पाक क्रिकेट संघाला भारताचे निमंत्रण
By Admin | Updated: November 14, 2015 22:59 IST2015-11-14T22:59:28+5:302015-11-14T22:59:28+5:30
आगामी डिसेंबरमध्ये भारतात क्रिकेट मालिका खेळण्यासाठी बीसीसीआयने पाकिस्तानला अधिकृत निमंत्रण दिल्याचा दावा पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी शनिवारी केला.

पाक क्रिकेट संघाला भारताचे निमंत्रण
कराची : आगामी डिसेंबरमध्ये भारतात क्रिकेट मालिका खेळण्यासाठी बीसीसीआयने पाकिस्तानला अधिकृत निमंत्रण दिल्याचा दावा पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी शनिवारी केला. दुसरीकडे, बीसीसीआयने मात्र अद्याप असा कुठलाही औपचारिक प्रस्ताव पाठविला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मनोहर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, की मालिकेच्या आयोजनाबाबत अद्याप सरकारकडे प्रस्ताव सादर केला नसल्याने या संदर्भातील वृत्त खरे नाही. शहरयार खान यांचे वक्तव्य चुकीचे आहे. मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. पुढील दोन दिवसांत पुन्हा चर्चा होऊ शकते. लाहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना शहरयार यांनी सांगितले, की शुक्रवारी बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी फोनवर बोलताना हे औपचारिक निमंत्रण दिले. पाकविरुद्ध खेळण्यासाठी बीसीसीआयला सरकारकडून हिरवी झंडी मिळाल्याची माहिती देऊन मनोहर यांनी काल सायंकाळी माझ्यापुढे औपचारिक प्रस्ताव ठेवला. आम्ही यूएईत नव्हे तर भारतात मालिका खेळू इच्छितो, असेही मनोहर म्हणाले. भारतात पाक संघाला सर्वोत्कृष्ट सुरक्षाव्यवस्था पुरवली जाईल. याशिवाय, मोहाली आणि कोलकाता यासारख्या ठिकाणी सामन्यांचे आयोजन करण्यात येईल. येथे भारत-पाक सामन्यात कुठलाही व्यत्यय येत नसल्याचे मनोहर यांचे मत होते. ही मालिका भारतात आयोजित करण्यात कुठलाही अडसर जाणवणार नाही, असा तोडगा बीसीसीआय काढणार असल्याची ग्वाही मनोहर यांनी दिल्याचे शहरयार यांनी पुढे सांगितले.
कुठलाही ठोस निर्णय घेण्याआधी आम्हाला पंतप्रधान नवाझ शरीफ यांची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगून शहरयार पुढे म्हणाले, ‘‘सध्या बीसीसीआयला मी लेखी प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे.’’ विशेष असे, की पीसीबी कार्यकारी समितीचे प्रमुख नजम सेठी यांनी कालच, पाकने भारतात क्रिकेट खेळण्याचा प्रस्ताव स्वीकारू नये, असा सल्ला दिला होता. पाकने मालिका खेळण्यासाठी भारतात जाऊ नये, असे माझे वैयक्तिक मत असून, समझोत्यानुसार मालिकेचे यजमानपद पाकने भूषवायचे असल्याचे सेठी यांनी सांगितले होते.