८५ ला सर्वप्रथम श्रीलंकेचा दौरा केला होता. कपिलदेवच्या नेतृत्वाखालील संघाने त्या वेळी तीन कसोटी सामने खेळले, पण मालिका १-० ने गमावली. त्यानंतर १९९३ मध्ये अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने एसएससी कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २३५ धावांनी विजय मिळवला होता. भारताचा त्या वेळी विदेशात खेळल्या गेलेल्या २७ कसोटी सामन्यांतील हा पहिला विजय होता. या दौऱ्यात कँडी व पीएसएस कोलंबोमध्ये खेळले गेलेले उर्वरित दोन कसोटी सामने अनिर्णीत अवस्थेत संपले होते.
जवळजवळ दोन वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या आॅफस्पिनर हरभजनसिंगने श्रीलंकेत एकूण ९ कसोटी सामने खेळले आहेत, पण मुथय्या मुरलीधरनच्या देशात त्याला विशेष छाप सोडता आलेली नाही. हरभजनने या ९ सामन्यांत केवळ २५ बळी घेतले असून त्याची सरासरी ४६.९२ आहे. लेगस्पिनर अमित मिश्राला २०१० मध्ये एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने ४६.७५ च्या सरासरीने ४ बळी घेतले होते. इशांत शर्माला २००८ व २०१० मध्ये मालिकेतील सर्व सामने खेळण्याची संधी मिळाली होती. सहा कसोटी सामन्यांत त्याला ४९.६१ च्या सरासरीने केवळ १३ बळी घेता आले आहेत.

(वृत्तसंस्था)

Web Title: Opportunity to make history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.