मुुंबईपुढे मेगाचॅलेंज
By Admin | Updated: May 25, 2014 04:23 IST2014-05-25T04:23:10+5:302014-05-25T04:23:10+5:30
‘आयपीएल-७’च्या साखळी फेरीचा शेवट मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याने होत आहे.

मुुंबईपुढे मेगाचॅलेंज
विनय नायडू, मुंबई - ‘आयपीएल-७’च्या साखळी फेरीचा शेवट मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याने होत आहे. प्ले-आॅफ फेरीत कोण जाणार, हे रविवारी वानखेडेवर होणार्या या सामन्यात निश्चित होईल. मुंबईचा १९ मे रोजी अहमदाबादमध्ये राजस्थानशी सामना झाला होता. अहमदाबाद हे राजस्थानचे होमग्राउंड आहे. मुंबईला जाणवणारी सलामीच्या जोडीची उणीव या सामन्यात भरून निघाली. लेंडल सिमन्स आणि माईक हसी ही सलामीची जोडी मुंबईसाठी भाग्योदयकारक ठरली. दिल्लीला हरविल्यानंतर मुंबईपुढे राजस्थानला फक्त हरविण्याचे चॅलेंज नाही, तर मोठ्या फरकाने हरविणे हे त्यांच्यापुढे मेगाचॅॅलेंज असेल. मुंबईकडून पहिल्या सामन्यात हरल्यानंतर राजस्थानला पंजाबकडून पराभूत व्हावे लागले. हा सामना जिंकला असता, तर त्यांचा अंतिम चार संघांत समावेश झाला असता; परंतु त्यांना आता मुंबईला हरविण्याशिवाय पर्याय नाही. दोन्ही संघांचे १३ सामने झाले असून, राजस्थानचे १४, तर मुंबईचे १२ गुण आहेत. राजस्थानचा रन रेट + ०.२४७ इतका आहे, तर मुंबईचा -०.०८६ इतका आहे. राजस्थानला सरळ विजय मिळवायचा आहे; पण मुंबईसाठी मोठी कसरत आहे. सामन्यातील गणिते आणि सूत्रे क्षणाक्षणाला बदलत जातील. किती षटकांत किती धावा करायच्या किंंवा किती बळी मिळवायचे, याचा ताळमेळ घालत त्यांना खेळावे लागणार आहे. क्रिकेटमध्ये काहीही शक्य असल्याने उद्याच्या सामन्यात प्रचंड थरार पाहायला मिळेल. घरच्या मैदानावर खेळायचे असल्यामुळे मुंबईसाठी परिस्थिती अनुकूल असेल. शिवाय, मुंबईकरांचा जल्लोषी पाठिंबा त्यांना फायद्याचा ठरेल. लागोपाठच्या दोन पराभवांमुळे राजस्थान बॅकफूटवर गेला आहे. यातून सावरून त्यांना नव्या उमेदीने मैदानावर यावे लागेल. १७५पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची दमछाक होते, हे दिसून आले आहे. सलामीची जोडी के. के. नायर आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर त्यांची मोठी मदार असेल. संजू सॅमसन आणि कर्णधार शेन वॉटसन हे राजस्थानचे की-प्लेअर आहेत. ब्रॅड हॉज, केव्हॉन कूपर, जेम्स फॉल्कनर हे चांगले फिनिशर आहेत. फिरकीपटू प्रवीण तांबेवर त्यांची मोठी आशा लागून राहिली आहे. मुंबईला प्रथम फलंदाजी करावी लागली, तर मोठी धावसंख्या उभी करावी लागेल किंवा राजस्थानला थोडक्या धावसंख्येत गुंडाळावे लागेल; पण चांगल्या सुरुवातीनंतरही दिल्लीविरुद्ध काल मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी केली होती. मुंबईला अशा गोष्टींपासून सावध राहावे लागेल.