मयंकचे शतक; भारत विजयी
By Admin | Updated: August 9, 2015 22:54 IST2015-08-09T22:54:07+5:302015-08-09T22:54:07+5:30
सलामीवीर मयंक अग्रवालचे शतक आणि त्याने कर्णधार उन्मुक्त चंदसोबत केलेली

मयंकचे शतक; भारत विजयी
चेन्नई : सलामीवीर मयंक अग्रवालचे शतक आणि त्याने कर्णधार उन्मुक्त चंदसोबत केलेली द्विशतकी भागीदारी याच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा ७४ चेंडू व ८ गडी राखून पराभव केला आणि तिरंगी मालिकेत बोनस गुणासह विजय साकारला. मयंकने १२२ चेंडूंना सामोरे जाताना १६ चौकार व एका षटकाराच्या मदतीने १३० धावांची खेळी केली. त्याने उन्मुक्त चंदसोबत (९०) सलामीला २२९ धावांची भागीदारी साकारली.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डिकाकच्या (१०८) शतकी खेळीच्या जोरावर निर्धारित ५० षटकांत २४४ धावांची मजल मारली. यष्टिरक्षक डेन विलास (५०) याचेही योगदान उल्लेखनीय ठरले. भारतातर्फे ऋषी धवनने ३९ धावांच्या मोबदल्यात ४ तर संदीप शर्माने ४६ धावांत २ बळी घेतले. भारताने विजयासाठी आवश्यक धावा ३७.४ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण
केल्या आणि बोनस गुण वसूल
केला. भारत ‘अ’ संघाचा या
स्पर्धेतील पहिला विजय आहे. दोन सामन्यांनंतर भारत ‘अ’ संघाच्या खात्यावर ५ गुणांची नोंद आहे. आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने दोन सामन्यांत १० गुणांची कमाई केली आहे. दक्षिण आफ्रिका संघाला दोन्ही लढतीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना अद्याप गुणांचे खाते उघडता आलेले नाही.
गेल्या लढतीत यजमान संघाला आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघाने आज शानदार फलंदाजी केली. मयंक व उन्मुक्त यांनी सुरुवातीपासून गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू दुखापतीने त्रस्त होते. भारतीय संघ फलंदाजी करीत असताना त्यांच्या व्हिडिओ विश्लेषक आणि त्यानंतर भारतीय खेळाडू मनदीपसिंग याला दक्षिण आफ्रिका संघातर्फे क्षेत्ररक्षण करावे लागले.
सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा कर्णधार डीन एल्गर म्हणाला, ‘खेळाडू दुखापतीने त्रस्त होते. आमच्या सहा ते आठ खेळाडूंना रुग्णालयात जावे लागणार आहे. खेळाडूंसाठी ही कठीण परिस्थिती आहे. मयंक व उन्मुक्त यांनी याचा लाभ घेत आक्रमक फलंदाजी केली. मयंकने सुरुवातीला धावगती कायम राखण्याची जबाबदारी स्वीकारली. मालिकेत सलग दुसऱ्यांदा अर्धशतक पूर्ण केल्यानंतर उन्मुक्तनेही आक्रमक फलंदाजी केली. डीन एल्गरच्या गोलंदाजीवर पायचित झाल्यामुळे त्याचे शतक हुकले. त्याने ९४ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व २ षटकार ठोकले. मयंक संघाचा विजय दृष्टिपथात असताना बाद झाला. मनीष पांडे (९) आणि करुण नायर (४) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
त्याआधी दक्षिण आफ्रिका संघाला डिकॉकच्या शतकी खेळीमुळे आव्हानात्मक मजल मारता आली. धवनच्या अचूक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिका संघाची ४ बाद ९२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर
डिकॉक व विलास यांनी पाचव्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिका संघाने अखेरच्या ६ विकेट केवळ ५२ धावांत गमावल्या.
धावफलक
दक्षिण अफ्रिका अ : ५०
षटकांत सर्वबाद २४४. क्विंटन
डी कॉक १०८, रामेला २६, विलास ५०.
गोलंदाजी : धवन ४/४९, कुलकर्णी
१ /३४, संदीप शर्मा २ /४६.
भारत अ : ३७.४ षटकांत २ बाद २४७;
मयांक अग्रवाल १३०, उन्मुक्त चांद ९०.
गोलंदाजी : तोत्सोबे १/३२, एल्गर १ / ६९.
(वृत्तसंस्था)