संघातून वगळल्यामुळे जडेजाच्या कामगिरीत सुधारणा
By Admin | Updated: November 16, 2015 02:43 IST2015-11-16T02:43:37+5:302015-11-16T02:43:37+5:30
भारतीय संघातून काही काळ बाहेर राहिल्यामुळे डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाला चुका सुधारण्याची संधी मिळाली आणि आता त्याला त्याचा लाभ मिळाला

संघातून वगळल्यामुळे जडेजाच्या कामगिरीत सुधारणा
बंगळुरू : भारतीय संघातून काही काळ बाहेर राहिल्यामुळे डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाला चुका सुधारण्याची संधी मिळाली आणि आता त्याला त्याचा लाभ मिळाला, असे मत भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी व्यक्त केले.
जडेजाने आतापर्यंत भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन आश्विनला योग्य साथ दिली आहे. या दोन्ही फिरकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत तीन डावांमध्ये प्रत्येकी १२ बळी घेतले आहेत.
पावसाच्या व्यत्ययामुळे रविवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना अरुण म्हणाले, ‘‘जडेजाला संघातून वगळण्यात आल्यानंतर कुठल्या विभागात सुधारणा करण्याची गरज आहे, हे समजण्याची संधी मिळाली. रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना जडेजाने ३० बळी घेतले आहेत. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळाली. कसोटी, वन-डे किंवा टी-२० क्रिकेटमध्ये जडेजा आमचा ‘स्टॉक’ गोलंदाज आहे. तो आपल्या क्षमतेचा कसा उपयोग करायचा, याची त्याला चांगली माहिती आहे. जडेजाने आपल्या खेळामध्ये सुधारणा केली आहे.’’अरुण यांनी सांगितले की, ‘‘आता प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करणे सयुक्तिक ठरणार नाही, पण आमच्याकडे गोलंदाजांचा चांगला पूल तयार झाला आहे. त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.’’ ईशांतच्या अॅक्शनमधील बदलाबाबत बोलताना अरुण म्हणाले, ‘‘दिल्लीचा हा वेगवान गोलंदाज आता अचूक मारा करीत आहे. त्यामुळे तो यशस्वी ठरत आहे. त्याच्या अॅक्शनमध्ये विशेष बदल केलेला नाही. आम्ही त्याला गोलंदाजी करताना दिशा व टप्पा कुठे राखायला पाहिजे याचे मार्गदर्शन केले.’’
टर्निंग विकेटमुळे भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या विकासासाठी अडथळा निर्माण होईल का, या मताशी मी सहमत नाही.
(वृत्तसंस्था)
भुवनेश्वर कुमारला चेंडू अधिक स्विंग करणे आवश्यक आहे. त्याचा वेग वाढलेला आहे, ही आनंदाची बाब आहे. भुवनेश्वर १४० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करू शकतो. त्याच्यात चेंडू स्विंग करण्याचीही क्षमता आहे. त्याच्या गोलंदाजीचा वेग वाढलेला आहे, पण स्विंग करणे आवश्यक आहे. त्यावर मेहनत घेतली तर तो यशस्वी ठरेल. भारतात वेगवान गोलंदाजांचा रिझर्व्ह पूल चांगला तयार झाला असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.’’
- भरत अरुण, गोलंदाजी प्रशिक्षक, भारतीय संघ