मुंबईकरांनो, तुमचा पाठिंबा मोलाचा
By Admin | Updated: May 26, 2015 01:49 IST2015-05-26T01:49:50+5:302015-05-26T01:49:50+5:30
हा क्षण तुमच्यसोबत साजरा केल्याचा आनंद शब्दांत सांगू शकत नाही, असे भावनिक आभार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आयपीएल विजेतेपद पटकवल्यानंतर मुंबईकरांचे मानले.

मुंबईकरांनो, तुमचा पाठिंबा मोलाचा
सचिनने मानले आभार : मुंबई इंडियन्सचे जल्लोषात स्वागत
मुंबई : नमस्कार मुंबई... तुमचा पाठिंब खुप मोलाचा होता.. त्याशिवाय आम्हाला यश मिळणे शक्य नव्हते. असे आनंदाचे क्षण फार कमी येतात, मात्र हा क्षण तुमच्यसोबत साजरा केल्याचा आनंद शब्दांत सांगू शकत नाही, असे भावनिक आभार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आयपीएल विजेतेपद पटकवल्यानंतर मुंबईकरांचे मानले.
सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजल्यापासूनच वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींची गर्दी होत होती. कोणताही सामना नसताना वानखेडे स्टेडियमवर होणारी गर्दी पाहून सामान्य मुंबईकरांना देखील आश्चर्य वाटत होते. मात्र खरे कारण कळाल्यानंतर आपसूकच त्यांची पावले देखील वानखेडेच्या दिशेने वळाले. कारण यंदाच्या आयपीएल सत्राचे दिमाखदार विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडीयन्स संघाचे आगमन घरच्या मैदानावर होणार होते.
रात्री ८ वाजून २४ मिनिटांनी टीम मुंबई इंडियन्स वानखेडे मैदानात उतरली ती सामना खेळण्यासाठी नाही तर अडखळत्या सुरुवातीनंतरही ज्या चाहत्यांनी साथ न सोडता प्रोत्साहन दिले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि यावेळी आपल्या लाडक्या संघाला पाहताच उपस्थित चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडले.
तासभर चाललेल्या या सोहळ्यामध्ये मुंबईकरांनी मोठ्या उत्साहात आपल्या विजयी संघाचे दमदार स्वागत केले. सलग चार सामने गमावल्यानंतर क्वालिफायर गाठण्याची देखील शक्यता नसताना संघाने थेट विजेतेपदाला गवसणी घातल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. सर्वप्रथम संघाने संपुर्ण स्टेडियमवर फेरीमारुन मुंबईकरांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले. यावेळी भज्जी, पोलाडसह साऱ्याच खेळाडूंनी स्टेडियम गाजवले. भज्जीने मी पंजाबीपेक्षा स्वत:ला मुंबईकर समजत असल्याचे सांगून मुंबईकरांना जिंकले.
दरम्यान यावेळी सर्वाधिक जयघोष झाला तो सचिनचा. सचिनने देखील आपल्या चहत्यांचे मनापासून आभार मानताना विजेतेपदाचे सारे श्रेय चाहत्यांना दिले. विशेष म्हणजे सचिनने मराठीतून संवाद साधल्याने स्टेडियममध्ये जबरदस्त जोश दिसून आला. रात्री ९ वाजून ४ मिनिटांनी लहान मुलांच्या हस्ते ‘आयपीएल ट्रॉफी’ मैदानात आणली गेली.
चाहत्यांचा पाठिंबा अप्रतिम होता. संघाची एकूण सुरुवात पाहता त्यांनी आमची साथ कधीच सोडली नाही. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाल प्रोत्साहन मिळाले. या संपुर्ण सत्रात शालेय विद्यार्थ्यांना मुंबईच्या सामन्यासाठी निमंत्रित केले होते. तो क्षण अवर्णनिय आहे. त्यांचे शुभेच्छा देखील खुप मोलाचे होते.
- नीता अंबानी ,
मुंबई इंडियन्स संघमालकीण
निराशाजनक सुरुवातीनंतर मिळवलेली विजयी लय महत्त्वाची ठरली. यासाठी संघातील प्रत्येकाने खुप मेहनत घेतली. विशेष म्हणजे चाहत्यांनी आमच्यवरील विश्वास ढासळू दिला नाही. त्यामुळे हे विजेतेपद खास मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आहे.
- रोहित शर्मा,
कर्णधार