आक्रमक पवित्रा कायम राखणार

By Admin | Updated: December 17, 2014 01:29 IST2014-12-17T01:29:16+5:302014-12-17T01:29:16+5:30

मालिकेत बरोबरी साधण्यासाठी उत्सुक असलेला भारतीय संघ बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आक्रमक पवित्रा कायम राखणार

Maintaining an aggressive posture | आक्रमक पवित्रा कायम राखणार

आक्रमक पवित्रा कायम राखणार

ब्रिसबेन : मालिकेत बरोबरी साधण्यासाठी उत्सुक असलेला भारतीय संघ बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आक्रमक पवित्रा कायम राखणार असल्याचे भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने स्पष्ट केले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अ‍ॅडिलेड कसोटीमध्ये ४८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
अंगठ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणारा धोनी म्हणाला, ‘आक्रमक पवित्रा स्वीकारण्याचा निर्णय योग्यच होता. आम्ही लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. विराट कोहली व मुरली विजय यांच्यादरम्यानच्या भागीदारीमुळे आम्ही लक्ष्याच्या समीप पोहोचलो होतो, पण विजय बाद झाल्यानंतर काही विकेट झटपट गेल्यामुळे आम्हाला लक्ष्य गाठण्यात अपयश आले. त्यानंतर सामना अनिर्णित राखणेही कठीण होते. त्यामुळे आम्हाला केवळ विजयासाठी प्रयत्न करावे लागले. भविष्यातही आक्रमक पवित्रा कायम राहणार आहे. त्यासाठी चांगली सुरुवात, मोठी भागीदारी आणि विशाल धावसंख्या आवश्यक आहे. सूर गवसल्यानंतरच पुढे काय करायचे, याचा निर्णय घेता येतो.’
भारतीय संघातील एकाही खेळाडूला या मैदानावर कसोटी खेळण्याचा अनुभव नाही. धोनी संघात पुनरागमन करीत असून हा ब्रेक माझ्यासाठी गरजेचा होता, असेही धोनी म्हणाला.
धोनीने पुढे सांगितले की, ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान मला दुखापत झाली होती. खेळत राहिलो तर दुखापत ठीक होईल, असे वाटत होते, पण चॅम्पियन्स लीग व वन-डे खेळल्यानंतर ही दुखापत चिघळली असल्याचे माझ्या लक्षात आले. श्रीलंकेविरुध्दच्या मालिकेतून माघारीचा निर्णय महत्त्वाचा होता. कारण आॅस्ट्रेलियाविरुद्धची मालिका महत्त्वाची होती. त्यानंतर विश्वकप स्पर्धा आहे. त्यामुळे २०-२५ दिवसांचा घेतलेल्या ब्रेकमुळे दुखापतीतून सावरता आले.’ (वृत्तसंस्था)
दुसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘अ‍ॅडिलेडच्या तुलनेत ही खेळपट्टी वेगळी असेल. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल राहील. खेळपट्टी चांगली भासत असली तरी फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता धुसर आहे. गोलंदाजांच्या फुटमार्कमुळे आॅफ स्पिनरला मदत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.’
धोनीने आर. अश्विनला अंतिम संघात स्थान देण्याचे संकेत देताना म्हटले की,‘अश्विनमुळे तळाच्या फलंदाजीला बळकटी मिळले. तळाचे फलंदाज झटपट बाद होतात, असा अनुभव आहे. अश्विन असेल तर दुसऱ्या टोकाकडून खेळणाऱ्या फलंदाजाला मदत मिळेल.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Maintaining an aggressive posture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.