भारताचा पाकवर विराट' विजय
By Admin | Updated: February 15, 2015 17:14 IST2015-02-15T17:00:12+5:302015-02-15T17:14:38+5:30
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीत भारताने पाकचा ७६ धावांनी पराभव केला.
भारताचा पाकवर विराट' विजय
ऑनलाइन लोकमत
अॅडिलेड, दि. १५ - वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीत भारताने पाकचा ७६ धावांनी पराभव केला. भारताच्या ३०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचा डाव अवघ्या २२४ धावांवरच आटोपला.
वर्ल्डकपमध्ये भारताची सलामीची लढत कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणा-या पाकिस्तानसोबत सुरु आहे. भारताच्या ३०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकला भारताने सुरुवातीलाच धक्का दिला. सलामीवीर युनूस खान सहा धावांवर बाद झाला. मोहम्मद शमीच्या बाऊन्सरवर युनूस बाद झाला. यानंतर अहमद शहजाद आणि हॅरिस सोहेल या जोडीने पाकचा पुढे नेला. मात्र आर. अश्विनच्या फिरकीने हॅरिस सोहेलची विकेट घेतली. यानंतर उमेश यादवच्या भेदक मा-याने सोहेब मकसूद व शहजादची विकेट घेत पाकची अवस्था ४ बाद १०२ अशी झाली. यानंतर कर्णधार मिसबाह उल हकचा अपवाद वगळता एकही फलंदाज फार काळ खेळपट्टीवर टिकला नाही. शाहिद आफ्रिदी २२, उमर अकमल ०, वहाब रियाज ४, यासिर शहा १३ धावांवर बाद झाला. शेवटी २२४ धावांवर पाकचा डाव आटोपला. मिसबाहने ७६ धावांची खेळी केली. भारतातर्फे मोहम्मद शमीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. उमेश यादव, मोहित शर्माने प्रत्येकी दोन आणि आर. अश्विन, रविंद्र जडेजा या फिरकी गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दरम्यान, नाणेफेक जिंकून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी सलामीला आली. भारताच्या २४ धावा झाल्या असताना भारताची सलामीची जोडी फोडण्यात पाकच्या गोलंदाजांना यश आले. रोहित शर्मा १५ धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने संयमी खेळी करत भारताचा डाव पुढे नेला. धवन - कोहली जोडीने मोठे फटके मारण्याऐवजी एकेरी धावा करत भारताचा फलक हलता ठेवला. खेळपट्टीवर स्थिरावताच या दोघांनीही फटकेबाजीला सुरुवात केली. शिखर धवन ७३ धावांवर असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात बाद झाला. धवन - कोहली जोडीने १२९ धावांची भागीदारी केली. यानंतर विराट कोहलीने रैनाच्या मदतीने भारताला दोनशेचा टप्पा गाठून दिला. कोहलीच्या शतकानंतर सुरेश रैनानेही अर्धशतक ठोकले. कोहली १०८ आणि रैना ७२ धावांवर बाद झाला तेव्हा भारताची स्थिती ४७.३ षटकांत ४ बाद २८४ अशी होती. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांचा अचूक मा-यासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी १८, रविंद्र जडेजा ३ आणि अजिंक्य रहाणे भोपळा न फोडताच माघारी परतला. लागोपाठ तीन फलंदाज बाद झाल्याने भारताने ५० षटकांत सात गडी गमावत ३०० धावाच केल्या. शेवटच्या पाच षटकांत भारताने फक्त २७ धावा केल्या. पाकिस्तानतर्फे सोहेल खानने १० षटकांत ५५ धावा देऊन ५ विकेट घेतल्या. तर वहाब रियाजने एक विकेट घेतली.
भारतीय गोलंदाजांचा अचूक मारा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि धोनीचे आक्रमक नेतृत्व या आधारे भारताने सहजरित्या पाकला नमवले. या विजयासह वर्ल्डकपमध्ये पाकविरोधात भारताची विजयी मालिका सुरुच आहे. आज वर्ल्डकपमध्ये भारत व पाकिस्तान सहाव्यांदा आमने सामने होते. या सहाही सामन्यांमध्ये भारतालाच विजय मिळाला आहे.