मुरली, रहाणेने सांभाळले
By Admin | Updated: December 18, 2014 05:14 IST2014-12-18T05:14:34+5:302014-12-18T05:14:34+5:30
मुरली विजय (१४४) आणि अजिंक्य रहाणेच्या (७५*) धावांच्या बळावर भारताने बुधवारपासून सुरु झालेल्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या

मुरली, रहाणेने सांभाळले
ब्रिस्बेन : मुरली विजय (१४४) आणि अजिंक्य रहाणेच्या (७५*) धावांच्या बळावर भारताने बुधवारपासून सुरु झालेल्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सुरुवातीच्या झटक्यांपासून स्वत:ला सावरले. भारताने दिवसअखेर ४ विकेट्सच्या मोबदल्यात ३११ धावांचा समाधानकारक पल्ला गाठला.
दुखापतीतून सावरून कमबॅक करणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि चहापानापर्यंत ३ बाद १५१ धावा अशा दयनीय अवस्थेत संघ सापडला. भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८३ षटकांत चार बाद ३११ धावा बनविल्या. अजिंक्य रहाणे ७५ धावांवर, तर रोहित शर्मा २६ धावांवर खेळत आहे.
सलामीवीर मुरलीने भारताच्या डावाला आकार दिला आणि आपल्या कसोटी कारकिर्दीतले पाचवे शतक पूर्ण केले. मुरलीने २१३ चेंडूंत २२ चौकार लगावून १४४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुरलीने रहाणेसह चौथ्या विकेटसाठी १२४ धावांची मजबूत भागीदारी करून संघाला तीनशेचा पल्ला पार करून दिला. मुरलीचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध हा चौथे कसोटी शतक आहे. याचबरोबर त्याने कसोटीत आपले २००० धावा पूर्ण केल्या. याआधी रहाणेने सहावा अर्धशतक पूर्ण केले. अॅडिलेड कसोटीत सामनावीराचा किताब पटकावणाऱ्या नॅथन लिआॅनने मुरलीला ब्रॅड हॅडिनकरवी झेलबाद करून माघारी धाडले. मुरली बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोहितने ३४ चेंडूंत दोन चौकार व एक षटकार खेचून नाबाद २६ धावा केल्या.
तत्पूर्वी गॅबाच्या उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताला या खेळपट्टीवर एकही कसोटी विजय मिळवता आलेला नाही. शिखर धवन पुन्हा फ्लॉप ठरला. ३९ चेंडूंत २४ धावा करणाऱ्या धवनला मिशेल मार्शने हॅडिनकरवी झेलबाद केले. धावफलकावर ५६ धावा असताना धवन माघारी परतला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा १८ धावांवर पहिलीच कसोटी खेळणाऱ्या जोश हेजलवुडच्या गोलंदाजीवर माघारी परतला.