भारतीय संघाने चाखला विजयाचा स्वाद
By Admin | Updated: November 14, 2015 01:11 IST2015-11-14T01:11:44+5:302015-11-14T01:11:44+5:30
भारताने गुरुवारी येथे झालेल्या सामन्यात गुआमला १-0 गोलफरकाने हरवून पाच पराभवानंतर २0१८च्या फुटबॉल वर्ल्डकप पात्रता स्पर्धेत पहिल्या विजयाचे नोंद केली.

भारतीय संघाने चाखला विजयाचा स्वाद
फिफा वर्ल्डकप : पात्रता फेरीत गुआमला हरविले
बंगळूर : भारताने गुरुवारी येथे झालेल्या सामन्यात गुआमला १-0 गोलफरकाने हरवून पाच पराभवानंतर २0१८च्या फुटबॉल वर्ल्डकप पात्रता स्पर्धेत पहिल्या विजयाचे नोंद केली.
सातत्याने होणाऱ्या पावसामुळे निसरड्या मैदानावर ग्रुप डीमधील या सामन्यात ४१ व्या मिनिटाला भारताच्या सहनाजसिंह याला धोकादायक खेळ केल्याबद्दल बाहेर घालविण्यात आले. त्यामुळे मध्यंतरानंतर भारतीय संघ १0 खेळाडूंनिशी खेळला तरीही त्यांनी विजय नोंदविण्यात यश मिळविले. कांतीर्वा स्टेडीयमवर रॉबीनसिंग याने दहाव्या मिनिटाला महत्त्वपूर्ण गोल नोंदविला. या विजयाने भारताला तीन गुण मिळाले असले तरीही भारत पाच जणांच्या गटात तळाच्या स्थानावर आहे. तर गुआम सात गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सामन्यात सुरवातीलाच रॉबीनसिंगने आघाडी मिळवून दिल्यामुळे भारतीय खेळाडूंचा जोेश वाढला. बेंगलूरु एफसीकडून खेळणाऱ्या रॉबीनने कर्णधार सुनील छेत्रीच्या पासवर सामन्यातील एकमेव गोल नोंदवला. पिछाडीवर पडलेल्या गुआमने सामन्यात बरोबरी साधण्यासाठी अनेक आक्रमक हल्ले केले, परंतु भारताचा गोलरक्षक गुरुप्रीतसिंह याने हे हल्ले मोठ्या धैर्याने परतावून लावत भारताची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली.
२0१८ वर्ल्डकपच्या पात्रता शर्यतीतून भारत यापूर्वीच बाहेर पडला आहे, मात्र आजच्या विजयाने २0१९ च्या आशिया चषक स्पर्धेला पात्रतेसाठी भारताचा पारडे मजबूत झाले आहे.