आॅलिम्पिक पथक मोठे, पण अधिकाऱ्यांवर वचक : सोनोवाल
By Admin | Updated: May 2, 2016 02:11 IST2016-05-02T02:11:46+5:302016-05-02T02:11:46+5:30
रिओ आॅलिम्पिकमध्ये दहा पदके जिंकण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले असल्याचे सांगून यंदा भारत सर्वात मोठे पथक पाठवेल. त्याचवेळी अधिकाऱ्यांच्या संख्येवर विशेष लक्ष असेल, असे क्रीडा राज्यमंत्री

आॅलिम्पिक पथक मोठे, पण अधिकाऱ्यांवर वचक : सोनोवाल
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये दहा पदके जिंकण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले असल्याचे सांगून यंदा भारत सर्वात मोठे पथक पाठवेल. त्याचवेळी अधिकाऱ्यांच्या संख्येवर विशेष लक्ष असेल, असे क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) सोनोवाल यांनी म्हटले आहे.
काल रात्री आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या सहभोजन सोहळ्यात सोनोवाल म्हणाले,‘ यंदा ७७ खेळाडू रिओसाठी आतापर्यंत पात्र ठरले. ही संख्या १०० वर जाईल त्यामुळे सर्वांत मोठे पथक आॅलिम्पिकला जाईल, हे निश्चित झाले. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये ८३ खेळाडू सहभागी झाले होते. आॅलिम्पिक पथकासोबत मोठ्या संख्येने अधिकारी जातात, ही प्रवृत्ती नाहिशी करणार का, असा सवाल करताच ते म्हणाले,‘ आम्ही अधिकाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवणार आहोत. काहीही काम नसताना कुणी जाणार नाही, याची खबरदारी घेऊ. जे अधिकारी जातील त्यांचा उद्देश जाणून घेऊ . या उद्देशाची गरज आहे काय याची खात्री केल्यानंतरच पाठविण्याचा निर्णय घेण्यात येईल. ’
कुठल्या खेळाकडून पदकाची अधिक आशा आहे, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले,‘ कुठल्या खेळात पदक मिळेल हे सांगणे कठीण आहे. पण लंडनमधील सहा पदकांच्या तुलनेत यंदा दहापेक्षा अधिक पदकांची अपेक्षा बाळगता येईल. एखाद्या खेळाडूकडून अधिक अपेक्षा बाळगल्यास त्या खेळाडूंवर अधिक दडपण येऊ शकते याची मला जाणीव आहे. आमचे खेळाडू कठोर सरावात व्यस्त असून पुढील तीन - चार महिन्यात त्यांची कामगिरी आणखी उंचावेल. ’
बीसीसीआयमध्ये पायाभूत सुधारणा घडवून आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या न्या. लोढा समितीच्या शिफारशी लागू करणे, क्रीडा विधेयक आणि खेळातील भ्रष्टाचार व अफरातफर याबाबतच्या विधेयकासंदर्भात सोनोवाल यांनी यावर सर्व संमतीची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या इंडियन ग्रॅण्डप्रिक्स अॅथ्लेटिक्स स्पर्धेच्यावेळी वीज नसल्याने खेळाडूंचे रेकॉर्ड नोंदविण्यात अडचण आली. स्टेडियममध्ये बॅकअपची सुविधा नसल्यावरून वाद उद्भवला होता. यावर क्रीडामंत्री म्हणाले,‘ साईद्वारे बॅक सुविधा उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे.’ कुठल्याही आयोजनात अशा प्रकारच्या नाचक्कीचा सामना करावा लागू नये, अशी भावना त्यांनी बोलून दाखविली. हे स्नेहभोजन क्रीडामंत्री या नात्याने त्यांचा समारोप समारंभ तर नव्हे, असे विचारताच सोनोवाल यांनी हसून उत्तर देणे टाळले. आसामच्या विधानसभा निवडणुकीत सोनोवाल यांना भाजपने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले हे विशेष.(वृत्तसंस्था)