भारतापुढे मलेशियाचे आव्हान
By Admin | Updated: July 1, 2015 02:53 IST2015-07-01T02:53:13+5:302015-07-01T02:53:13+5:30
साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभूत झालेल्या भारतीय संघाला बुधवारी मलेशियाविरुद्ध झुुंजावे लागेल.

भारतापुढे मलेशियाचे आव्हान
एंटवर्प (बेल्जियम) : साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभूत झालेल्या भारतीय संघाला बुधवारी मलेशियाविरुद्ध झुुंजावे लागेल. उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात बचाव फळीतील कमजोरी दूर करण्याचे आव्हान भारतीय संघापुढे आहे.
बेल्जियममध्ये खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड हॉकी लीग सेमिफायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन आॅस्ट्रेलियाकडून भारताला ६ गोल खावे लागले. बुधवारी केएचसी ड्रॅगन्स स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यात भारतीय बचाव फळीची मलेशियन आक्रमणापुढे कसोटी लागणार आहे. मलेशियासाठी हा महत्त्वपूर्ण सामना असून, आॅलिम्पिक तिकीट मिळविण्यासाठी ते उद्या कोणतीही कसर सोडणार नाहीत.
भारताने या स्पर्धेत युवा संघ उतरवला आहे. भारत गेल्या वर्षी इंचियोन आशियाई स्पर्धेचे विजेतेपद मिळवून २०१६च्या आॅलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरला आहे. त्यामुळे या संघात अनेक युवा खेळाडूंना पारखण्याची संधी मिळाली आहे. डिसेंबरमध्ये भारतात होणाऱ्या लीगच्या फायनलमध्ये विजेतेपद मिळविण्यासाठी भारत उत्सुक असेल. त्यामुळे मलेशियाला सहजासहजी विजय मिळणे अशक्य आहे.
आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताला २-६ असा पराभव पत्करावा लागला होता. या निकालाने भारतीय प्रशिक्षक पॉल वॉन ऐस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताला स्टार ड्रॅगफ्लिकर रूपिंदरपाल सिंगची कमतरता जाणवत आहे. तो सराव सामन्यात जखमी झाला आहे. त्याची दुखापत सुधारली आहे; पण त्याला कोणत्याही सामन्यात खेळवलेले नाही. परंतु, भारतीय संघासोबत तो सराव करताना दिसत आहे. भारतीय संघ मलेशियाला हलक्यात घेत नाही. कर्णधार सरदार म्हणाला, की मलेशियाचा संघ मजबूत आहे. त्यांच्याविरुद्ध आम्हाला सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावे लागणार आहे. आम्हाला प्रत्येक संधीचा फायदा घ्यावा लागेल. आम्हाला रूपिंदरसिंगची कमतरता जाणवत आहे. एप्रिलमध्ये इपोह येथे झालेल्या सामन्यात भारत मलेशियाकडून
हारला होता; परंतु त्या वेळेचा
त्यांचा संघ आताच्या तुलनेत मजबूत होता.
या स्पर्धेतून ३ संघ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतात. सेमिफायनलमध्ये न पोहोचणाऱ्या संघालाही पात्रतेची संधी मिळू शकते. खंडीय स्पर्धा जिंकून पात्र ठरलेला संघ सेमिफायनलमध्ये पोहोचल्यास या स्पर्धेतील पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघही आॅलिम्पिक पात्रता मिळवू शकतो.