रणजी चषकात मुंबईचा ४४ धावांत खुर्दा; दिवसभरात २२ बळींचा विक्रम
By Admin | Updated: February 26, 2015 01:58 IST2015-02-26T01:58:52+5:302015-02-26T01:58:52+5:30
बेंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या मुंबई-कर्नाटक संघातील रणजी चषक स्पर्धेतील उपांत्यफेरीच्या सामन्यात

रणजी चषकात मुंबईचा ४४ धावांत खुर्दा; दिवसभरात २२ बळींचा विक्रम
पुणे : बेंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या मुंबई-कर्नाटक संघातील रणजी चषक स्पर्धेतील उपांत्यफेरीच्या सामन्यात दिवसभरात दोन्ही संघांचे २२ गडी बाद होण्याचा विक्रम बुधवारी झाला. कर्नाटकला पहिल्या डावांत २०२ धावांत गुंडाळल्यानंतर, तब्बल चाळीस वेळा रणजी चषक स्पर्धेतचा किताब पटकविणाऱ्या मुंबई संघाचा डाव अवघ्या ४४ धावांत संपुष्टात आला.
मुंबईची ही आत्तापर्यंतची दुसरी निचांकी खेळी आहे. कर्नाटकचा कर्णधार आर. विनयकुमारने केवळ २० धावांत ६ गडी बाद करीत मुंबईच्या फलंदाजीच्या चिंध्या उडविल्या. कर्नाटकची दुसऱ्याडावात २ बाद १० अशी खराब सुरुवात झाली असली तरी त्यांच्याकडे १६८ धावांची आघाडी आहे. कर्नाटकने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीचा फलंदाज के. एल. राहुल (१५) याला शार्दुल ठाकूरने बी. एस. संधूकडे झेल देण्यास भाग पाडत कर्नाटकला पहिला धक्का दिला. पाठोपाठ आर. समर्थ (३) याला अखिल हेरवाडकर याने धावबाद केले. त्यामुळे कर्नाटकची अवस्था १ बाद १९ वरुन २ बाद ३४ अशी झाली. त्यानंतर आलेल्या एम. के पांडे (३४) याने सलामवीर रॉबिन उथप्पा (६८) याला सुरेख साथ दिली. उथप्पाने १ षटकार व १० चौकारांच्या सहाय्याने अर्धशतकी खेळी साजरी केली. या जोडीने ८१ धावांची भागिदारी केली. विल्किन मोटा याने उथप्पाला सुर्यकुमार यादव करवी झेलबाद करीत ही जोडी फोडली. त्यामुळे कर्नाटकची अवस्था ३ बाद ११५ झाली. त्यानंतर आलेल्या करुण नायर याने ७ चौकार व एका षटकाराच्या सहाय्याने ४९ धावांची नाबाद खेळी करीत संघाला द्वीशतकी मजल गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्नाटकचे तळाचे फलंदाज झटपट बाद झाले. शार्दुल ठाकूर याने ४, विल्किन मोटा याने २ बळी घेत कर्नाटकला २०२ धावांत रोखण्याची कामगिरी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा डाव १५.३ षटकांत ४४ धावांत आटोपला. एस. अय्यर (१५), सुर्यकुमार यादव (१२) यांचा अपवाद वगळता मुंबईचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारु शकला नाही. मुंबईचा सलामवीर अखिल हेरवाडकर, विल्किन मोटा, हरमित सिंग, बी. एस. संधु हे फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. आर. विनयकुमार याने २० धावांत ६, एस. अरविंद याने १ धावांत २ बळी घेत मुंबईची फलंदाजी मोडून काढली.
दिवसाअखेर कर्नाटकच्या दुसऱ्या डावांत ५ षटकांत २ बाद दहा धावा अशी खराब सुरुवात झाली आहे. सलामवीर उथप्पा (४), केएल राहुल (२) झटपट बाद झाले. ए. मिथुन व आर. समर्थ खेळत आहेत.