सरकारच्या नव्या धोरणाचा नेमबाजांना फटका

By Admin | Updated: August 7, 2015 22:32 IST2015-08-07T22:32:19+5:302015-08-07T22:32:19+5:30

गेल्या काही आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकांची हमखास कमाई करून देणाऱ्या शूटिंग या खेळाकडे क्रीडा मंत्रालयाने विशेष लक्ष्य केंद्रित केले आहे. नव-नवे धोरण राबवून नेमबाजांना योग्य त्या संधी

The new policy of the government hit the shooters | सरकारच्या नव्या धोरणाचा नेमबाजांना फटका

सरकारच्या नव्या धोरणाचा नेमबाजांना फटका

नाशिक : गेल्या काही आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकांची हमखास कमाई करून देणाऱ्या शूटिंग या खेळाकडे क्रीडा मंत्रालयाने विशेष लक्ष्य केंद्रित केले आहे. नव-नवे धोरण राबवून नेमबाजांना योग्य त्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. मात्र भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ऐन आॅलिम्पिकच्या तोंडावरच नवे धोरण अंमलात आणल्याने त्याचा फटका एका गुणवंत नेमबाजाला बसला आहे. आॅलिम्पिकची पूर्वतयारी समजल्या जाणाऱ्या शूटिंग वर्ल्डकपमध्ये निवड झाल्यानंतरही या नेमबाजाला केवळ क्रीडा प्राधिकरणाच्या नव्या धोरणामुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.
५ ते १५ आॅगस्टदरम्यान अजरबैजान या देशात चौथी शूटिंग वर्ल्डकप स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी भारतातून गुरप्रित सिंग, विजयकुमार व अक्षय अष्टपुत्रे या तीन नेमबाजांची निवड करण्यात आली होती. पुढील वर्षी होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेच्यादृष्टीने ही स्पर्धा अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जात असल्याने या तिन्ही नेमबाजांना आॅलम्पिक कोटा जिंकण्याची सुवर्णसंधीच चालून आली होती. मात्र भारतीय क्रीडा प्राधिकरण व राष्ट्रीय नेमबाजी संघटनेने ऐन आॅलिम्पिक स्पर्धेच्या तोंडावरच नवे धोरण अंमलात आणल्याने त्याचा परिणाम वर्ल्डकपसाठी निवड झालेल्या या नेमबाजांवर झाला आहे. नव्या धोरणानुसार देशांतर्गत खेळलेल्या नेमबाजी स्पर्धांमध्ये ‘मिनिमम ट्रायव्हलिंग स्कोर’ (एमटीएस) मिळविलेल्या नेमबाजांनाच शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार असल्याचे जाहीर केल्याने, ‘स्व-खर्चाने स्पर्धेत सहभागी व्हा अन्यथा माघार घ्या’ हा एकमेव पर्याय या नेमबाजांसमोर होता.
दरम्यान, या नव्या धोरणामध्ये गुरप्रित सिंग यांचाच समावेश करण्यात आल्याने अन्य दोन नेमबाज स्पर्धेला मुकणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र विजयकुमार यांना आर्मी कोट्यातून आर्थिक सहाय्य मिळाल्याने त्यांना या स्पर्धेत भाग घेता आला, तर अक्षय अष्टपुत्रे या गुणवंत नेमबाजाला केवळ आर्थिक सहाय्य न मिळाल्याने स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारच्या या भूमिकेमुळे अक्षय अष्टपुत्रे या नेमबाजाचे पर्यायाने देशाचे नुकसान झाले, अशा प्रतिक्रिया आता व्यक्त केल्या जात आहेत.

Web Title: The new policy of the government hit the shooters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.