राष्ट्रीय फुटबॉल संघाने केले निराश
By Admin | Updated: December 26, 2015 02:56 IST2015-12-26T02:56:39+5:302015-12-26T02:56:39+5:30
राष्ट्रीय फुटबॉल संघाची निराशाजनक कामगिरी यंदाच्या वर्षीही मागील पानावरून पुढे सुरू राहिली; परंतु आयएसएलची वाढती लोकप्रियता आणि महान खेळाडू पेले

राष्ट्रीय फुटबॉल संघाने केले निराश
नवी दिल्ली : राष्ट्रीय फुटबॉल संघाची निराशाजनक कामगिरी यंदाच्या वर्षीही मागील पानावरून पुढे सुरू राहिली; परंतु आयएसएलची वाढती लोकप्रियता आणि महान खेळाडू पेले यांची भारत भेट ह्या या वर्षातील दोन संस्मरणीय घटना म्हणता येतील.
फिफा अंडर-१७ वर्ल्डकप २०१७च्या यजमानपदाची तयारी करीत असलेल्या भारताच्या राष्ट्रीय संघाने पुन्हा एकदा सर्वांना निराश केले. २०१८च्या फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीत भारताला सहा सामन्यांत केवळ तीन गुणच मिळवता आले. स्टीफन कोन्सटेन्टाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने पाच सामने गमावले. भारताने एकमेव विजय गुआमविरुद्ध मिळविला. या छोट्या देशाविरुद्धही भारताने १-० असा निसटता विजय मिळविला.
भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून दुसऱ्यांदा जबाबदारी पार पाडत असणाऱ्या कोन्सटेन्टाईन यांना भारतीय वंशाच्या खेळाडूंना राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याच्या मुद्यावरून वादाला सामोरे जावे लागले होते. त्याशिवाय खेळाडूंना राष्ट्रीय शिबिरासाठी खेळाडूंना रिलीज न केल्याबद्दलही कोन्सटेन्टाईन चर्चेत आले होते.
भारत आपल्या वर्ल्ड रँकींगमध्ये सुधारणा करू शकला नाही. सध्या भारतीय संघ १६६ व्या क्रमांकावर आहे. वर्षात हा संघ २०० देशांपैकी १७२ व्या स्थानावरही पोहोचला होता.
यंदा दोन सकारात्मक गोष्टी घडल्या. त्यापैकी एक म्हणजे आयएसएलचे दुसरे पर्वही चांगले यशस्वी ठरले. चेन्नईयन एफसी संघाने जोरदार पुनरागमन करीत विजेतेपदाचा बहुमान पटकावला. पण अंतिम सामन्यानंतर एफसी गोवा संघ आणि चेन्नईचा स्टार खेळाडू एलानो ब्लूमर यांच्यातील झालेला वाद दुर्दैवी ठरला. ब्लूमरला झालेल्या अटकेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चुकीचा संदेश गेल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे.
२०१७ मध्ये होणाऱ्या अंडर-१७ वर्ल्डकपची तयारी भारतामध्ये जोरात सुरू आहे. गेल्या स्पर्धेचा यजमान देश चिलीने नोव्हेंबरमध्ये भारताला अधिकृतरित्या यजमानपद सोपविले.
ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी सरत्या वर्षात भारत दौरा केला. त्यांचा हा दुसरा भारत दौरा होता. पण या दौऱ्यात त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहून ते भारावून गेले. भारतात फुटबॉलबद्दल असणारी आस्था पाहून हा देश क्रिकेटसारखाच फुटबॉलची महासत्ता बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. पेले यांचे शब्द खरे ठरावेत, अशीच भारतीयांची भावना आहे.
भारताची एकेकाळी सर्वांत प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या आयलीग स्पर्धेचे भवितव्य धोक्यात आले आहे. पुणे एफसी, भारत एफसी आणि रॉयल वाहिंगदोह एफसी यांनी स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या स्पर्धेवर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत.