पुनरागमन ठरले यशस्वी - जडेजा
By Admin | Updated: December 6, 2015 01:45 IST2015-12-06T01:45:48+5:302015-12-06T01:45:48+5:30
भारतीय संघात यशस्वी पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने नशिबवान असल्याचे कबूल केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत २१ बळी घेत जडेजाने शानदार पुनरागमन केले.

पुनरागमन ठरले यशस्वी - जडेजा
नवी दिल्ली : भारतीय संघात यशस्वी पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने नशिबवान असल्याचे कबूल केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत २१ बळी घेत जडेजाने शानदार पुनरागमन केले. पुनरागमनानंतर सर्वकाही अनुकूल घडले, असे जडेजा म्हणाला. रणजी स्पर्धेत ३४ बळी घेतल्यानंतर जडेजाने कसोटी संघात पुनरागमन केले.
चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३० धावांच्या मोबदल्यात पाच बळी घेणारा जडेजा म्हणाला,‘मी सहा महिने संघाबाहेर होतो. रणजी स्पर्धेत तीन सामने खेळण्याची संधी मिळाली. नशिबाची साथ मिळाली आणि खेळपट्ट्याही फिरकीला अनुकूल मिळाल्या. मी बरीच मेहनत घेत आहे, यात काही संशय नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका प्रारंभ होण्यापूर्वी
रणजी स्पर्धा प्रारंभ झाली. माझ्यासाठी सर्वकाही अनुकूल घडले.’
जडेजाने सांगितले की,‘आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिका संघाला पहिल्या डावात लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाला २१३ धावांची भक्कम आघाडी घेता आली. खेळपट्टी यानंतर यापेक्षा खडतर होईल आणि आम्हाला वर्चस्व गाजवण्याची संधी राहील. दुसऱ्या डावात त्यांना बाद करावे लागेल. नागपूरच्या तुलनेत ही खेळपट्टी चांगली आहे. फिरकीपटूंची कामगिरी एकमेकांना पूरक ठरत आहे. रणजी ट्रॉफी सामन्यात जशी गोलंदाजी करतो तशीच गोलंदाजी येथे केली. अश्विन, मी आणि अमित मिश्रा एकमेकांना मदत करीत असतो. मला प्रत्येक लढतीत स्वत:ला सिद्ध करायचे आहे.’
संघाबाहेर असताना काही काळ निराश झालो होतो. याबाबत बोलताना जडेजा म्हणाला,‘मी निराश झालो होतो. यातून सावरणे
आवश्यक आहे, याची मला कल्पना आली. आता चांगल्या
कामगिरीमुळे आगामी सामन्यांमध्ये
चमकदार कामगिरीची आशा
आहे. (वृत्तसंस्था)